सध्या आपलं बहुतेक अन्न रासायनिक शेतीमधून येतं. ही पद्धत हरितक्रांतीपासून सुरू झाली. मानवनिर्मित रासायनिक खते, तणनाशके, कीटनाशके, अवजड यंत्रे इत्यादींच्या साहाय्याने केल्या जाणाऱ्या ह्या आधुनिक पद्धतीमुळे; मातीतील सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत आहे. पिकांची, जीवाणूंची विविधता कमी होऊन, जमीन वेगाने नापिक होत आहे. त्याचबरोबर हवामान बदलामुळे येणारी नैसर्गिक संकटं वाढली आहेत. अशावेळी वाढत्या लोकसंख्येला सकस आणि पुरेसं अन्न पुरविण्यासाठी शाश्वत शेतीपद्धतीची गरज आहे. पर्माकल्चरमधील फूड फॉरेस्ट ही अशी एक शाश्वत टिकू शकणारी शेतीपद्धत आहे. मिल्पा, केचुआ किंवा झूम पद्धतीने शेती करणारे लोक हे आधीच समृद्ध असलेली जंगलं तोडून त्यावर शेती करत होते. तर आपल्याला नापिक असलेल्या जमिनीवरील, खंडित झालेली जैवसाखळी व्यवस्थित करून, ती शाश्वत टिकेल अशी शेती करायची आहे. त्यासाठी पर्माकल्चरमध्ये साहाय्यक वनस्पतींचा (Support species) वापर केला जातो.
वातावरणात तग धरणाऱ्या आणि जमिनीचे पोषण वाढवणाऱ्या वनस्पती
सुरुवातीला जेव्हा माइक्रोक्लायमेट व्यवस्थित नसतं, तेव्हा लगेच मुख्य उत्पादन देणारे वृक्ष लावून त्यांची जोपासना करणे खूप कष्टाचे आणि खर्चिक असते. त्याऐवजी आहे त्या वातावरणात सहज वाढणाऱ्या, जमिनीचा पोत भरभर सुधारणाऱ्या वनस्पती अधिक लावायच्या. नंतर जसजसा बदल होत जाईल, साहाय्यक वनस्पती कमी करून उपयोगी वनस्पती वाढवत जायच्या. ह्या स्ट्रॅटेजीमुळे मुख्य उत्पादन देणाऱ्या वनस्पतींची लहानपणापासून चांगली वाढ होते. त्याचवेळी सपोर्ट स्पेशीजमुळे भरभर जमीन सुधारते.
व्यक्ती आणि स्थळानुसार डिझाईन
पर्माकल्चर डिझाइन ही मानवाच्या गरजा लक्षात ठेवून केली जाते. त्यामुळे व्यक्ती आणि स्थळपरत्वे डिझाइन बदलल्यामुळे मुख्य आणि साहाय्यक वनस्पती बदलू शकतात.
सुरुवातीला मोहरान हे शेत एक आमराई म्हणून वाढत होतं. मुख्य पीक आंबा, शेतीला लागून असलेल्या शेतातून भात आणि गाई-म्हशी असल्याने दूध, दही, तूप इत्यादी मोजक्या गोष्टी आम्हाला गोष्टी आम्हाला शेतातून मिळत होत्या. शेत Am उष्णकटिबंधीय मान्सून भागात आणि बरीचशी जमीन अनावृत्त असल्याने, प्रचंड मेहनत करूनही आंब्याचं उत्पन्न फार कमी येत होतं तर नारळ वगैरे तर कसेबसे जगले होते.
गुगल अर्थ वरून घेतलेला खालचा फोटो 2020 सालच्या जानेवारीतला आहे. त्यावेळी लागवड करून वीस वर्षे झाली होती.
ह्यानंतर पर्माकल्चरचा अभ्यास करायला मिळाला. नव्या पद्धतीने विचार करून, पुराने सुपीक माती वाहून जाऊ नये म्हणून बांध घालणे, ब्रशवूड डॅम, तलाव इत्यादी उपाय केले. पाणीपुरवठ्याची व्यवस्था, विंड ब्रेक इत्यादी रचना करण्यात आली. फूड फॉरेस्ट आणि त्यातील गिल्ड ह्या संकल्पनेचा वापर करून मोठ्या झाडांभोवती सात थरांमध्ये गिल्ड विकसित करण्याकडे लक्ष दिलं. प्रत्येक गिल्डमध्ये Form (आकार) आणि Function (कार्य) ह्यांचा विचार करून वेगवेगळ्या वनस्पतींची जाणीवपूर्वक लागवड करण्यात आली. गिल्ड्स आणि त्यांच्या मधल्या जागेसाठीही योग्य आकार आणि कार्य सध्या करणाऱ्या वनस्पती निवडण्यात आल्या. खालील तक्त्यात त्यातील काही उदाहरणादाखल दिलेल्या आहेत.
