इस्रायल आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या संघर्षा मध्ये अमेरिकेने थेट उडी घेतली आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराण खूप संतापला आहे. इराणने या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याचं ठरवलं आहे.
इराणने त्यांच्या संसदेमध्ये होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद करण्याचा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे दळणवळणासाठी उपयुक्त असलेला हा मार्ग आता कधीही बंद होऊ शकतो. ‘आम्हाला जेव्हा योग्य वाटेल, तेव्हा आम्ही हा मार्ग बंद करू’, असं इराणच्या लष्करी अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितलं आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का आहे?
तुम्हाला वाटेल, की समुद्रातला एक रस्ता बंद केला तर काय होईल? पण , हा समुद्राचा रस्ता खूप छोटा असला तरी, तो पुर्ण जगासाठी खुप महत्त्वाचा आहे. जगातील तेल आणि वायू पुरवठ्यासाठी ही सामुद्रधुनी अत्यंत महत्त्वाची आहे.
हा मार्ग नकाशावर जरी छोटा दिसत असला तरी, जगातील सुमारे 20 टक्के ते 30 टक्के तेलवाहू जहाजे याच मार्गातून जातात. म्हणजे, जगाला लागणारे बहुतेक तेल, पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू मध्य पूर्वेतील देशांकडून युरोप, अमेरिका, आशिया आणि इतर अनेक देशांना याच मार्गाने पोहोचवले जाते. यामुळेच याला जगातील ‘तेल पुरवठ्याचा मुख्य रस्ता’ असं म्हटलं जातं.
हेही पहा : Iran – Israel Conflict | इराण – इस्रायल संघर्षाचा भारतावर होणारा परिणाम किती गंभीर?
जर हा रस्ता बंद झाला, तर काय होईल?
हा रस्ता बंद झाला, तर त्याचे परिणाम खूप गंभीर असतील आणि ते फक्त एका देशाला नाही, तर संपूर्ण जगाला भोगावे लागतील.
- तेलाच्या किमती वाढतील
जगात तेलाचा पुरवठा लगेच कमी होईल आणि यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर आकाशाला गवसणी घालतील. सध्या फक्त धमकीमुळेच तेलाचे दर थोडे वाढले आहेत. मात्र जर हा मार्ग बंद झाला तर एका बॅरल तेलाची किंमत 120 ते 150 डॉलरच्या वर जाऊ शकते.
- ऊर्जा संकट येईल
भारत, चीन, जपान आणि युरोपमधील अनेक देश मध्य पूर्वेकडील तेलावर खूप अवलंबून आहेत. जर तेलाची आयात थांबली तर या देशांमध्ये तेलाची आणि गॅसची मोठी कमतरता निर्माण होऊ शकते. परिणामी या देशांमध्ये महागाई वाढेल, उद्योगधंदे बंद पडू शकतात आणि देशांच्या आर्थिक व्यवस्थेवर खूप वाईट परिणाम होईल. युरोप तर आधीच युक्रेन युद्धामुळे अडचणीत आहे, जर कतारमधून येणारा एलएनजी वायू थांबला तर त्यांची अडचण अजून वाढू शकते.
- जागतिक अर्थव्यवस्थेला फटका
आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी या संस्थेनेही सांगितलं आहे की, जर थोड्या काळासाठीही होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाली, तर तेलाच्या बाजारात मोठा गोंधळ निर्माण होईल. सध्याच्या जागतिक परिस्थितीत, तेलाचा पुरवठा सुरक्षित ठेवणे ही जगाची खूप मोठी गरज आहे.
म्हणूनच, होर्मुझची सामुद्रधुनी हा केवळ एक जलमार्ग नाही, तर हा भाग जगाच्या अर्थव्यवस्थेचा आणि ऊर्जा निर्मितीसाठी साठी मुख्य रस्ता आहे.
भारताला धोका का आहे?
