धुंधुरमासाला धनुर्मास असे देखील ओळखले जाते. सूर्य ज्या वेळेला धनु राशीत असतो, त्या महिन्याला ‘धुंधुरमास’ म्हणून ओळखले जाते. या महिन्यात भल्या पहाटे उठून देवाला नैवेद्य दाखवायची फार प्राचीन परंपरा पंढरपुरात आहे. यंदा 16 डिसेंबर पासून धुंधुरमासाला प्रारंभ झाला. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीपर्यंत धुंधुरमास असतो.
उत्तम खाणे आणि शरीर बळकटीचा काळ
या कालावधीत हेमंत ऋतू असल्यानं साहजिकच अतिशय गारठा असतो. दिवस लहान व रात्र मोठी असते. भाजी-फळं मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भूकही छान लागते आणि पचनक्रियाही चांगली असते. त्यामुळेच हा महिना उत्तमोत्तम खाण्याचा काळ मानला जातो. पण पचतं म्हणून अरबट-चरबट खायचं का? खरं म्हणजे शरीराला बल प्राप्त करून देण्याचा, पौष्टिक खाऊन व्यायाम करून शरीर कमवण्यावर भर द्यायचा असतो. याच काळात निसर्गपूजा करून निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी नैवेद्याच्या ताटात या मोसमात आलेली फळे, हिरव्यागार भाज्या, शेतातून आलेले धनधान्य विठ्ठलाला अर्पण करण्याचा सोहळा असतो.
पांडुरंगाच्या न्याहरी आणि महानैवेद्याचा थाट
पहाटे पांडुरंगाला उठवताना त्याच्या डोळ्याला व तोंडाला पाणी लावून त्याला जागे केले जाते. जागा झाल्यावर लगेचच बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर काकडा केला जातो. काकड्यानंतर सकाळी सहा वाजता उजाडायच्या वेळेस देवाला जेवणाचा नैवेद्य दाखवला जातो. विठू माऊलीचा नैवेद्य म्हणजे त्याचा थाट खासच असणार ना. प्रचंड थंडीत शरीराला उब मिळावी असेच पदार्थ या नैवेद्याच्या पानात असतात. मुगाची खिचडी, तूप, लोणी, बाजरीची भाकरी, लिंबाचे लोणचे, वांग्याची भाजी, शेंग चटणी, दही वाटी, पापड, बासुंदी, तिळाची पोळी, शेंगदाण्याची पोळी, उडदाचा लाडू असा पौष्टिक नैवेद्य देवाला दाखवला जातो. पूर्वी बारसावडे, कटेकर, परिचारक, बडवे हे परिवार देवाला हा नैवेद्य महिनाभर दाखवत असतं. देवाला दाखवून झालेला नैवेद्य घरी आल्यावर अंगत पंगत करून पाहुणेमंडळी, गावातील मित्रमंडळी, वारकरी भाविक एकत्र प्रसाद म्हणून ग्रहण करीत असत. श्री पांडुरंगाला दिवसातून आठ वेळा बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो.
सकाळी 11 वाजता महा नैवेद्यात चटणी, कोशिंबीर, लिंबू, वरण-भात, साखर भात, पंच पक्वान्ने, कढी, उपलब्ध पालेभाज्या, भजी, कोथिंबीर वडी, तुपाची वाटी असा बेत असतो. धुपारतीच्या वेळी पेढे, सायभात, करंजी, मोदक, वाटीभर साय-साखर, दहिभात असा पौष्टिक नैवेद्य दाखवला जातो. मात्र श्री विठ्ठल मंदिर 2014 मध्ये शासनाच्या ताब्यात गेल्यावर मानकऱ्यांकडून या खाद्यसेवा बंद करण्यात आल्या. देवळाचे स्वतःचे स्वयंपाकगृह बांधण्यात आले. आणि आता पांडुरंगाकरता पूर्ण दिवसभराचा नैवेद्य या स्वयंपाकगृहातच तयार करण्यात येतो.
