कोणार्क, ओडिसा येथील सूर्यमंदिर मानवाने बनविलेल्या सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एक आहे. प्रसिध्द पुरातत्त्वशास्त्रज्ञ सर जॉन मार्शल यांनी कोणार्क मंदिराबाबत पुढील उद्गार काढले आहेत, “हिंदू धर्माचे असे कोणतेही स्मारक नाही जे एकाच वेळी इतके भव्य, परिपूर्ण आणि प्रमाणबद्ध आहे. आणि तसेच ते आपल्या स्मृतीवर ठळक ठसा उमटवते.”
कोणार्क सूर्यमंदिर कलिंगातील पूर्व गंग वंशातील नरसिंह पहिला राजाने तेराव्या शतकाच्या मध्यात बांधले. नरसिंह पहिला गंगा साम्राज्यातील सर्वात शक्तिशाली शासक होता. इसवी सन 1238 मध्ये त्याचा राज्याभिषेक झाला. त्याचा काळ ओडिशाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा काळ होता. कारण याच वेळेस उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूने शक्तिशाली शत्रू ओडिशावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करत होते. पण नरसिंह राजाने त्या सर्वांचा निकराने पाडाव केला. हे मंदिर नरसिंह राजाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आणि यशाचे शाश्वत प्रतीक आहे.
मंदिराच्या स्थापत्याबाबत इंटरनेटवर बरीच माहिती उपलब्ध आहे. पण या लेखात या मंदिराशी निगडीत काही इतर माहिती जाणून घेवू.
‘कोणार्क’ शब्दाची व्युत्पत्ती
मागील लेखात पाहिल्याप्रमाणे कोणार्क सूर्योपासनेचे तिसरे केंद्र मानले गेले आहे. पुराणांतील मुंडीर, सुतिरा आणि उदयाचल ही ठिकाणे प्रसिद्ध कोणार्कच्या स्थळाशी जुळविली जातात. कोणार्क मंदिराच्या नावाची उत्पत्ती येथील अधिष्ठात्री देवता ‘कोणार्क’ पासून झाली असावी. कोणार्क शब्दाची फोड केली असता, ‘अर्क’ म्हणजे सूर्य आणि ‘कोण’ म्हणजे कोपरा. म्हणूनच कोणार्क म्हणजे कोपऱ्यातील सूर्यदेव.
गंग साम्राज्याच्या शिलालेखांमध्येही या ठिकाणाचा उल्लेख ‘कोनकोण’ असा करण्यात आलेला आहे. त्यामुळे असे दिसून येते की ‘कोणा’ हा शब्द दक्षिण-पूर्व कोपऱ्याचा संदर्भात वापरला आहे. वराहमिहिराने त्याच्या ‘बृहत्संहितेमध्ये कलिंग दक्षिण-पूर्व दिशेस असल्याचे (आग्नेय दिशा) सांगितले आहे. सरला दास आपल्या 15व्या शतकातील ओडिया महाभारतात कोणार्कशी संबंधित एक कथा सांगतात. त्यांच्या मते, अग्निकोन (पृथ्वीच्या आग्नेय कोपऱ्यात) सूर्यदेवाने अर्क नावाच्या असुराचा वध केला, त्यामुळे ह्या ठिकाणाला कोणार्क हे नाव प्राप्त झाले.
त्यामुळे ‘कोण’ हा शब्द दक्षिण-पूर्व (आग्नेय) दिशा दर्शवतो. ओरिसाच्या लिंगराज, जगन्नाथ इत्यादी इतर प्रमुख मंदिरांमध्येही सूर्यदेवाची पूजा आग्नेय कोप-यातच केली जाते.
स्थळमहात्म्यांची रचना
नरसिंह राजाने कोणार्क सूर्यमंदिराची निर्मिती केल्यानंतर, मंदिराचे धार्मिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी अनेक ग्रंथ रचले गेले. या ग्रंथांना क्षेत्रमहात्म्ये किंवा स्थळमहात्म्ये म्हणतात. एखाद्या ठिकाणाचे महत्त्व आणि गौरव सांगणारे हे ग्रंथ होत. यातील काही महात्म्ये नंतरच्या काळात काही सुप्रसिद्ध पुराणांमध्ये समाविष्ट केली गेली.
सूर्यपूजेची पद्धत
संस्कृत भाषेतील प्रसिध्द सांब पुराण प्राचीन भारतातील सूर्यपूजेसाठी प्रमाण मानले जाते, हे आपण गेल्या लेखात पाहिलेच आहे. मात्र, या ग्रंथात कोणार्कचा स्पष्ट उल्लेख आढळत नाही. या ग्रंथात सांबची पारंपरिक कथा आणि पंजाबमधील चंद्रभागा (चेनाब) नदीच्या काठावरील मित्रवन येथे बांधलेल्या पहिल्या सूर्य मंदिराची माहिती दिली आहे. ब्रह्मपुराणात अठ्ठाविसाव्या अध्यायात कोनादित्य क्षेत्रमहात्म्याचा उल्लेख आढळतो. या अध्यायात कोणार्क स्थानमहात्म्यासोबतच सूर्यपूजेची पद्धत सांगितली आहे. त्यात समुद्रस्नान, मंदिराची तीन वेळा प्रदक्षिणा, आणि कोणार्कची पुष्पे, धूप, दीप, नैवेद्य, दंडवत, आणि प्रणिपात अशी पूजापध्दती दिली आहे. ब्रह्म पुराणातील कोनादित्य क्षेत्र महात्म्य 13व्या शतकात लिहिले गेले असावे.
