कोण जिंकणार? मानव की सूक्ष्मजंतू?

Humans and microbes : सूक्ष्म जीवांची ही दुनिया आपल्या नजरेपलीकडची आहे. ते सूक्ष्मदर्शक यंत्र वापरल्याखेरीज आपल्या नजरेस पडत नाहीत. आणि त्यामुळे त्यांचे अस्तित्व आपणास नेहमी जाणवत नाही.
[gspeech type=button]

प्रश्न वाचून आश्चर्य वाटले ना?

कारण असे काही युद्ध चालू आहे, हे सर्वसामान्य जनतेला माहीतच नसते . पण खरंच अनादि काळापासून हे युद्ध चालू आहे. कारण या पृथ्वीवर ‘Survival of the fittest’ म्हणजे ‘जो सामर्थ्यवान असेल तोच तग धरेल’ हाच नियम चालतो. आणि म्हणून जिवंत राहण्यासाठी मानव आणि जीवजंतू आपापले सामर्थ्य वाढवत एकमेकांशी लढत राहतात.

कोण आहेत हे सूक्ष्मजंतू?

सूक्ष्म जीवांची ही दुनिया आपल्या नजरेपलीकडची आहे. ते सूक्ष्मदर्शक यंत्र वापरल्याखेरीज आपल्या नजरेस पडत नाहीत. आणि त्यामुळे त्यांचे अस्तित्व आपणास नेहमी जाणवत नाही.

हे सूक्ष्मजीव विविध प्रकारचे आहेत.

  • जिवाणू जसे टिबी, टायफॉइड, कॉलरा
  • विषाणू जसे HIV, COVID
  • कवक म्हणजे बुरशी जसे म्युकोर मायकोसिस, Candida आणि
  • परोपजीवी जंतू जसे मलेरिया

आपल्या आसपास सर्वत्र यांचे अस्तित्व असते. जगातील एकही जागा किंवा वस्तू अशी नाही ज्यावर यातील एकदा सूक्ष्मजीव हजर नाही. सर्वव्यापी आणि सर्वसाक्षी असे हे सूक्ष्मजंतू आहेत.

मानवी शरीरावर तसेच मानवी शरीराच्या आतमध्ये देखील विविध सूक्ष्मजीव गुण्यागोविंदाने नांदत असतात. शरीरावर म्हणजे त्वचेवर आणि शरीराच्या आत मध्ये म्हणजे आपल्या नाका तोंडामध्ये, घश्यामध्ये, आतड्यांमध्ये, योनीमध्ये अशा सर्व पोकळ्यांमध्ये अनेक मित्रजंतू राहतात. यांच्यामुळे आपले काही नुकसान न होता आपल्याला फायदे मिळत असतात. मात्र काही जीवजंतू हे मानवी शरीराचे नुकसान करणारे असतात व ते रोग निर्माण करतात, त्यांना रोगजंतू असे म्हणतात. शरीरातील मित्रजंतूंची संख्या कमी झाली की रोगजंतूंचे फावते.

या सूक्ष्म जीवांची एकूण संख्या किती आहे?

सूक्ष्मजीवांची संख्या समजून घेण्यासाठी आधी आपण सध्याची मानवी लोकसंख्या किती आहे हे बघूया. सध्या पृथ्वीवर साधारण 800 करोड मानव आहेत. आणि आपल्यासोबत 1,00,000 करोड म्हणजे एक ट्रिलियन एवढ्या प्रजातींचे सूक्ष्मजीव पृथ्वीवर नांदत आहेत.

या झाल्या सूक्ष्मजीवांच्या प्रजाती पण त्यांची संख्या मग किती आहे? शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की, हे सूक्ष्मजीव एक नॉनीलियन (म्हणजे एकावर 30 शून्ये – दहा लाख ट्रिलियन वेळा ट्रिलियन) अश्या मानवी कल्पनेपलिकडचा संख्येने अस्तित्वात आहेत. थोडक्यात संपूर्ण अंतरिक्षात जेवढे तारे आहेत त्याहून अधिक सूक्ष्म जीवजंतू आपल्या पृथ्वीवर आहेत.

यातील फक्त दहा हजार प्रजातींचा शोध माणसाला लागलेला आहे आणि आपण नशीबवान आहोत की यापैकी केवळ 1400 प्रजाती मानवी आजार निर्माण करू शकतात. अर्थात नवे शोध लागले की या संख्येमध्ये हळूहळू भर पडत जाईल.

