गुलाब, गुलाबी आणि गुलबकावली

गुलाबी रंगाचा संदर्भ थोडा रोमँटिक आणि फेमिनाइन आहे. तो उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ( Deputy Chief Minister Ajitdada Pawar) रांगड्या स्वभावासोबत जात नाही. अजितदादांना महाराष्ट्रभर फॅनफॉलोइंग आहे, ते त्यांच्या करारी तरीही मिश्किल स्वभावामुळे.
[gspeech type=button]

गुलाब आणि गुलाबी या दोन शब्दांचे संकेत राजकारणात वेगवेगळे आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादांच्या वाटेत काटेरी गुलाब आहेत, पण त्यांचं व्यक्तिमत्व नक्कीच गुलाबी नाही. त्यांनी जाहीरपणे गुलाबी ‘पिन्क’ टाकली आहे. या रंगाचा गुण त्यांना लागलेला नसला तरी वाण मात्र सध्या चिकटला आहे.

बंडखोरीचा रंग

रंगांची प्रतिकं आपल्या समाजामध्ये रुजलेली आहेत. नव्या पिढीनं बाकी काही नाही तरी रंगांचे जुन्या पिढीचे संकेत स्वीकारले आहेत. पण काही रंगांच्या बाबतीत बंडखोरी होते. जशी काळ्या रंगाच्या बाबतीत झाली आहे. रूढी-परंपरा काळं वस्त्रं घालायला परवानगी देत नाही. दारात आलेला कुडमुड्या ज्योतिषीही आपण न विचारताच सांगतो की काळं वस्त्रं घालू नका. तरीही नवी पिढी शहरी जीवनात आनंदानं काळं वस्त्रं नेसते.

रंगांचे बदलते संदर्भ

सफेद रंगाचे संदर्भ वेगवेगळे आहेत. उत्तरेत काही समाजांमध्ये पतीचं निधन झाल्यावर महिलांना सफेद रंगाचं वस्त्रं नेसावं लागतं. तो बेरंगी म्हणून अनासक्तीचा रंग समजला जातो. पण हा बेरंग भारतीय ग्रामव्यवस्थेतील पुरुषांनी शांतीचा आणि शुद्धतेचा म्हणून नेसता केला. धुळीच्या मातीच्या कामातही ग्रामीण भारतीय पुरुषांनी धोती, कुडता आणि गांधी टोपीनिशी शुभ्र रंग टिकवून ठेवला. लाल रंग आसक्तीचा आहे. पाश्चिमात्यांमध्ये मिलनाचा रंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल रंगांला, भारतीय समाजामध्येही हीच ओळख मिळाली. हा रंग क्रांतीचा म्हणून साम्यवादी देशांतून आयात झाला. तो बंडखोरीचा रंग म्हणून प्रस्थापित झाला.

केशरी ते भगवा

हिंदू धर्माचा सनातन रंग हा पिवळा आहे. पितांबर ही हिंदू धर्माची वस्त्रपरंपरा. हिंदू धर्माची पताकाही पिवळी. पण बौद्धकाळातील उलथापालथींनंतर आता हिंदू धर्माचा रंगसंकेत केशरी म्हणून प्रस्थापित झाला आहे. केशरी रंगाला विरक्तीची, सर्वसंग परित्यागाच्या निवृत्तीची झालर होती. ती घटनांच्या क्रमाक्रमाने आक्रमक भगव्या हिंदुत्वाची झाली. थोडक्यात काय तर रंगांची प्रतिकं आणि रूढ संकेत बदलतात, बदलू शकतात.

दादांचा अवघा रंग गुलाबी

गुलाबी रंगाचा संदर्भ थोडा रोमँटिक आणि फेमिनाइन आहे. तो उपमुख्यमंत्री अजितदादांच्या ( Deputy Chief Minister Ajitdada Pawar) रांगड्या स्वभावासोबत जात नाही. अजितदादांना महाराष्ट्रभर फॅनफॉलोइंग आहे, ते त्यांच्या करारी तरीही मिश्किल स्वभावामुळे. अजितदादांना ग्रामीण वलयासोबत रुबाबदारपणाचं बिरुद असल्याने ते शहरी कॉर्पोरेट वर्गालाही काहीवेळा चकित करतात. अशा माणसाला गुलाबी ऑप्टिक्समध्ये (Optics) बसवणं हे बहुतांश लोकांना रुचलेलं नाही. त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही ते आवडलेलं नाही. पण तरीही अजितदादांच्या प्रचाराचा अवघा रंग गुलाबी झाला. यामागे काहीतरी कारण असणारच.

