नाव ऐकून चमकलात ना? भक्तवत्सल पंढरीनाथांनी त्याच्या भक्तांसाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. धुणी-भांडी केली आहे, पाणी भरलं आहे, बागकाम केलं आहे, कुंभार काम केलं आहे. यासारखीच अजून एक गोष्ट देवाने आपल्या एका भक्तासाठी केली होती. आणि ती परंपरा आजही 300 वर्षांनंतर पाळली जाते.
हलाखिच्या परिस्थितीतही देवधर्म जपणारे महाराज
पंढरपूर जवळ धामणगाव म्हणून एक खेडं आहे. माणकोजी पाटील हे या गावचे पाटील. ते एक निष्ठावंत वारकरी होते. वेगवेगळ्या कारणाने एकेकाळी संपन्न असलेलं हे घराणं आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलं. तरीही घरातली वारीची परंपरा चुकली नाही. सर्व पैसे संपल्याने लाकडे विकून तीन ढब्बू पैसे मिळवायचे. एक ढब्बू पैशाचा शिधा विकत घ्यायचा, एक ढब्बू पैसा चंद्रभागेस दान करायचा आणि एक ढब्बू पैसा ब्राह्मणास दान करायचा हा नियम.
एका वारीला माणकोजी पंढरपुरात आले त्यांनी प्रथेप्रमाणे चंद्रभागेत स्नान करून देवाचं दर्शन घेतलं. त्याचवेळी आंध्र प्रदेशातला एक सावकार पंढरपुरात आला होता. त्यांच्यावतीने मंदिरात ब्राह्मण भोजन सुरू होतं. या भोजनात अकरा रुपये दक्षिणा दिली जात होती. स्वाभाविकपणे सर्व ब्राह्मण तिकडे गेले होते.
देवाचं दर्शन करून महाराज बाहेर आला, तर त्यांना एक ढब्बू पैशाचा शिधा देण्यासाठी तिथं कोणी नव्हतं. त्यांनी मनोमन पांडुरंगाची प्रार्थना केली. पांडुरंगाला आपल्या या भक्ताची दया आली त्याने दुकानदाराचे रूप घेऊन महाराजांना शिधा दिला. तो शिधा वापरून त्यांनी प्रसाद केला. पण प्रसाद घ्यायला सुद्धा कोणी आलं नाही. ही सर्व परिस्थिती पाहून पांडुरंगाने एका गरीब वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि तो वाळवंटात महाराजांकडे येऊ लागला.

विठू रुक्मिणीचं दर्शन
रुक्मिणी मातेला शेजारी पांडुरंग नसल्याचे लक्षात आलं. आणि तिने देवाला विचारलं “मला न विचारता तुम्ही इथे कसे?” शेवटी दोघांनी दाम्पत्याचं रूप घेतलं आणि ते महाराजाकडे आले. ब्राह्मण स्त्रीच्या रुपात आलेल्या रुक्मिणी मातेने स्वतः पानगे केले. ते विठ्ठलाला आणि महाराजांना खाऊ घातले.
महाराजांनी रुक्मिणी मातेला आधी प्रसाद घेण्याची विनंती केली. पण मातेने ती ऐकली नाही. काहीतरी अवीट गोडी या पदार्थात आहे हे महाराजांना समजले. तत्त्वज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाले तर माणकोजी बुवांना साक्षात जगन्मातेने दिलेला हा ब्रह्मरसच होता. त्याची चव अनुपम असणार त्यात काय नवल ? महाराजांना वाटू लागले आता ब्राह्मण पत्नीसाठी काही शिल्लक राहिलं आहे की नाही. त्यांनी त्या ब्राह्मण स्त्रीला विचारलं की, पात्रात काही शिल्लक राहिलं आहे का? मातेने त्यांना पात्र दाखवलं. सगळ्यांची भोजने होऊन देखील त्यात अन्न शिल्लक होते. हे सर्व झाल्यावर श्री रुक्मिणी पांडुरंग अंतर्धान पावले.