कृष्णाची चार क्षेत्रे
पंधराच्या शतकात रचलेल्या कपिल संहितेमध्ये कृष्णाच्या चार क्षेत्रांचे वर्णन केले आहे. पुरुषोत्तम क्षेत्र (पुरी), अर्क (कोणार्क), पार्वती (जयपूर), आणि हर (एकाम्र-भुवनेश्वरमध्ये स्थित). कपिल संहितेमध्ये मैत्रेयवन किंवा कोणार्कचे हिंदू धर्मातील महत्त्वपूर्ण तीर्थस्थान म्हणून वर्णन येते. या ग्रंथाचा सहावा अध्याय कोणार्क क्षेत्रमहात्म्यासाठी समर्पित आहे. 1815 मध्ये, कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांना ओडिशामध्ये कोणार्क क्षेत्रमहात्म्य नावाचे एक हस्तलिखित सापडले. अभ्यासावरून असे लक्षात आले की, हे हस्तलिखित एक मोठ्या ग्रंथाचा भाग असावा. मात्र तो ग्रंथ संपूर्ण रूपात सध्या उपलब्ध नाही.
पुराणांमधील उल्लेख
कोणार्क सूर्यपूजेचे एक प्रसिद्ध तीर्थ म्हणून भारतभरात प्रसिद्ध होते. यासंदर्भात काही पुरावे सापडतात. मिथिला (सध्याच्या बिहार) येथे सापडलेल्या प्रमाण पल्लव या 13व्या शतकातील नरसिंहाशी संबंधित हस्तलिखितात कोणार्कचा स्थळाचा उल्लेख प्रयाग, गया, पुरुषोत्तम इत्यादी महत्त्वाच्या तीर्थस्थळांसोबत करण्यात आला आहे. याशिवाय तीर्थ चिंतामणी (वाचस्पती मिश्रा, 15 वे शतक), तीर्थसार (नरसिंह प्रसाद, 1490-1515) आणि पुरुषोत्तम (रघुनंदन, 16 वे शतक) इत्यादी ग्रंथातही कोणार्क तीर्थाचे महत्व सांगितले आहे.
सूर्यमंदिरातील उत्सव
कोणार्क क्षेत्री साजऱ्या होणाऱ्या उत्सवांचे वर्णन उपरोल्लेखित स्थलपुराणांमध्ये येते. ब्रह्म पुराणात माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला साजऱ्या होणाऱ्या माघ सप्तमीच्या विधींचे वर्णन केले आहे. तसेच चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील मदन भंजिका या सणाचाही उल्लेख आढळतो. ब्रह्म पुराण अयन (सूर्याच्या संक्रमणाचे काळ), उत्थापन, संक्रांती (उत्तरायण), रविवार, सप्तमी तिथी, आणि विविध सणांच्या प्रसंगी कोनादित्य क्षेत्राला भेट देण्यास सांगते. कपिल संहितेमध्ये कोणार्क रथोत्सवाचा उल्लेख येतो.
सूर्यमंदिराची पडझड
1626 च्या आधीच कोणार्क सूर्यमंदिर ओसाड झाले होते आणि तेथील पूजाही थांबली होती. जगमोहन किंवा प्रवेशमंडपापेक्षा जास्त उंच असलेले मुख्य मंदिर हळूहळू कमजोर होत गेले आणि त्याचा उरलेला भाग ऑक्टोबर 1848 मध्ये आलेल्या जोरदार वादळामुळे कोसळला. 19व्या शतकात मंदिराची भव्य चाके वाळूखाली दडली गेली होती. जगमोहन मंदिरी तुलनेने अधिक शाबूत राहिले. 1903 मध्ये बंगालच्या तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर जे.ए. बर्डिलन यांच्या आदेशानुसार त्यात वाळू भरण्यात आली. कारण मंदिर जतन करण्याचा हा एकमेव मार्ग त्याकाळात मानला गेला. पुढे 22 मार्च 1915 रोजी कोणार्क मंदिर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. मानवजातीसाठी त्याच्या अद्वितीय वैश्विक मूल्यामुळे, 1984 मध्ये मंदिराचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. सध्या भारताच्या पुरातत्त्व विभागाद्वारे मंदिराच्या संवर्धनाचे काम अखंड सुरु आहे.