हे युद्ध कसे सुरू आहे?

रोगजंतूंना जगण्यासाठी मानवी शरीराची गरज पडते. रोगजंतूने शरीरात प्रवेश केला की ती व्यक्ती आजारी पडते आणि मग त्या व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहसा हे रोगजंतू संक्रमित होतात. आणि अश्या रीतीने त्यांचा प्रसार व वाढ होत राहते.

मानवाला रोगजंतूने मृत्यूमुखी पडायचे नसेल तर मानव विविध उपायांनी रोगजंतूपासून सुरक्षित राहतो किंवा शरीरातून रोगजंतू दूर करून आजार बरा करतो. तसेच रोगजंतूंना पुढच्या व्यक्तीपर्यंत संक्रमित होऊ देत नाही. या प्रयत्नात मानवाचा जय झाला की रोगजंतूंना पुढील मानवी शरीर मिळत नाही आणि जर रोग जंतूंचा विजय झाला तर मानवाला आजारपण आणि मृत्यूला सामोरे जावे लागते.

हे जसे मानवाच्या बाबतीमध्ये सुरू असते तसेच ते प्राण्यांच्या बाबतीत व वनस्पतींच्या बाबतीतही सुरू असते.

विविध उपायांचा वापर करून आतापर्यंत मानवाने देवीच्या रोगावर संपूर्ण विजय मिळवून देवीच्या विषाणूचा नायनाट केला आहे . तसेच पोलिओचा विषाणू आणि नारू रोगाचा परोपजीवी जंतू देखील भारतातून हद्दपार केलेला आहे.

या युद्धासाठी मानवाकडे उपलब्ध असणारी शस्त्रे  

सूक्ष्मजीवांपासून सुरक्षेसाठी मानव विविध उपाय वापरतात त्यातील महत्त्वाचे उपाय म्हणजे सर्वसाधारण व वैयक्तिक स्वच्छता, निर्जंतुकीकरण, लसीकरण, आणि प्रतिजैविकांचा वापर.

1928 साली अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिन या पहिल्या अँटीबायोटिकचा शोध लावला आणि त्यानंतर या सर्व सूक्ष्मजीवांविरुद्ध विविध प्रकारचे अँटिबायोटिक, अँटीव्हायरस, अँटी फंगल अशी औषधे वापरली जाऊ लागली. यामुळे सूक्ष्मजंतू मृत्यू पावत असल्याने आजार लवकर व खात्रीने बरे होत होते.

यांचा वापर मानवामध्ये, विविध पाळीव जनावरांमध्ये तसेच अन्नधान्याच्या सुरक्षेसाठी केला जाऊ लागला. आणि सुरुवातीला यामध्ये मानवाचा विजय होऊन विविध आजार नियंत्रित होऊ लागले.

सूक्ष्मजीवांचा प्रति हल्ला

कोणत्याही औषधाने 100% सूक्ष्मजीव नष्ट होत नाहीत. काही शिल्लक राहतात. तसेच जर ही प्रतिजैविके योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात आणि योग्य काळासाठी वापरली गेली नाहीत तर हे अर्धमेले झालेले सूक्ष्मजीव या औषधाविरुद्ध विविध मार्ग वापरून प्रतिरोध निर्माण करतात. कालांतराने अशा प्रतिरोध-क्षमता असणाऱ्या सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढत राहते. AMR (Antimicrobial Resistance)

कधीकधी म्युटेशन म्हणजे उत्परिवर्तन होऊन जनुकांमध्ये बदल होतो. कधीकधी एखादे नवीन संप्रेरक निर्मिती करून औषध निष्प्रभ करण्याची क्षमता सूक्ष्मजीव निर्माण करतात. याला AMR (Antimicrobial Resistance) असे म्हणतात. पाळीव प्राण्यांमध्ये आणि अन्नसुरक्षेसाठीही मोठ्या प्रमाणामध्ये ही प्रतिजैविके वापरली जात असल्याने त्यांच्यामुळे पर्यावरणातील जीवजंतूही प्रतिरोधक क्षमता निर्माण करतात आणि त्यानंतर ते अन्न व पाण्याद्वारे देखील मानवाला बाधित करू शकतात.

असा प्रतिजैविक प्रतिरोध दिसून आला की, सहसा औषध बदलून वेगळे अधिक प्रभावी प्रतिजैविक वापरल्याने आजार बरा होऊ शकतो. मात्र जसा जसा काळ पुढे जातो तसतसे प्रतिरोधक क्षमता असणाऱ्या जीवजंतूंचे प्रमाण वाढत राहते आणि मग हे आजार बरे होत नाहीत, गंभीर होतात किंवा मृत्यू निर्माण करतात.

