मन्या सुर्वे – मुंबईतला पहिला हिंदू डॉन

Manya Surve - मन्या सुर्वे हे मुंबई पोलिसांचं पहिलं एन्काऊंटर होतं, त्यानंतर पोलिसांनी जणू काही मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये सफाई मोहीम हाती घेतली. आणि मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रातले अनेक गुन्हेगार मुंबईच्या रस्त्यांनर गल्यागल्यांध्ये अखेरचा श्वास घेऊ लागले. 
[gspeech type=button]

पहिला हिंदू डॉन, मुंबई पोलिसांचा पहिला एन्काऊंटर, दाऊदचा कट्टर प्रतिस्पर्धी, पोलिसांनी दिलेल्या वागणुकीमुळं गुन्हेगारीकडे वळलेला डॉन अशा अनेक ओळखी असलेला गुन्हेगार म्हणजे मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे. 70 चं दशक मन्या सुर्वेनं त्याच्या गुन्हेगारीनं गाजवलं होतं.

1944 च्या ऑगस्टमध्ये रत्नागिरीजवळच्या एका छोट्याशा खेड्यात, रणपार गावात मनोहरचा जन्म झाला. आजही तिथं त्याच्या कुटुंबियांचं घर आहे, त्याचे नातेवाईक अजूनही तिथं राहतात.

सुशिक्षित गुंड

मनोहर हा शाळेत अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याच्या लहानपणी त्याच्या सावत्र वडिलांचा म्हणजेच अर्जुन सुर्वे यांचा खून झाला. त्यामुळं 1952 मध्ये त्याची आई त्याला आणि त्याच्या सावत्र भावाला घेऊन मुंबईत आली. त्याचा सावत्र भाऊ भार्गव सुर्वे हा बुटलेगिंग करायचा. मुंबईत तर त्याला रानच मोकळं झालं. मुंबईत आल्यावर मनोहरनं कॉलेजला प्रवेश घेतला. त्यानं मुंबईच्या किर्ती कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केलं, त्याला 78 % मार्कस होते. त्याकाळात 78% मार्कस म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. त्यामुळंच गुन्हेगारी क्षेत्रात तो त्या काळातला सगळ्यात जास्त शिकलेला गुंड होता.   

भावाने केलेल्या गुन्ह्यांचा आळ

मनोहर सुर्वेचा मन्या सुर्वे कसा झाला याच्या दोन थेअरिज आहेत. पहिली अशी की, त्याचा भाऊ भार्गव सुर्वेच्या सहवासात राहून मन्या सुर्वेनं कॉलेजमध्येच त्याची गॅंग तयार केली. आणि भार्गवदादा सोबत छोटे मोठे गुन्हे करु लागला. त्यानंतर 1969 मध्ये भार्गव दादानं केलेल्या एका खुनाच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मन्यालाही अटक केली. आणि त्यानंतर त्याच्यावर गुन्हेगार असल्याचं शिक्कामोर्तबच झालं. 

पोलिसांबद्दल राग का? 

दुसऱ्या थेअरीनुसार, मनोहरला क़ॉलेजनंतर चांगली नोकरी करुन आईसोबत चांगलं आयुष्य जगायचं होतं, त्यामुळं भार्गव दादाच्या वाट्यालाही तो कधी जायचा नाही. भार्गव दादानं एखादा गुन्हा केला, की पोलिस मनोहरला घेऊन जायचे, त्याची तासन तास चौकशी करायचे. या सगळ्यालाच तो कंटाळला होता, त्यामुळं त्याला लवकरात लवकर नोकरी करुन या सगळ्यातून बाहेर पडायचं होतं. पण एक दिवस पुन्हा एकदा पोलिस आले आणि मन्याला घेऊन गेले. यावेळी मात्र त्यांनी मन्याला कायदेशीर अटक केली होती. तीही खुनाच्या गुन्ह्यात. भार्गव दादानं केलेल्या खुनाच्या गुन्ह्यात मन्याही सहभागी होता, असा आरोप पोलिसांनी लावला. वर्ष होतं 1969. तेव्हापासून पोलिसांबद्दल मन्या सुर्वेच्या मनात प्रचंड राग आणि तिरस्कार निर्माण झाला.  

