तो पातशाही पालथी घालेल…!

वेध शिवकाळाचा: छत्रपती शिवराय किती वेगळा विचार करायचे हे अनेक छोट्या छोटया घटनांमधून इतक्या सुरेखपणे समोर येते की त्यांचे विचार, आचार एका उच्च विचाराने मनाला भारून टाकतात. विविध पत्रे, बखरीतील उल्लेख आपल्याला स्तिमित करतात. अशाच एका प्रसंगी राजे उद्गारले होते... तो तर  पातशाही पालथी घालेल....! काय घडले होते त्यावेळी ? हे जाणून घेऊया या लेखात...
[gspeech type=button]

समर्थ रामदासांनी एकेकाळी शंभूराजांना मार्गदर्शनपर असे एक सुरेख पत्र लिहिले होते. त्यात तुमचे वडील कसे वागायचे ते आठवावे आणि त्यानुसार कार्य करत रहावे असे विविध सल्ले जाणतेपणाने देताना ते एक फार मोलाची गोष्ट सांगून जातात. ते लिहितात,

शिवरायाचे कैसे बोलणे

शिवरायाचे कैसे चालणे |

शिवरायाचे सलगी देणे 

कैसे असे ||

किती अचूक शब्द आहेत हे..! खरंच प्रत्येक प्रसंगी शिवछत्रपती खूप वेगळे वागायचे. त्याला कारण होते, त्यांची लहानपणापासून झालेली जडणघडण. मातुश्री जिजाऊसाहेब, कान्होजी जेधे, दादोजी कोंडदेव, माणकोजी दहातोंडे, सोनोपंत डबीर इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे परिपूर्ण असे शिक्षण झाले होते. त्याचेच हे फळ होते. 

 

राजानं सर्व शास्त्रांचा अभ्यास करावा

कोणत्याही राज्यकर्त्याने आपले शरीर बलवान करण्यासाठी, शस्त्रे चालवण्यात पारंगत होण्यासाठी विविध अभ्यास तर करायला हवेतच. पण त्यासोबत इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, राज्यनीती, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, कृषीशास्त्र, लोकांचे आणि शत्रूचे मन समजून घेण्यासाठी मानसशास्त्र इत्यादी बाबींचाही अभ्यास केला पाहिजे असे चाणक्य, शुक्राचार्य, बृहस्पती आदींनी आपल्या प्राचीन ग्रंथात नोंदवून ठेवले आहे. समूहाचा, लोकांच्या भावनांचा विचार करताना तत्कालीन रूढी, परंपरा यांचा पगडा लक्षात घेतला पाहिजे आणि मग परिस्थितीनुसार अचूक निर्णय घेत समूहाला वश करून घ्यावे, त्यांना प्रेरित करावे असेही राज्यशास्त्रात सांगितले जाते. शिवछत्रपती अगदी अचूक असेच वागत राहतात….! 

हेही वाचा – रयतेला मुलाप्रमाणे जपणारे शिवछत्रपती …

चाणक्यनितीचा वापर

सुमारे 400 वर्षांपूर्वीचा तो काळ. त्यामुळे अनेक रूढी, परंपरा, श्रद्धा, अंधश्रद्धा लोकांच्या मनात असायच्या. लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत त्यांना आपल्यासोबत जोडून घेण्यासाठी शिवछत्रपतींनी प्रतापगडच्या युद्धाला सामोरे जाण्यापूर्वी एक गोष्ट केली. एके दिवशी सकाळी उठल्यावर ते म्हणाले, “आज आपल्याला प्रत्यक्ष आई भवानीने स्वप्नात येऊन दर्शन दिले, अफजलखानाच्या सोबत घडणाऱ्या युद्धासाठी आशीर्वाद दिला. आपलाच विजय होणार असं म्हणाली आई भवानी..!” त्याकाळी समाज सश्रद्ध होता. त्यात पुन्हा तुळजाभवानीचे मंदिर खानाने भ्रष्ट केल्याची ताजी घटना समोर होती. त्यामुळे लोकांच्या मनातील त्वेष आणि देव प्रत्यक्ष स्वप्नात येऊन आशीर्वाद देतात यावर असलेली श्रद्धा यांचा योग्य मेळ घालत शिवरायांनी असे विधान केले आणि त्यामुळे सर्व सहकारी आणि सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. प्रत्यक्ष देव पाठीशी आहे ना मग आपण हरणार नाही, मरणार नाही असे वाटून त्यांचा हुरूप वाढला. सैनिकांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रसंगी राजाने आपण देवाचे अवतार आहोत किंवा देवांचा आपल्याला आशीर्वाद लाभला आहे असे जाहीर करावे असे चाणक्य त्यावेळी लिहिलेल्या “अर्थ नीती” म्हणजेच आजच्या दृष्टीने राजनीतीविषयक असलेल्या ग्रंथात सांगतो. योगायोगाने अशीच काहीशी कृती शिवछत्रपती करून जातात आणि दोन थोर माणसे कसा एकसारखा विचार करतात असे वाटत राहते. 

