‘माहिती व तंत्रज्ञान’ या दोन शब्दांनी सध्या पूर्ण विश्व व्यापलं आहे. आज प्रत्येक कंपनीला तुमच्या ऑर्डर सोबतच तुमच्या ‘डेटा’ मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या जगावर झालेल्या आक्रमणाने आजकाल तुम्ही, तुमचा वेळ हेच एक प्रॉडक्ट झालं आहे. तुमचा क्लोन तयार करणे, दोन व्यक्तींची व्हर्च्युअली तिसऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटीसारखी भेट होणं हे सध्या आपल्या भारतात देखील सुरू झालं आहे.
‘एआय’ आणि मानवी जीवन
‘एआय’चे अजून होऊ शकणारे फायदे म्हणजे हे एक वेगळं विश्व तयार होऊ पहात आहे. तुमच्यातील स्वभाव गुणदोषांचा, संवाद साधण्याच्या पद्धतीचा, व्यक्त होण्याच्या पद्धतीचा, चुकीच्या गोष्टींवर रिऍक्ट होण्याच्या पद्धतीचा सध्या एक यंत्रणा अभ्यास करत आहे. तुमचे आणि तुमच्या सारख्या असंख्य व्यक्तींचे ऑनलाईन क्लोन तयार केले जात आहेत. हे क्लोन काही वर्षांनी तुमच्याशी बोलतील, तुमचा एकटेपणा घालवतील. तुमचे मित्र होतील. लोकांना कोणासोबत प्रत्यक्ष भेटण्याची गरज कमी होईल. तंत्रज्ञानाने समृद्ध असलेल्या मोठ्या देशांमध्ये, शहरांमध्ये हे सर्व घडणं ऑलरेडी सुरू झालं आहे.
‘एआय’ सिनेमा
आपल्या आजूबाजूला जे घडत आहे, ते मोठ्या पडद्यावर बघण्याची प्रेक्षकांना आवड असते. हॉलीवूड निर्मात्यांनी हे फार पूर्वीच हेरलं आहे. त्यानुसार काळाच्या पुढचे कित्येक सिनेमांची त्यांनी आजवर निर्मिती केलेली आहे. बॉलीवूड, टॉलीवूड इतकंच नाही तर आपला मराठी सिनेमा देखील आता या वाटेवर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘टेक्नो सॅव्ही’ लोकांना आवडतील असे काही सिनेमा प्रदर्शित झाले आहेत आणि ते लोकांच्या पसंतीसही उतरले आहेत. तर पाहुयात या सिनेमांचे कथानक कसे आहेत.
CTRL
नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेला ‘CTRL’ हा सिनेमा याच विषयावर भाष्य करतो. एक मोबाईल सेवा पुरवणारी कंपनी आहे जी की, तुमच्या सर्व कृतींवर लक्ष ठेवून आहे. त्याच कंपनीने ‘CTRL’ नावाची एक ‘एआय’ सेवा देणारी कंपनी सुरू केली आहे. लोकांना त्याची कशी गरज आहे ? आणि म्हणून त्यांना या कृत्रिम लोकांशी संवाद साधण्याची कशी सवय लागत आहे? मोबाईल कंपनी या कशा आपल्या ‘डेटा’च्या जीवावर आपल्या आयुष्यावर नियंत्रण मिळवू पहात आहेत? हे या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. अनन्या पांडेची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा सध्या भारतीय ट्रेंडिंग सिनेमांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे काय दर्शवतं? प्रेक्षक आता टिपिकल लव्हस्टोरी किंवा तत्सम सिनेमांना कंटाळले आहेत. नवं काय आहे? येणारा काळ कसा असेल? टेक्नॉलॉजी कशी असेल? यांची माहिती देत मनोरंजन करणारे चित्रपट आता प्रेक्षकांना हवे आहेत असं ट्रेंडमधून दिसून येतं.