जेलमध्ये उपोषण आणि पलायन

या दोन्ही थेअरीजमध्ये एक गोष्ट समान होती, ती म्हणजे मुंबई पलिसांनी मन्याला खोट्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर दोन्ही भावांना जन्मठेपेची शिक्षा झाली. शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पाठवण्यात आलं. जेलमध्ये मन्याची गाठ पडली ती सुहास पाटेकर उर्फ ‘पोत्या भाई’शी. जेलमध्ये या दोघांमध्ये प्रचंड दुश्मनी तयार झाली. मन्या सुर्वे हा पोत्या भाईला त्रास देण्याची एकही संधी सोडत नव्हता. या दोघांचे वाद इतके वाढले की जेल प्रशासनानं शेवटी मन्या सुर्वेला रत्नागिरी कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला. तिथं गेल्यानंतर मन्या सुर्वेनं उपोषण सुरु केलं. इथल्या कैद्यांमध्ये सगळ्यात जास्त शिकलेला कैदी मी आहे, मला यांच्यापेक्षा वेगळ्या सुविधा मिळायला हव्यात. तसंच जेवणाचा दर्जा सुधारायला हवा मागण्यांसाठी त्यानं हे उपोषण केलं. पण हे फक्त वरवरचं कारण होतं, या सगळ्यामागचा त्याचा उद्देश मात्र वेगळा होता. त्यानं उपोषणात जवळपास 20 किलो वजन कमी केलं, त्यानंतर त्याची तब्येत बिघडली आणि त्याला रत्नागिरीच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आणि मन्या सुर्वे वाट बघत असलेली संधी त्याला मिळाली. रत्नागिरीच्या सरकारी रुग्णालयातून मन्या सुर्वे पळून गेला. या घटनेनं मुंबईच्या गुन्हेगारी जगाला एक वेगळ्या वळणावर नेऊन ठेवलं. 

नव्या गँगची स्थापना

रुग्णालयातून पळल्यानंतर मन्या सुर्वेनं थेट मुंबई गाठली. त्यानं मुंबईत आधीच असलेल्या गँग्जमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला कुणीही त्यांच्या गँगमध्ये सामिल करुन घेतलं नाही. तो दाऊदचा भाऊ शाबिरकडेही काम मागायला गेला. पण तिथंही त्याला हाकलून लावण्यात आलं. त्यानंतर आता कुणासाठीही काम न करता स्वत:चीच गँग सुरु करायचं त्यानं ठरवलं. त्याचा जेलमधली सहकारी उदय शेट्टी याला सोबत घेऊन त्यानं गँग सुरु केली.

पहिली दखल

मन्या सुर्वे आणि उदय शेट्टी यांनी 1980 मध्ये एक अँबेसेडर कार चोरली आणि नंतर ती दरोड्यासाठी वापरली. मुंबईच्या करी रोडच्या लक्ष्मी ट्रेडींग कंपनीवर त्यांनी हा दरोडा टाकला होता. या दरोड्यात त्यांनी 5,700 रुपयांची रोकड लंपास केली होती. या दरोड्यानं मन्या सुर्वेच्या गँगला वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर जागा दिली. आणि मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रात आणखी एका गँगस्टरची एन्ट्री झाली. त्यानंतर मन्या सुर्वेनं मुंबईच्या रस्त्यांवर रक्तपाताला सुरुवात केली. कुणाच्याही थोबाडात मारावी, इतक्या सहजपणे मन्या सुर्वे लोकांवर गोळ्या झाडायचा. त्याला कोणत्याही कामासाठी कुणीही नकार दिलेला आवडायचा नाही. त्यामुळं लवकरच मन्या सुर्वेची दहशत मुंबईच्या रस्त्यांवर आणि गल्ली गल्लीत पसरली. 