रंग ज्योतिषाचे उपाय

साधारण पहिला अंदाज असा असतो की, कोणत्या तरी ज्योतिषाने हा रंग रेकमेण्ड केला असेल. अजितदादा अशा कुडमुड्यांच्या नादी लागणाऱ्यातले नाहीत. तरीही दरम्यानच्या काळात निर्माण झालेली राजकीय असुरक्षितता, आप्तस्वकियांचा आग्रह अशा दडपणात माणसं ‘चला ज्योतिष पण साधतंय का ते बघू’ म्हणून फशी पडू शकतात. नियतीचा रंग ओळखणारं ज्योतिष समाजमनाला आकर्षित करतं. डोळ्यांना दिसणारे सात रंग आणि त्याच्या छटा हा मानवी डोळ्यांना दिसू शकणाऱ्या वर्णपटापुरता मर्यादित आहे. वर्णपटातील विविध रंगांद्वारे निर्माण होणाऱ्या विविध व्हायब्रेशनचा भावनिक प्रिझम आपल्या मनात असतोच. त्यातून एखाद्या रंगाच्या वापराद्वारे सकारात्मक किंवा नकारात्मक भावनिक ऊर्जा निर्माण करता येते. पण हा संकेत मानवी समूहाच्या रंगशिक्षणावरही अवलंबून असतो. त्याचा ज्योतिषशास्त्राशी काही संबंध नसतो, हा डिस्क्लेमर इथे मांडणं आवश्यक आहे.

बहुजनांशी जवळीक

दुसरी शक्यता अशी असू शकते की अजित पवारांनी महायुतीच्या छावणीत भाजपाच्या दावणीला स्वतःला बांधून घेतल्याचं बहुजन वर्गाला आवडलेलं नाही. शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांना मानणारा वर्ग घड्याळाचं टायमिंग चुकवू लागल्याचा अंदाज त्यांना आला असेल. भाजपाचा संदर्भ आल्याने मोठा मुस्लीम समुदायही मतदानात फटकून वागू लागला. घड्याळाची वेळ निघून जायच्या आधी काय करामत करावी या विवंचनेतून मग स्ट्रॅटेजी (strategy) म्हणून सोपं गणित सुचलं असावं.

अर्ध्या मतदारसंख्येवर इम्प्रेशन

नवा टी.जी. म्हणजे महिला वर्ग. 50 टक्के मतदार महिलांचा आहे, असं सांगितलं गेलं. मग या महिलांनाच मतदार म्हणून टारगेट केलं तर? पण महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक संस्थांमधून भावनिक आवाहन होणार नाही. उलट तिथे समस्या जास्त. सरकार दरबारी उपमुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या व्यक्तीकडे तक्रारींचा पाढा रोजच येत असतो. त्याऐवजी महिलांसाठी भावनिक इव्हेंट सोपी ठरते. महिलांचा रंग गुलाबी. गुलाबी वातावरणात समस्यांना वाव नाही. मग यातूनच गुलाबी बॅकग्राउंड, गुलाबी जाकिट असा जामानिमा सुरू झाला असावा. लाडक्या बहिणीचा मीच लाडका भाऊ ही अहमहमिका त्यातूनच सुरू झाली. सर्व वयोगटातील महिलांशी निगडित सुरक्षितता, कायदा सुव्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृह, प्रवासाच्या सोयी, आरक्षित व्यवस्था, प्राधान्यक्रम यांचं फक्त अवडंबरच झालंय का? प्रत्यक्षात या सुविधांची अंमलबजावणी झाली आहे का? याचं ऑडिट कुणी करू धजावत नाही.

एका वर्षात असं काय झालं?

