आपण बऱ्याच वेळा डॉक्टरांकडे नियमित तपासणीसाठी जातो, रक्त तपासण्या करतो, औषधं घेतो आणि त्यांचे सल्ले ऐकतो. पण तरीही काही गोष्टी आपल्याला कोणीच स्पष्टपणे सांगत नाही. आजार नियंत्रणात असूनही मनात राहणाऱ्या शंका, न सांगितलेली माहिती आणि आपल्या विचित्र सवयींमुळे आरोग्य बिघडण्याचा धोका वाढतो. हेच काही मुद्दे “Doc never told me this!” या शीर्षकाखाली पाहूया.
डायबिटीस :
साखर वाढते म्हणून औषधं घेतली जातात, पण जेव्हा Metformin सारखी गोळी प्रिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिली जाते तेव्हा प्रदीर्घ वापरामुळे B12 व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे थकवा, चक्कर, न्यूरोपथी होते. यावर B12 ची सप्लीमेंट आवश्यक आहे, पण फार कमी डॉक्टर ते सांगतात.
मधुमेही रोग्यांना HbA1Cचा रिपोर्ट काढायला सांगितला जातो. HbA1c फक्त एक आकडा नसून तुमच्या भविष्यातील किडनी, डोळे आणि मेंदूच्या आरोग्याचा आरसा आहे. त्या रिपोर्टला सिरियसली घेणं फार गरजेचं आहे.
ब्लडप्रेशर :
बीपी कंट्रोल मध्ये आहे म्हणजे फक्त चालू गोळी घेतली इतकं पुरेसं नाही. सतत कमी BP असणं म्हणजे पाणी कमी पिणं, शरीरातील मीठ कमी होणं, हार्मोनल असंतुलन अशी कारणे असू शकतात.
तसच सतत जास्त बीपी असेल तर जसं पाइपमध्ये कचरा किंवा अडथळा असेल तर जास्त प्रेशर लागतं, तसं रक्तवाहिन्यांमध्ये फॅट असेल तर बीपी वाढतं. हे कुठेही सांगितलं जात नाही. त्यामुळे कमी कर्बोदकांवर लक्ष द्यायला हवे.
हे ही वाचा : द फाउंडेशन ऑफ फार्मसी टू फिटनेस
वजन कमी करणं :
इंटरनेटवर बघून ट्रेंडिंग/फॅड डाएट्स करताना फॅट बरोबर स्नायूंची हानी होते हे कोण सांगतो? ज्यामुळे तुमचं BMR कमी होतं आणि पुन्हा वजन वाढतं. वेट लॉस हा नंबर नाही, तर “इंटरनल रीबूट” आहे. फक्त कॅलरी नाही, इंफ्लेमेशन, हार्मोन आणि स्लीप सायकलवर त्याचा प्रभाव दिसून येतो.
कुटुंब नियोजनाची औषधं :
विशेषतः महिलांमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्यांचा वापर हा एक अतिशय सामान्य प्रकार आहे. पण त्या घेत असताना इतर औषधं, विशेषतः आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा अँटीबायोटिक्स घेतली जात असतील तर त्याचा परिणाम गंभीर होऊ शकतो.
कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या आणि अँटीबायोटिक्स
उदाहरणार्थ, जर एखादी महिला Oral Contraceptive Pills (OCPs) घेत असेल आणि तिला सर्दी, खोकला, urine tract infection मुळे अँटीबायोटिक दिलं गेलं, तर त्या अँटीबायोटिकमुळे OCP चा प्रभाव कमी होतो. यामुळे अनपेक्षित गर्भधारणा होण्याचा धोका वाढतो. डॉक्टरने हा मुद्दा सांगितला नाही किंवा पेशंटने कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतल्याचं सांगितलं नाही तर ही महत्त्वाची गोष्ट लक्षातच येत नाही.
आयुर्वेदिक औषधं आणि OCP
बऱ्याच वेळा स्त्रिया पाळी अनियमित आहे म्हणून आयुर्वेदिक गोळ्या घेतात (जसं की अशोकारिष्ट, शतावरी कल्प, कुंजल सिरप इत्यादी) आणि त्याच वेळी OCP सुद्धा चालू ठेवतात. काही आयुर्वेदिक घटक हार्मोन्सवर परिणाम करतात, त्यामुळे OCP चा प्रभाव बिघडतो. विशेषतः यकृतावर काम करणाऱ्या औषधांमुळे हे घडू शकतं.
OCP आणि होमिओपॅथी
अनेक स्त्रिया होमिओपॅथिक औषधं गर्भाशयाचे दुखणे, थकवा, मासिक पाळीचे त्रास यासाठी घेत असतात. पण होमिओपॅथिक औषधांच्या डायनॅमिक रचनेमुळे शरीराच्या हार्मोनल समतोलात हस्तक्षेप होऊ शकतो, जो OCP च्या कामात अडथळा ठरू शकतो. विशेषतः एकाच वेळी अनेक प्रणालीतील औषधं (Homoeo + Allo + Ayurvedic) चालू असतील, तर पेशंटला थेट किंवा अप्रत्यक्ष साइड इफेक्ट्स जाणवू लागतात – वजन वाढणे, मासिक पाळीचा गोंधळ, त्वचेवर पुरळ येणे, केसगळती इत्यादी.
हे ही वाचा : ‘औषधे आणि खाद्यपदार्थांचे’ इंटरॲक्शन!
डॉक्टरला संपूर्ण माहिती देणं का गरजेचं आहे?
आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा “फक्त माझ्या आजाराचं सांगा, बाकी मला माहिती नको” अशी वृत्ती ठेवतो. पण खरंतर, डॉक्टरने तुमचं संपूर्ण औषध इतिहास, चालू असलेली औषधं, घरातल्या किंवा ऑनलाइन घेतलेल्या काढ्यांचीही माहिती जाणून घेतली पाहिजे – आणि तुम्ही ती दिली पाहिजे.
साधं उदाहरण:
मीनल नावाची 28 वर्षांची तरुणी OCP घेत होती आणि सोबत तिला पीसीओडीसाठी आयुर्वेदिक गोळ्या चालू होत्या. तिला वंध्यत्वाचं कारण समजत नव्हतं. कारण OCP चा प्रभाव त्या आयुर्वेदिक गोळ्यांमुळे विचलित झाला होता आणि शरीरातले हार्मोन्स गोंधळले होते. सविस्तर केस हिस्ट्री घेतल्यानंतरच याचं मूळ सापडलं.
कॉन्ट्रासेप्टिव्ह गोळ्या चुकीच्या नाहीत, त्या नियोजनाचं एक माध्यम आहेत. पण त्या घेत असताना इतर कोणतीही गोष्ट – औषधं, काढे, उपचार, घरगुती उपाय – हे डॉक्टरला सांगणं अनिवार्य आहे. कारण शरीरात एक औषध दुसऱ्याच्या कामात किती आणि कसा हस्तक्षेप करेल, हे केवळ डॉक्टर्स आणि फार्माकोलॉजिस्टच सांगू शकतात.
“Doc never told me this!” म्हणजे प्रत्येकवेळी एकच गोष्ट – केवळ औषध पुरेसे नाही, सवयी आणि जीवनशैलीचा अभ्यास गरजेचा आहे. आपण काय खातो, कधी झोपतो, काय पितो, यावर औषध किती काम करतं हे ठरतं. त्यामुळे अंधश्रद्धा, अर्धवट माहिती किंवा जाहिरातींवर अवलंबून न राहता शरीराच्या संकेतांकडे लक्ष देणं ही खरी आरोग्यशिक्षणाची सुरुवात आहे.