भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि सामाजिक न्यायासाठी अखंड संघर्ष करणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर हे केवळ भारतासाठीच मर्यादित राहिलेले नाव नाही. जगातील थोर विचारवंतांमध्ये डॉ. आंबेडकरांचे आदराने नाव घेतलं जातं. आंबेडकरी विचार हा एक वैचारिक प्रवाह आहे, ज्याने संपूर्ण समाजव्यवस्थेच्या मूलगामी परिवर्तनासाठी अविरत संघर्ष केला आणि आजही करत आहे. धर्म आणि सामाजिक ऐक्य यासंबंधीचे त्यांचे विचार केवळ वैचारिक चर्चेपुरते मर्यादित नव्हते, तर समाजातील खोल मुळात रुजलेल्या अन्याय आणि विषमतेच्या विरोधात पुकारलेला निर्णायक लढा होता. त्यांच्या लढ्याच्या केंद्रस्थानी अर्थातच ‘मानव’ नावाची जात होती. त्यामुळे धर्मशास्त्रांना, पुराणांना, जातीय गुलामगिरीला भेदणे त्यांच्यासाठी सहजसोपे होते.
डॉ. आंबेडकरांची धर्माची चिकित्सा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून
डॉ. आंबेडकर धर्माकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहतात. त्यांच्यासाठी धर्म हा एकाच वेळी समाजासाठी उपयोगी असणारा मार्गदर्शक असा मार्ग आहे तर दुसऱ्या बाजूला एक शोषणाचे साधन देखील आहे. याबाबतीत त्यांचे विचार ई.व्ही. पेरियार रामास्वामी यांच्या विचारांशी साधर्म्य सांगतात. डॉ. प्रमोद रंजन संपादित आणि डॉ. सागर भालेराव यांनी अनुवाद केलेल्या ‘सच्ची रामायण ‘ या पुस्तकात आपल्याला डॉ. आंबेडकर आणि पेरियार यांचे धर्मसंबंधी विचार आणि साधर्म्य पाहायला मिळते. धर्माची चिकित्सा केवळ विरोध म्हणून नाही तर समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांनी केलेली दिसते. त्यामुळे ते धर्माची केवळ उपासना किंवा कर्मकांड म्हणून नव्हे, तर समाजाला नैतिक मार्गदर्शन देणारी यंत्रणा म्हणून विचार करतात.
परंतु, भारतातील हिंदू धर्माच्या रूढी आणि जातिव्यवस्थेने भारलेल्या परंपरांमुळे, धर्माचा मूळ हेतूच बदलला असल्याचे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या ‘जातिचा नाश’ (Annihilation of Caste) या ग्रंथात त्यांनी हिंदू धर्मावरील टीका करताना, जात व्यवस्थेने माणसाच्या मूलभूत स्वातंत्र्यावरच घाला घातल्याचे ठामपणे सांगितले. त्यांच्या मते, जो धर्म माणसाला हीन वागणूक देतो, मानवाची मन:शांती हिरावतो, त्याच्या स्वाभिमानावर घाला घालतो, तो धर्म धर्मच नाही. जातीय उतरंड त्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय समाजाला समजून सांगितली. आजवर अशी उतरंड, अशी व्यवस्था, अशा चालीरीती आणि मानवी समुहाचे शोषण, या सर्वांची इतकी स्पष्ट आणि मुद्देसूद मांडणी कुणीही केली नव्हती. अर्थातच महात्मा फुल्यांच्या विचारसरणीचा प्रभाव डॉ. आंबेडकरांवर आपल्याला पाहायला मिळतो.