आज सगळेच लाडक्या बहिणींचं भांडवल करत आहेत. गमतीचा भाग म्हणजे एक वर्षांपूर्वी हेच अजित पवार महिलांच्या कार्यक्रमातून स्वतःला लांब ठेवायचे. ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा काय गाजला आणि अनेकांनी मंगळागौरीच्या इव्हेंट करायला सुरवात केली होती. अजितदादांच्या पक्षातल्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही एक मंगळागौरीची मोठी इव्हेंट रविंद्र नाट्यमंदिरात ठेवली होती. अजितदादा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते. महिला अध्यक्षांनी महाराष्ट्रभरातून बस भरभरून महिलावर्ग बोलावला होता. ‘सेल्फी वुइथ दादा’ नावाची इव्हेंट पण होती. पण आयत्यावेळी अजितदादांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि सुनेत्रा पवारांना उपस्थित राहायला सांगितलं. महिलावर्ग हिरमुसला. पण एक वर्षांतच नियतीने अजितदादांना रंगबिरंगी वातावरणात गुलाबी जाकिट घालून महिलांसमोर उभं केलं.

स्ट्रॅटेजीवाल्यांची प्रमेय

चौथी शक्यता अशी आहे की, गुलाबी (pink) हा रंग केवळ मुलींचा-महिलांचा रंग म्हणून मक्तेदारी कशाला? आधुनिक डिजिटल प्रचारतंत्रात एखाद्या रंगाची प्रतिकात्मक भावना बदलून टाकण्याचं सामर्थ्य असू शकतं. अजितदादांमुळे गुलाबी हा रंग रांगडेपणाचं, रुबाबदारपणाचं प्रतीक म्हणून ओळखला जाऊ शकतो. अजित पवारांना गुलाबी रंग बहाल करणाऱ्या डिझाइनबॉक्स्ड या स्ट्रॅटेजिस्ट संस्थेने याआधी कर्नाटक काँग्रेसचे नेते राजस्थान काँग्रेसचे अशोक गेलोहत आणि भारत राष्ट्र समितीच्या केसीआर यांचे राजकीय प्रचाराचे काम पाहिले आहे. हा गुलाबी रंग सगळ्या नेत्यांमध्ये सामायिक म्हणून दिसतो हे विशेष. या सगळ्यांमध्ये रुबाबदारपणाचा मसावि दुर्दैवाने नाही. सगळ्यांच्या राजकीय कुंडल्याही सारख्या नाहीत. म्हणजे रंगज्योतिषी नावाचं प्रकरणही नसावं.

मतांच्या जोगव्यासाठी रंगांचा वापर

तेलंगण राष्ट्र समितीने हा गुलाबी रंग स्वीकारला होता तेव्हा त्यांचे एक नेते विनोद कुमार यांनी सांगितलं होतं की गुलाबी हा शांततेचा आणि प्रेमाचा रंग आहे. गुलाबी रंगाचं नॅरेटिव तेव्हापासून बदलायचा प्रयत्न सुरू झाला होता. पण बीआरएसला निवडणुकीत फारसा फायदा झालेला नसल्याने ते बीआरएसचं पुन्हा टीआरएस करण्याच्या मागे लागले आहे. थोडक्यात गुलाबी रंगामुळे त्यांच्या चेहऱ्यांवरचे रंग काही बदलले नाहीत. त्यामुळे रंगसंगतीमुळे फारशी राजकीय गणितं बदलत नाहीत. पण ही राजकीय रंगपंचमी खेळल्यामुळे माध्यमांमध्ये तात्पुरता ‘बझ’ निर्माण होतो. सकल दुःखांचं तात्पुरतं हरण होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात असे विविध रंग उधळले जात असताना मतदार मात्र कोणता रंग दाखवणार, हे कळेनासे झाले आहे. कुणी गुलाबी, कुणी निळा, कुणी हिरवा तर कुणी भगवा रंग दाखवत मतांचा जोगवा मागणार आहे. टीव्ही, डिजिटल आणि सोशल मीडियावर प्रचाराचे रंग दिसतीलही पण खरी समस्या हीच आहे की प्रत्यक्षात सर्वसामान्य माणसांसाठी ही नेते मंडळी आजही उपलब्ध नाहीत. गुलाब आणि गुलाबी नीती बाळगणारे नेते स्वतःच मानवी कुंपणाआडचं गुलबकावलीचं फुल बनले आहेत. हे गुलाबी फर्राटे रस्त्यावरच्या गरीबांच्या गालांवर ज्या शुभदिनी येतील तो दिवस रंगाच्या शुभसंकेताचा म्हणून आपण साजरा करू.

1 Comment

  • Makarand Joshi

    मस्त विश्लेषण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

One Response

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