थंडीकरता विठुमाऊलीचा खास पोषाख
थंडीचा तडाखा असल्याने पांडुरंगाला नेहमीच्या पोशाखाशिवाय अंगावर शाल कानपट्टी रोज बांधली जाते. ही कानपट्टी कार्तिकी पौर्णिमेपासून ते वसंत पंचमी पर्यंत बांधली जाते. पांढरी सुती करवतकाठी उपरण्याची ही कानपट्टी असते. याची लांबी सुमारे अडीच मीटर असते. शेजारती झाल्यावर पांडुरंगाला रजईने गुंडाळले जाते. शेजारतीच्या वेळीही चार बेसन लाडू नैवेद्यात असतात. त्याबरोबर शेजघरात पांडुरंगाला एक पेला दूध, एका डब्यात शिरा असा अल्पोपहार रात्रभर ठेवला जातो. दुसऱ्या डब्यातील शिरा आलेल्या भाविकांना वाटला जातो. थंडीमुळे सर्दी, खोकल्याची बाधा होऊ नये म्हणून डाळे आणि ओले खोबरे नैवेद्यात असते. हे ओले खोबरे किसून आणण्याचा मान निंबाळकरांचा होता. जसा पांडुरंगाला हा नैवेद्य दाखवला जातो, तसेच श्रीविष्णूपदावर पहाटे विष्णुसहस्त्रनामाचा पाठ करून शिरा आणि खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. पंढरपुरातील अनेक भाविक अशा प्रकारचा नैवेद्य तयार करून पहाटेच्या वेळी मुख्य मंदिरापासून चार किलोमीटरवर असलेल्या विष्णू पदावर येऊन हा नैवेद्य दाखवतात. आजही पंढरपुरातील काही घरातही देवळात दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्याचा नित्यनेम चालू आहे.
गावकऱ्यांचा रोजच्या सेवेतला सहभाग
पांडुरंगाच्या धुंधुरमासातील सेवेत गावकऱ्यांचा सहभागही असायचा. दुपारी चार वाजता विठ्ठलाचा पोशाख झाल्यानंतर रस्त्यावरून नामदेव पायरी पासून ते महाद्वार घाटापर्यंत देवळाचा सेवेकरी एक फेरी मारायचा. या फेरीत लाडांच्या दुकानातून सुगंधी तेल, कवठेकरांकडून अत्तर व बुक्का, देशपांड्यांकडून पेढे, दुतर्फा असलेल्या दुकानांमधून उदबत्ती,कुंकू; माळी समाजाकडून हार व तुळशी पत्रे फुले; तेली समाजाकडून तेल असं सर्व साहित्य गोळा करून देवळात आणले जाई. या प्रत्येक व्यक्तीचा सहभाग म्हणून या गोष्टी देवाला अर्पण केल्या जायच्या. गवळी समाजाकडून रात्रीच्या धारा काढून झाल्यानंतर निरश्या दुधाचा पेला देवाजवळ ठेवला जायचा.
विठ्ठलाकरता तयार होणाऱ्या खास उडदाच्या लाडवाची कृती
या काळात दाखवल्या जाणाऱ्या नैवेद्यात उडदाचा लाडू हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे त्याची कृती थोडक्यात सांगते आहे.
साहित्य:
एक वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी डिंक, एक वाटी सुकामेवा (बदाम, काजू, अक्रोड), अर्धी वाटी खारीक पूड, दोन चमचे खसखस, दोन चमचे सुंठ पूड, एक वाटी बारीक केलेला गूळ, चार चमचे सुखे खोबरे, अर्धी वाटी तूप, एक चमचा जायफळ पूड.
कृती:
उडीद डाळ फडक्याने स्वच्छ पुसून घ्यावी. कढईत ती गुलबट रंगावर छान परतून घ्यावी. क्रमशः खसखस ,खोबरे हे देखील भाजून घ्यावे. दुसऱ्या कढईत दोन ते तीन चमचे तूप घ्या. कापलेल्या तुपात डिंक तळून घ्या. त्यानंतर सुकामेवा परतून घ्या. उडदाची डाळ गार झाल्यावर मिक्सर वरती त्याची पूड करून घ्या. पूड करताना त्याची पिठी होणार नाही आणि ती भरडही होणार नाही याची दक्षता घ्या. आता सुंठ थोडी परतून घ्या. मिक्सरच्या भांड्यात डिंक वाटून घ्या. नंतर सुकामेवा ओबडधोबड करून घ्या. परातीत उडदाची पूड, वाटलेला डिंक, सुकामेवा, खारीक पूड, खसखस, खोबरे, सुंठ पूड, जायफळ हे सर्व एकत्र करून घ्या. आता कढईत एक वाटी गूळ घेऊन त्यात थोडेसे पाणी घालून गुळ पातळ होऊन एक कढ आला की परातीतील मिश्रणात हा गुळ घाला. गूळ गरम असतानाच सर्व मिश्रण कालवून घ्या आणि हाताला थोडेसे तूप लावून पटापट लाडू वळा. काही वेळा मिश्रण कोरडे होते. अशावेळी पातळ केलेले तूप थोडे थोडे घालून लाडू वळायचे.
मी हे गुळाचे प्रमाण माझ्या आवडीने केले आहे. लाडू अधिक गोड हवे असतील तर दीड ते दोन वाटी गूळ घ्या. मुख्य म्हणजे लाडवाला गूळच पाहिजे असेही नाही. पिठीसाखर घालूनही ते तितकेच चांगले होतात.
इतरत्र धुंदुरमास थोडासा विस्मरणात गेला असला तरी पंढरपूरच्या सांस्कृतिक जीवनाचा तो आजही एक अविभाज्य घटक आहे.
सौजन्य – आशुतोष बडवे