खो गये हम कहा
नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेला हा सिनेमा सुद्धा आजच्या टेक्नो काळाशी सुसंगत किंवा त्यापेक्षा काही पावलं पुढे आहे. या सिनेमातील नायिका अनन्या पांडे ही एक ‘इन्फ्ल्युएंसर’ म्हणून काम करत असते. काही वर्षांपूर्वी लोकांना ‘इन्फ्ल्युएंसर’ हा शब्द देखील माहीत नव्हता. “आमचा मुलगा किंवा मुलगी इन्फ्ल्युएंसर म्हणून काम करतो” असं जर कोणी सांगितला असता तर लोकांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने बोलणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं असतं. पण, आज तसं नाहीये. असंख्य मुलं, मुली आज इन्स्टाग्रामवर इन्फ्ल्युएंसर म्हणून आपला व्यवसाय व्यवस्थितपणे करत आहेत. इन्फ्ल्युएंसरच्या आयुष्यात कोणती आव्हानं असतात? आपल्या भावनांना त्यांना कशी मुरड घालावी लागते? वस्तू विकत घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करता करता त्यांना स्वतःला जगाकडून काय हवं आहे? निखळ मैत्री म्हणजे काय आहे? याचा या तिन्ही मित्रांना कसा विसर पडतो हे दिग्दर्शकाने खूप नेमकेपणाने दाखवलं आहे. ‘मोबाईल, टेक्नॉलॉजीला हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत, आयुष्य नाहीये,’ हे लेखकाने प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
धर्मा – द एआय स्टोरी
मराठीतला पहिला ‘टेक्नो सिनेमा’ म्हणून पुष्कर जोग यांच्या या आगामी सिनेमाकडे बघितलं जात आहे. तेजल पिंपळे यांच्या ‘बी यु प्रॉडक्शन्स’च्या बॅनरखाली निर्मिती होणाऱ्या या सिनेमाचं पुष्कर जोग स्वतः दिग्दर्शन करत आहेत. पुष्कर जोग यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमात दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर या दोन नायिका असणार आहेत. आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिच्या वडिलांना ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची कशी मदत होते? असं सिनेमाचं कथानक आहे.
‘ए आय (AI) म्हणजे एखाद्या वेबसाईटवर दिसणारं चॅट बॉट किंवा सोशल मीडियावर उत्तरं फीड करून ठेवलेला एक पोपटपंची बाहुलं आहे, अशी साधारणपणे प्रेक्षकांच्या मनात संकल्पना आहे. पण ‘धर्मा’ सारख्या सिनेमांमधून प्रेक्षकांना ‘एआय’ची आपल्या आयुष्यात काय गरज आहे? ते केवळ एक मनोरंजनाचं स्थान नाहीये हे कळणार आहे. मराठी सिनेमाला कित्येक पावलं पुढे नेऊन ठेवणारा ‘अनपेक्षित प्रयोग’ अशी निर्मात्यांनी या सिनेमाची जाहिरात केली आहे. 25 ऑक्टोबर 2024 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
कल्की 2898
‘द मास्क’, ‘रोबोट’, ‘रा.वन’ यासारखे सिनेमे बघतांना प्रेक्षकांना असं वाटलं होतं की, यापुढे अजून तंत्रज्ञान काय असू शकेल? पण, तंत्रज्ञानाने आपली कात टाकली आहे. ते लोकांना थक्क करत झपाट्याने पुढे निघून गेलं असं मागच्या 2 वर्षांपासून प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांकडे बघून वाटत आहे. 2898 या वर्षाची कथा सांगणारा ‘कल्की’ हा सिनेमा देखील आजच्या ‘एआय’च्या संकल्पनेतून निर्माण झालेला सिनेमा होता. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांना तरुण दाखवण्यासाठी एआयचा वापर करण्यात आला आहे. सिनेमाच्या सुरुवातीला दाखवण्यात आलेल्या महाभारताच्या युद्धात जखमी झालेले ‘अश्वत्थामा’ दाखवतांना ‘एआय’ निर्मित बिग बी प्रेक्षकांना दिसतात आणि काही वेळासाठी प्रेक्षक आश्चर्यचकित होतात.
कल्की या सिनेमात एकुणातच भविष्यातील आपलं आयुष्य दाखवण्यासाठी तंत्रज्ञानाचा केलेला वापर हा बहुतांश प्रेक्षकांना आवडला. सिनेमाची संथ गती ही काही प्रेक्षकांना खटकली, पण सिनेमाची थीम, सादरीकरण, कृत्रिम भव्य दिव्यता ही लोकांना भावली असं बॉक्सऑफिसचे आकडे सांगतात.
टेक्नो सिनेमा हा बॉलीवूड सिनेमांच्या कंटेंटवर मध्यंतरी निर्माण झालेल्या प्रश्नचिन्हाला पूर्णविराम देईल आणि संबंधित तंत्रज्ञ मंडळींना, ऍनिमेशन उद्योगाला सुगीचे दिवस आणेल. आणि प्रेक्षकांना ‘काहीतरी नवीन’ मोठ्या पडद्यावर बघायला मिळेल अशी आशा करूयात.