थर
कार्य |
कंद | ग्राऊंड कव्हर, गवत | छोटी
झुडूपे |
झुडुपे | छोटी झाडे | वृक्ष | वेली |
जमिनीची सुपीकता | टॅपिओका, हळद, आंबेहळद | पीनट ग्रास, वाळा, | मूग, उडीद, फांगळी, कवळा, टाकळा | निर्गुडी | शेवगा, हादगा, गिरीपुष्प | आकेशिया, करंज | चवळी, गिलका, अभई |
बाष्प टिकवणे | स्पायडर लिली | वेडेलिया, पान, लेंडी पिंपळी, चिरी | केळी, पानफुटी, पुनर्नवा | इन्सुलिन प्लँट | थंबर्जिया | ||
अन्न, मसाले | सुरण, घोरकंद, करांदे, अळू | भात, धान्यपिके, शिपी, डांगर, लेंडी पिंपळी, ऊस, गवती चहा, अरगुला | बहुवार्षिक पालेभाज्या, टोमेटो, वांगी, अननस | चेरी, कॉफी, चाया, पपई | कांचन, टेटू, पेंढरू, हादगा, कोको, ऑल स्पाइस | मोह, आंबा, फणस, काजू, नारळ, चिकू, जांभूळ | पॅशन फ्रुट, तोंडली, मायाळू, समुद्रशोक, मिरी |
औषधे | हळद | लेंडी पिंपळी, भुई आवळा | पानफुटी, फांगळी, आघाडा, सर्पगंधा, कोरफड | वावडिंग | आवळा, डिकेमली | कुंभ, वारस | गुळवेल, शतावरी, बदकवेल, सागरगोटा |
चारा | हिरामणी, नेपियर | कवळा | जास्वंद | तुती | आसाणा | शतावरी, असिस्टाशिया | |
पक्ष्यांसाठी | धान्यपिके, गवत | बेरी, आंबेढोळ | करवंद, अठरुण | तुती, बोर, सुबाभूळ | उंबर, वड, पिंपळ | ||
जळणाला इंधन | टिथोनिया | कांचन, हादगा, बाभूळ, गिरीपुष्प | सर्व मोठे वृक्ष | ||||
सौंदर्य, सुवास | सोनटक्का, लिली, कर्दळ | ब्रूम ग्रास | सर्व शोभेच्या वनस्पती, जमैकन ब्लू स्पाईक, कोलियस | कुंती, चाफा, रातराणी, प्राजक्त, क्रोटॉन | बहावा, सीताअशोक, हिरवा चाफा | मुचकुंद, कदंब, वड | शोभेच्या वेली, मनी प्लँट, मोगरा, थंबर्जिया |
बांधकाम | बांबू | कारवी | साग, शिसम, ऐन, धावडा |
साईट अनालिसीस करून वेगवेगळे माइक्रोक्लायमेट्स ओळखून त्याप्रमाणे रचना करण्यात आली. परिणामी गेल्या चार वर्षात झालेला बदल खालील फोटोत पाहायला मिळतोय.
चार वर्षात वृक्षाच्छादन लक्षणीयरित्या वाढून, जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान कमी झाले आहे. जमिनीवरील वनस्पती, कीटक, उभयचर, पक्षी, प्राणी इत्यादींची आणि जमिनीतील जीवाणूंची विविधता वाढली आहे. जवळजवळ 400 प्रकारच्या विविध वनस्पती, ज्यात 42 प्रकारची फळे, 25 प्रकारच्या पालेभाज्या, 80 प्रकारच्या रानभाज्या, विविध कडधान्ये, फळभाज्या, कंद, भात इत्यादी वाढत आहेत. मुक्तविहार करणाऱ्या कोंबड्या, तणनियंत्रण, कीडनियंत्रण आणि जमिनीच्या सुपिकतेसाठी हातभार लावत असतानाच त्यांची अंडी उत्तम प्रथिनांचा स्रोत मिळवून देत आहेत. गाईम्हशींमुळे दुधदुभते आणि शेतासाठी उत्तम खत असलेलं शेण आणि मूत्र मिळत आहे. एकूण विचार केला तर आज आमच्या ताटात येणाऱ्या अन्नातील जवळजवळ 70% अन्न ह्या फूड फॉरेस्ट मधून कोणत्याही मानवनिर्मित घातक रसायनाचा वापर न करता मिळवता येतंय. तेही पुरासारख्या नैसर्गिक संकटाला तोंड देऊन. योग्य रचना आणि व्यवस्थापन केलं की कमीतकमी वेळात निसर्गाचं जैवचक्र समृद्ध करून, मुबलक, सकस अन्न मिळवता येतं, हे ह्यातून लक्षात येतं.
फूड फॉरेस्ट तयार झाल्यानंतरचे व्यवस्थापन:
एकदा फूड फॉरेस्ट तयार झालं की, मुख्यतः प्रत्येक गिल्डमधील विविधता वाढवणे, हार्वेस्टिंग आणि फक्त हंगामी पिकांना स्पर्धा होत असेल अशा ठिकाणी तण नियंत्रण करणे ही महत्त्वाची कामे उरतात. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे वृक्षाच्छादन व्यवस्थापन. मोठी झाडे फार वाढली की खालच्या सर्व थरांना सूर्यप्रकाश कमी मिळतो व उत्पादन कमी होते. वृक्षांची सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा होऊन त्यांची उंची वाढते. तेंव्हा योग्य वेळी छाटणी करून फूड फॉरेस्ट सक्सेशनच्या अंतिम स्तरावर न जाता थोडं अलीकडे म्हणजे late succession मध्ये राहील हे पाहणं गरजेचं आहे. मुख्य उत्पादक वनस्पतींची उंची मर्यादित ठेवल्याने काढणीही सोयीची होते. छाटलेला जैवभार जमीन समृद्ध करण्यासाठी वापरता येतो तो अधिकचा फायदा…
4 Comments
शाश्वत जीवनशैलीआधारित शेतीतील शास्त्र खूपच सोपे करुन सांगितले आहे. धन्यवाद आणि अनेक सदिच्छा ✨👍🏻
This is superb, I would like to write a case study on it.
भेट द्यायला आवडेल, सांगा कधी येऊ?
वाह, उत्कृष्ट माहितीपूर्ण लेख! अन्न वनांची संकल्पना केवळ पर्यावरण संवर्धनासाठीच नाही, तर स्थानिक समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठीही महत्वाची आहे. शेतीची ही पर्यायी पद्धत पर्यावरणपूरक आणि शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देते. महाराष्ट्रात अशा प्रकल्पांचा विस्तार व्हावा, हीच अपेक्षा!