धर्माचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक
“धर्म हा माणसासाठी असतो, माणूस धर्मासाठी नसतो,” ही त्यांची समज होती. धर्माच्या नावाखाली जर माणूस आपले जीवनच गुलामगिरीच्या खोल दरीत लोटून देत असेल , तर अशा धर्माचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे, असे ते मानत. म्हणूनच त्यांनी 1956 मध्ये, हिंदू धर्म सोडून, बौद्ध धर्म स्वीकारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हे केवळ एका धर्माचा त्याग आणि दुसऱ्या धर्माचा स्वीकार नव्हता, तर त्या निर्णयामध्ये एक व्यापक सामाजिक क्रांती लपलेली होती. बौद्ध धर्माचे करुणा, समता आणि विज्ञानाधिष्ठित तत्त्वज्ञान हे आंबेडकरांच्या आधुनिक आणि न्यायप्रधान समाजाच्या कल्पनेशी जुळणारे होते. त्यामुळेच त्यांनी जवळपास पाच लाख अनुयायांसह एक नवा धर्म स्वीकारला. भारतातील धार्मिक सुधारणेच्या इतिहासात हा नवा अध्याय होता. आंबेडकरांचे सामाजिक ऐक्याचे विचारही धर्माच्या सुधारणेशी निगडित आहेत. त्यांच्या मते, केवळ संविधानात स्वातंत्र्य, समता , बंधुता आणि सामाजिक न्यायाचा उल्लेख करून भागणार नव्हते. ही तत्त्वे प्रत्येक भारतीयाच्या जीवनात व्यवहारात उतरली पाहिजेत, हे त्यांचे स्वप्न होते. लोकशाही व्यवस्थेचा पाया फक्त निवडणुकांमध्ये नव्हे, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने दुसऱ्याला माणूस म्हणून स्वीकारण्यात आहे, हे त्यांनी सतत बजावले. स्त्रियांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेने जे काम केले ते अन्य कोणत्याही विचारधारेने केले नाही हे सत्य आपल्याला स्वीकारावे लागेल.
जातीच्या प्रश्नावर कुऱ्हाड
डॉ. आंबेडकरांच्या मते भारतातल्या सामाजिक एकतेच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे जातिव्यवस्था होती. जन्मावर आधारित समाजातील स्थान आणि त्याद्वारे मिळणारी पशुसमान वागणूक डॉ. आंबेडकरांनी स्वतः अनुभवली होती. विषमतावादी समाज कधीच प्रगती करू शकत नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते. जातीचे इमले पाडायचे असतील तर जातिव्यवस्थेच्या मुळावर घाव घालावा लागेल असे त्यांचे मत होते. याचाच परिपाक म्हणून त्यांनी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम केला. मनुस्मृतीचे दहन करून काही जातव्यवस्था संपुष्टात येणार नव्हती हे डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनादेखील माहित होते. मात्र त्यांच्या या अभिनव कृतीतून संपूर्ण वंचित समुदायात एक नवचैतन्य संचारले आणि आपण धर्मसत्तेला प्रश्न विचारू शकतो हा त्यांचा आत्मविश्वास दृढ झाला. जातीच्या निर्मूलनाविना खऱ्या लोकशाहीचे स्वप्न कधीच साकार होऊ शकत नाही, याची त्यांना पूर्ण जाणीव होती.त्यामुळे संविधान सभेतील त्यांचे शेवटचे भाषण याच आगतिकतेतून त्यांनी केलेले आपल्याला आढळते.
शिक्षण हे वाघिणीचे दूध
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याची आंबेडकरांची ठाम धारणा होती. त्यांनी स्वतःच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून जे काही परिवर्तन घडवून आणले ते आपण सर्वच जाणतात. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही असे ते म्हणत. समाजातील वंचित घटकांनी शिक्षणाच्या माध्यमातून जागृत होणे, आणि सशक्त होणे हे सामाजिक समतेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे, यावर त्यांनी नेहमी भर दिला. शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्यासाठी नसून, नागरिकांची समज, विवेक, नैतिकता आणि आत्मसन्मान निर्माण करणारे साधन असले पाहिजे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. याच विश्वासातून त्यांनी स्वतः शिक्षणसंस्था उभ्या केल्या.