‘होर्मुझची सामुद्रधुनी’ हा समुद्राचा खूप अरुंद रस्ता आहे, जो पर्शियन आखाताला अरबी समुद्राशी जोडतो. संरक्षण तज्ज्ञ सांगतात की, जर हा रस्ता बंद झाला किंवा इथे काही अडथळा निर्माण झाला, तर त्याचा जगावर आणि विशेषतः भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर म्हणजेच देशाला लागणारे पेट्रोल, डिझेल मिळवण्यासाठी अनेक अडथळे येतील. याचा परिणाम खालील काही गोष्टींवर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
– पेट्रोल-डिझेल महाग
जर तेल महाग झालं, तर इंधनाचे दर गगनाला भिडतील. याचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर होईल. वाहतूक, वस्तूंचे दर, जीवनावश्यक वस्तू महाग होतील.
– वाहतुकीचा खर्च वाढेल
तेल येणाऱ्या जहाजांना दुसरा मार्ग घेऊन यावं लागेल, त्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढतील.
– उद्योगधंदे अडचणीत
रसायने, खतं, ऊर्जा क्षेत्र, वाहतूक, उत्पादन –हे सगळे क्षेत्रं यावर अवलंबून आहेत. तेल महाग झालं की उत्पादनही महाग होईल.
– भारताच्या परकीय व्यापारावरही परिणाम
भारत देश आखाती देशांशी खूप मोठा व्यापार करतो. जर हे रस्ते बंद झाले तर शिपिंग खर्च वाढेल, वेळ लागेल आणि व्यापारात अडथळे येतील.
भारतकडे यावर काही पर्याय आहेत का?
भारताकडे काही प्रमाणात मोठ्या तेल साठवणुकीच्या जागा (Strategic Oil Reserves) आहेत. याचा उपयोग काही काळासाठी भारताला करता येईल. पण, जर हा अडथळा जास्त काळ राहिला, तर मात्र भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप दबाव येईल. भारत सध्या इतर देशांसोबत चर्चा करत आहे. रशिया, अमेरिका, सौदी अरेबिया यांच्याकडून दुसरे मार्ग वापरून तेल मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे.
हेही वाचा : भारताकडे इंधनाचा पुरेसा साठा आहे; केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पूरी यांची माहिती
होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यास इराणलाही फटका बसेल
इराण भलेही होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याची धमकी अमेरिकेवर दबाव आणण्यासाठी देत असेल. पण हा निर्णय त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे. कारण इराण स्वतः जे काही तेल परदेशात विकतो ते याच होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाते. जर त्यांनी हा रस्ता बंद केला, तर त्यांच्या तेलाची विक्री आणि उत्पन्न थांबेल.
आधीच अमेरिकेने त्यांच्यावर अनेक निर्बंध लादले आहेत. ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. अशा स्थितीत उत्पन्नाचा हा मार्ग बंद झाल्यास इराणची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडू शकते.
जर इराणने खरंच ही सामुद्रधुनी बंद केली, तर अमेरिका आणि त्यांचे मित्र देश सैनिकी कारवाई करू शकतात. कारण, हा जगाच्या ऊर्जेचा मुख्य मार्ग आहे आणि कोणताही देश हा मार्ग बंद करू देणार नाही.
तसंच, चीनसारखे देश जे आजही इराणकडून तेल विकत घेतात. ते सुद्धा असा निर्णय घेतल्यास इराणच्या विरोधात जाऊ शकतात. यामुळे इराण जागतिक पातळीवर एकटा पडू शकतो.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी चीनला आवाहन केलं आहे की, त्यांनी इराणवर दबाव आणावा जेणेकरून हा तणाव वाढू नये. त्यांनी इशारा दिला आहे की, जर इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, तर अमेरिका आणि त्याचे मित्र देश त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार आहेत.
भारताचे केंद्रीय तेल मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी भारताकडे उपलब्ध असलेल्या तेलसाठ्याची आणि भारतासमोर असलेल्या अन्य तेल पुरवठा देशांविषयीची माहिती दिली आहे. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनीचा मार्ग जर बंद झाला तर भारतावर कितपत परिणाम होईल हे त्याचवेळी नेमकं समजू शकते.