बोधले महाराजांची ओवरी
या घटनेला 300 हून अधिक वर्षे होऊन गेली आहेत. तरी आजही ही प्रथा चालू आहे. माणकोजी महाराज यांचे पूर्वीचे आडनाव जगताप. साक्षात पांडुरंगाने त्यांना बोध दिल्याने ते झाले बोधले.
देवळात आजही ईशान्य दिशेला बोधले महाराजांची ओवरी आहे. आणि त्यात पांडुरंगाची माणकोजी महाराजांना तत्वबोध करणारी एक स्वतंत्र मूर्ती विराजमान आहे. बोधले महाराजांची वारी वैशाखात निघते. धामणगाव ते पंढरपूर अशी ही वारी असते. इतर संतांच्या पालख्या पंढरपुरात एकादशीला पोहोचतात. पण धामणगावकरांची वारी मात्र एकादशीला तिथून निघून पंढरपूरला रवाना होते. कारण वैशाखी एकादशीला पांडुरंग धामणगावात असतात असं समजलं जातं. त्यामुळे धामणगावला ‘धाकटी पंढरी’प्रति म्हणूनही ओळखलं जाते.
पानगेचा प्रसादाची लूट
वैशाख वद्य प्रतिपदेला चंद्रभागेचे पूजन होत. पांडुरंगाला अक्षता देऊन पानगे प्रसादाला या असं आवाहन केलं जातं. धामणगावाहून आलेल्या दिंड्या वाळवंटात पुंडलिका जवळ एकत्र होतात. केलेला सर्व प्रसाद हा मध्यभागी मांडला जातो. त्यांच्या कडेने सर्व समाज धामणगावकर बोधले कुटुंबीय जमा होतात. आणि ‘पुंडलिक वरदे’चा गजर करून एकदम उडी टाकून हा प्रसाद लुटला जातो. या प्रसादाचा काही भाग घरी आणून घरच्या धान्य संचयात ठेवला की तो धान्य संचय वर्षभर पुरतो अशी एक लोकश्रद्धा आहे.

महापूजे ऐवजी तुळशी अर्चन पूजा
वैशाख वद्य द्वितीयेला दिंडी, प्रदक्षिणा करून सकाळी दहा ते दुपारी बारा बाजेपर्यंत किर्तन होतं. दुपारी बारा वाजता श्री विठ्ठलाची महापूजा होते. विठ्ठलाची महापूजा ही भल्या पहाटे होते. मात्र याला दोन अपवाद आहेत. पहिला अपवाद ही बोधले महाराजांची महापूजा आणि दुसरा अपवाद म्हणजे अहिल्याबाई होळकर संस्थानातर्फे होणारी पूजा. या दोन पूजा मात्र महापूजा असल्या तरी दुपारी व्हायच्या. आता मंदिर शासनाच्या ताब्यात आल्यानंतर महापूजा ऐवजी तुळशीअर्चना होते.
देवलुटी वारी
पूर्वी माणकोजी महाराज अडचणीत असताना श्री पांडुरंगाने त्यांची आर्थिक विवंचना कमी करण्यासाठी आपल्या अंगावरची भरजरी वस्त्रे प्रावरणे त्यांना काढून दिली होती,असं सांगितलं जाते. देवाने आपल्या भक्तासाठी आपलीच वस्त्रे लुटली म्हणून ही ‘देवलुटी वारी’ म्हटलं जातं.
आता हल्ली या पूजे वेळी बोधले महाराज संस्थानांनी आणलेली वस्त्रे देवास नेसवली जातात आणि बोधले महाराजांच्या वंशजाला देवाचे उपरणे दिले जाते.
हे ही वाचा : गुरु गौरवाची माघी एकादशी
प्रसादाचे पानगे
प्रसादासाठी केले जाणारे पानगे हे या वारीचे वैशिष्ट्य. ज्वारीच्या पिठात चवीप्रमाणे मीठ व इतर मसाले घालून ज्वारीची दामटी करून ती दगडावर भाजायची अशी याची कृती आहे. भक्तीरसाने ओथंबलेली ही पानगी भाविकांची आवडती आहे यात काय ते आश्चर्य..