सद्यस्थितीत असे अनेक आजारांबाबत दिसून येत आहे. उदाहरणार्थ सामान्य आजार जसे की न्यूमोनिया, टायफॉईड, आणि टीबी हे औषधांना दाद देत नाहीत. नवीन औषधे तयार होण्याचा वेग कमी आहे, त्यामुळे मग उपचाराची शक्यता कमी होत आहे.

जग आणि भारतातील समस्या:

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार, दरवर्षी AMR मुळे 12 लाखांपेक्षा जास्त मृत्यू होतात. 2050 पर्यंत हा आकडा 1 कोटींपर्यंत पोहोचू शकतो.

अँटिबायोटिक वापरामध्ये भारत आघाडीवर

भारत हा जगातील अँटिबायोटिक वापरामध्ये आघाडीवर आहे. तसेच भारतामध्ये या वापरावर पुरेसे नियंत्रण नाही. अगदी कोणीही एखाद्या मेडिकलच्या दुकानात जाऊ शकतो आणि हे सूक्ष्मजीवांसोबतच्या युद्धातील प्रभावी शस्त्र अगदी सहज विकत घेऊ शकतो.किंवा डॉक्टरांनी 500 मिलिग्रॅम ची गोळी सांगितली तर मनानेच अर्धी खायची किंवा सात दिवस खायला सांगितली की, चार दिवसांनी बंद करायची असेही प्रकार भारतातील रुग्ण करतात. भारतामधील विविध पॅथीचे डॉक्टर ऍलोपथीमधील औषधे लिहून देताना योग्य प्रमाणात लिहून देतीलच असे नाही.

औषधांचा चुकीचा व अनावश्यक वापर, स्व-औषधोपचार व औषधांचा अपूर्ण डोस घेणे या कारणांमुळे भारतातील AMR झपाट्याने वाढत आहे. जलद शहरीकरण, सांडपाण्यातील औषधांचे अंश, आणि पशुधनासाठी अँटिबायोटिक्सचा अतिरेक ही आणखी कारणे आहेत.

याविषयीची महत्त्वाची उदाहरणे:

MDR-TB (Multi-Drug Resistant Tuberculosis): टीबीवर प्रभावी असलेल्या औषधांना टीबीचे जंतू आता दाद देत नाहीत. त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असते तसेच उपचारासाठी जास्त संख्येने व जास्त कालावधीसाठी औषधे घ्यावी लागतात. त्यामुळे औषधांच्या प्रभावीपणाची चाचणी केल्याखेरीज सध्या टीबीची औषधे दिली जात नाहीत.

MRSA (Methicillin-Resistant Staphylococcus Aureus): त्वचा आणि रक्तसंसर्गासाठी जबाबदार हे बॅक्टेरिया आता अनेक औषधांना प्रतिकार करू शकतात. यांना सुपरबग असेही म्हटले जाते.

Candida auris: बुरशीचा हा प्रकार सामान्य औषधांवर प्रतिकार करतो आणि गंभीर संसर्ग घडवतो. बुरशी सहसा दवाखान्यांमध्ये दिसून येते. वाढत्या AMR चा भविष्यकाळातील परिणाम:

अगदी साध्या संसर्गांवर उपचार अशक्य होणार.

शस्त्रक्रिया, अवयवरोपण आणि केमोथेरपीसारख्या वैद्यकीय प्रक्रियांमध्ये संसर्ग होऊन मृत्यूचा धोका वाढेल.

अन्नसुरक्षेला धोका निर्माण होईल कारण पशुधनातील AMR मुळे उत्पादकता घटेल.

आरोग्यसेवेसाठी लागणारा खर्च खूपच वाढेल. कारण आजारांमधील गुंतागुंत खूप वाढेल तसेच महागडी औषधे वापरावी लागतील.

प्रतिजैविक प्रतिरोध (AMR )रोखण्यासाठी उपाय:

हे एक जागतिक संकट आहे. कारण असे AMR असणारे जीवजंतू कोणत्याही देशांमध्ये निर्माण झाले तरीही त्यांचा प्रसार इतर देशांमध्ये होऊन त्यामुळे लोक मृत्यूमुखी पडू शकतात. तसेच AMR निर्माण होण्याची अनेक कारणे असल्याने यावरचे उपाय देखील सर्व समाजाला एकत्रित येऊन करावे लागणार आहेत.