समाजातील लोकांच्या मनात जशा श्रद्धा असतात तशाच अंधश्रद्धादेखील असतात. खूप कठोरपणे त्यावर हल्ला केला तर लोकमानस दुखवण्याची शक्यता असते. त्यामुळे अत्यंत चतुराईने त्यावर मात करावी लागते. अशी चतुराई अंगी असण्यासाठी आधी भरपूर वाचन, प्रसंगावधान आणि हजरजबाबी वृत्ती अंगी असावी लागते. शिवछत्रपती असेच होते. आजच्या लेखाचे जे शीर्षक आहे त्याबद्दलचा किस्सा याचेच सुरेख उदाहरण आहे. 

मुलगा पालथा जन्माला आला!

औरंगजेबाच्या कैदेतून परतल्यावर काही वर्षे शांत गेली आणि युद्धाची धामधूम सुरू झाली. मराठ्यांचे सैन्य मोठ्या वेगाने पुरंदरच्या तहात गमावलेले दुर्ग पुन्हा बळकावू लागले. सर्वत्र मोठे उत्साही आणि विजयी वातावरण निर्माण झाले होते. त्यातच गडावर एकदिवस महाराणी सोयराबाई प्रसूत झाल्या. त्यांना मुलगा झाला. खरंतर ही आनंदाची गोष्ट पण सगळे एकदम दुःखी चेहऱ्याने बसले होते. शिवरायांना बातमी सांगितली गेली. मात्र ज्यांनी बातमी आणली ते आणि सदरेवर असलेले कारभारी वगैरे सारे उदास चेहऱ्याने बसले होते. इतकी चांगली बातमी मग तुम्ही उदास का असं शिवरायांनी विचारताच राणीवशातून ज्याने बातमी आणली ती व्यक्ती उद्गारली, “महाराज अपशकुन झाला आहे. मुलगा पालथा जन्माला आलाय..!” 

हेही वाचा – एका स्वामिनिष्ठेचा सन्मान…

छत्रपती राजाराम महाराजांचा पराक्रम

त्याकाळीच नव्हे तर आजही कित्येक ठिकाणी मूल पालथे जन्माला येणे, मूल पायाळू असणे याबाबत विविध अंधश्रद्धा असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे चारशे वर्षांपूर्वी या घटनेमुळे लोकांना दुःख होणे स्वाभाविक होते. मात्र त्या व्यक्तीच्या तोंडून ते उद्गार ऐकताच थोडेसे थांबून विचार करत राजे उद्गारले.. “अरे मग त्यासाठी दुःख कशाला करायचे ? ही तर फार उत्तम गोष्ट झाली.. हा मुलगा पालथा जन्माला आलाय ना, तो भविष्यात पातशाही पालथी घालेल..! मोगलांचे जुलमी राज्य संपूर्ण उलथून टाकेल..!” ते ऐकताच सर्वांच्या मनावरील सावट क्षणार्धात दूर झाले. लहान बाळाच्या जन्माच्या आनंदात अवघा गड न्हाऊन निघाला. आपल्या या दुसऱ्या मुलाचे नाव शिवरायांनी राजाराम असे ठेवले. जणू प्रभू रामाप्रमाणे तो पराक्रमी व्हावा अशीच त्या पित्याची भावना असावी. आणि त्यांच्या अपेक्षेला जागत, भविष्यात शंभूराजांची क्रूर हत्या झाल्यावरदेखील राजाराम महाराजांनी स्वराज्य झुंजवत ठेवले. ते हयात असेपर्यंतच नव्हे तर त्यानंतर देखील औरंगजेबाला स्वराज्य संपवता आले नाही. उलट मोगलांची पातशाहीच त्यानंतर काही काळाने संपुष्टात आली. भविष्यात दिल्लीवर देखील मराठ्यानी भगवा फडकवला. शिवरायांचे शब्द एका दृष्टीने खरे ठरले..! 

जनसामान्यांच्या मनात रुजलेल्या श्रद्धा –अंधश्रद्धा यांच्यावर ज्याला मात करता येते, लोकाना आपल्याला हवे तसे स्वतःकडे ज्याला वळवून घेता येते तेच लोक असामान्य ठरतात. युगप्रवर्तक ठरतात. आपल्या कृतीने जगाला प्रेरणा देत राहतात. ! काळापुढचा विचार करणारे असे शिवछत्रपती आपल्याला लाभले हे आपले अहोभाग्यच आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने
National Milk Day : राष्ट्रीय दूध दिनानिमित्त भारतातल्या दुग्ध क्रांतीविषयक विशेष लेख.
Vedh Shivkalacha : कोणत्याही युद्धाचे यश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