हेही वाचा – ‘पुस्तकं’ आंबेडकरी संस्कृतीचं अविभाज्य अंग
धर्मांतर आणि काही प्रश्न
आधुनिक काळात धर्माची आवश्यकता आहे का? असा सवाल आंबेडकरांनी केला. जगभरातील धर्मशास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर विषमतेवर आधारित हिंदू धर्म सोडणार असल्याचे त्यांनी घोषित केले. येवला इथे 1935 साली केलेल्या भाषणात त्यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा केली. पारंपरिक धर्म , कर्मकांड आणि अंधश्रद्धा ही माणसाच्या स्वतंत्र विचारशक्तीला बाधक ठरते, असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी मोठ्या विचाराअंती बौद्ध धर्मातल्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर भर दिला आणि हा धर्म स्वीकारला. बुद्धाचे तत्त्वज्ञान हे केवळ अध्यात्मिक मार्गदर्शन नव्हते, तर एक सामाजिक आणि राजकीय विचारप्रणालीदेखील आहे, असे ते मानत. इतिहासाच्या पटलावर बौद्ध परंपरेला तत्कालीन धर्मपंडितांनी दिलेला त्रास त्यांना ठाऊक होता. विद्रोहाचा इतिहास असलेला, समतेचा विचार सांगणारा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला.
14 ऑक्टोबर 1956 साली त्यांनी धर्मांतर केले आणि 6 डिसेंबर 1956 ला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. धर्मांतर केल्यानंतर डॉ. आंबेडकरांना त्यांच्या अनुयायांना मार्गदर्शन करण्यासाठी फारसा कालावधी लाभला नाही. त्यांच्या मृत्यूनंतर नवबौद्ध समुदायाच्या सामाजिक सुधारणांच्या मार्गावर अनेक अडथळे होते, आजही आहेत. जातीयवाद, धार्मिक कट्टरता, आणि पुरातन व्यवस्थांवर आधारलेली मानसिकता ही आंबेडकरी समुदायाच्या वाटेत वारंवार आली. खरे तर डॉ. आंबेडकरांनी संविधानात दिलेले मूलभूत अधिकार, समानता, धार्मिक स्वातंत्र्य यांमुळे आजच्या भारतात अनेक सुधारणा घडल्या, पण त्यांच्या संघर्षाची पूर्ण फलश्रुती अजून बाकी आहे, हे ही खरेच आहे. आजही राजस्थानमध्ये दलित समाजातील नवरदेवाला घोड्यावर बसून मिरवणूक काढता येत नाही. आजही हरयाणामध्ये दलित युवकांना मिशी ठेवली म्हणून मारहाण केली जाते. अस्पृश्यता निर्मुलन झाल्याची घोषणा आपण केली असली तरी आजही अनेक ठिकाणी दलित, वंचित समुदायांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
हेही वाचा – सामाजिक समतेचा मूलमंत्र हा शैक्षणिक क्रांतीतूनच – डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक विचार
आजही देशात धार्मिक असहिष्णुता, जातीय अत्याचार, आणि सामाजिक विषमता वाढत चालली आहे. अशा वेळी आंबेडकरांचे विचार अधिकच सुसंगत आणि प्रेरणादायी ठरतात. त्यांनी दिलेला ‘बंधुता’चा संदेश सामाजिक सलोख्याचा पाया आहे . खरे तर हाच विचार आजच्या विखुरलेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणू शकतो. यासाठी आवश्यकता आहे ती विवेकी नेतृत्वाची. विवेकी समाज विवेकी संस्कृती निर्माण करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मस्वातंत्र्य आणि सामाजिक ऐक्याबद्दलचे विचार हे केवळ भारतापुरते मर्यादित नाहीत. ते सर्व मानवजातीसाठी प्रेरणास्रोत आहेत.माणुसकीच्या मूल्यांवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सजग होणे आवश्यक आहे.