यासाठी जागतिक आरोग्य घटनेने वन हेल्थ ही संकल्पना 2015 पासून राबवली आहे. यामध्ये मानवी आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्राण्यांमध्ये आरोग्य तसेच पर्यावरणीय आरोग्य या सर्वांचा एकत्रित विचार होणे अत्यावश्यक आहे हे तत्व वापरले जाते.

भारतानेदेखील या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन AMR कमी करण्यासंदर्भात कृती-आराखडा तयार केला आहे. तसेच सर्वसामान्य जनता, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर यांच्यामध्ये या विषयाची जागृती केली जाते. यासाठी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

आज या लेखातून तुम्हाला या गंभीर विषयाची माहिती समजली असल्याने मानव आणि सूक्ष्मजंतू यांच्या युद्धामध्ये सूक्ष्मजंतूचा विजय होऊ नये यासाठी तुम्ही देखील आपले योगदान अवश्य द्या.

यासाठी करण्यासारख्या काही कृती पुढील प्रमाणे-

1. औषधांचा जबाबदारीने वापर:

Ÿ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका.

Ÿ औषधांचा पूर्ण डोस घ्या, मधेच थांबवू नका.

Ÿ ज्या औषधांच्या पाकिटावर लाल रेष असते ते अँटिबायोटिक्स असतात त्यामुळे त्यांचा वापर हा अधिक काळजीपूर्वक करावा.

2. प्रतिबंधात्मक उपाय:

Ÿ लसीकरण करून शक्य त्या रोगांपासून बचाव करा.

Ÿ हात धुण्याची योग्य सवय ठेवा आणि स्वच्छता पाळा.

Ÿ रुग्णालयातील निर्जंतुकीकरण प्रक्रिया ही अधिक चांगल्या प्रकारे राबवली गेली पाहिजे.

Ÿ रोगप्रसार प्रबंधनाचे सर्व उपाय सल्ल्यानुसार करा.

 3. शेतकी आणि पशुधन व्यवस्थापन:

Ÿ पशुधनासाठी अँटिबायोटिक्सचा गैरवापर थांबवा.

Ÿ पर्यावरणातील औषधांचे अंश कमी करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन करा.

4. वैद्यकीय व्यावसायिक:

Ÿ केवळ आवश्यक असेल अशाच वेळेला अँटिबायोटिक्सचा वापर करावा.

Ÿ विषाणूजन्य आजारांसाठी विनाकारण अँटीबायोटिक वापरू नये.

Ÿ औषध सुरू करताना अँटिबायोटिक सेन्सिटिव्हिटी टेस्ट करायला हवी व त्यानुसार उपचार बदलायला हवेत.

Ÿ उपचारांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

Ÿ जी नवीन औषधे उपलब्ध होतात, त्या औषधांचा वापर हा अतिशय काळजीपूर्वक केला जावा.

Ÿ रुग्णालयांमध्ये स्वच्छता व निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे करावे.

 5. शोध आणि नवकल्पना:

Ÿ नवीन औषधांच्या संशोधनाला प्रोत्साहन देणे व सोयी पुरवणे.

Ÿ स्थानिक व जागतिक स्तरावर AMR च्या अभ्यासाला पाठिंबा देणे.

6. AMR विषयी जागरूकता वाढवणे:

Ÿ जास्तीत जास्त लोकांमध्ये व वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये AMR बद्दल जागरूकता निर्माण करायला हवी.

Ÿ जागतिक स्तरावरील ‘World Antimicrobial Awareness Week’ सारख्या मोहिमांमध्ये सहभाग घ्या.

सूक्ष्मजीवांमधील प्रतिजैविक प्रतिरोध हा आरोग्य, शेती, पर्यावरण, आणि अर्थव्यवस्थेसाठी मोठा धोका आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. आपल्याकडील प्रतिजैविके हे शस्त्र अगदी जपून वापरायला हवे, जेणेकरून या युद्धात सूक्ष्मजीवांचा विजय होणार नाही. ही माहिती इतरांपर्यंत अवश्य पोहोचवा कारण हा लढा हा आपल्याला एकत्रितपणे लढायचा आहे.

3 Comments

  • राजन मोतीराम कवळे

    खूपच छान माहिती आहे

  • Ladda Vinod

    Very Informative! Thank you so much madam

  • Ajit Dhanwate

    या उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद 🙏🌹

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

3 Responses

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