दाऊदला टक्कर

खरं तर मन्याला दाऊदच्या गँगमध्ये काम करायला मिळालं असतं तर कदाचित तो एवढा मोठा गँगस्टर झाला नसता. पण नियतीला कदाचित हे मान्य नव्हतं. मुंबईचा राजा कोण यावरुन दाऊद आणि मन्या सुर्वे दोघांमध्ये चढाओढ लागली होती. मुंबईवर राज्य करण्याच्या इर्शेनं झपाटलेल्या दाऊदलाही मन्या सुर्वे खटकत होता. कारण मन्या सुर्वे हा त्याला टक्कर देणारा गँगस्टर बनला होता. पठाण गँग आणि दाऊदची दुष्मनी तर उघड उघड होतीच. पण हाजी मस्ताननं या दोन्ही गँगमध्ये समझोता घडवून आणल्यानंतरही दाऊदचा भाऊ शब्बीरचा खून झाला होता. काहींच्या मते मन्या सुर्वेनं शब्बीरवरचा राग मनात ठेवून त्याला गोळ्या घातल्या होत्या. तर काहींच्या समद खाननं समझोता विसरुन स्वत:च शबीरला ठार केलं होतं. पोलिस रेकॉर्डमध्येही शब्बीरला मन्या सुर्वेनं मारल्याचा उल्लेख आहे. पण दाऊदला मात्र या दोघावरही शंका होती. 

मैत्रिणीनं दिली टिप?

70 चं दशक संपेपर्यंत मन्या सुर्वे हा मोकाट सुटला होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडलं पण तो काही पोलिसांच्या हाती येत नव्हता. शेवटी पोलिसांनी मन्या सुर्वेच्या विरोधात मोहीम हाती घेतली, मोठी फौज उभी केली. आणि एक दिवस मन्या सुर्वेचा पत्ता लागला. 11 जानेवारी 1982 ला मन्या सुर्वे हा त्याच्या मैत्रिणीला भेटायला आंबेडकर कॉलेजला येणार असल्याची टिप पोलिसांना मिळाली. असं म्हणतात की, त्याच्या मैत्रिणीनं ही टिप पोलिसांना दिली, तर काही रिपोर्टसनुसार दाऊदनं त्याच्या माणसाकरवी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली. पण माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याला संपवण्याचा प्लान बनवला. हा प्लान अचूक असणं गरजेचं होतं. कारण जर यातून मन्या सुर्वे वाचला, तर तो पुन्हा पोलिसांच्या हाती कधीच येणार नाही याची त्यांना खात्री होती. 

कसा झाला मुंबईतला पहिला एन्काउंटर?

फुलप्रुफ प्लान बनवून मुंबई पोलिसांचं पथक आंबेडकर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या वेषात दाखल झालं. ठरल्याप्रमाणं मन्या सुर्वे एका टॅक्सीतून कॉलेजमध्ये दाखल झाला. कॉलेजच्या आवारात दबा धरुन बसलेले पोलिस त्याची वाट बघत होते. त्यावेळचे पोलिस उपनिरीक्षक इसाक बागवान यांनी मन्याला बघितलं. तो त्यांच्या समोरुन पुढे गेला, बागवान यांनी त्याला मागून आवाज दिला. काहीतरी गडबड असल्याचा अंदाज मन्याला आला. मागे वळून त्याचे हात त्याच्या रिव्हॉल्वरकडे जाणार इतक्यात, इसाक बागवान आणि राजा तांबट यांच्या गोळ्यांनी त्याचा वेध घेतला. त्यानंतर दबा धरुन बसलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. मन्या सुर्वेला पाच गोळ्या लागल्या, पण तरीही तो जिवंत होता. त्यानंतर त्याला अँब्युलन्समध्ये घालून सायन रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथं पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला. 

अंडरवर्ल्ड सफाई मोहिम

मन्या सुर्वे हे मुंबई पोलिसांचं पहिलं एन्काऊंटर होतं, त्यानंतर पोलिसांनी जणू काही मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये सफाई मोहीम हाती घेतली. आणि मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्रातले अनेक गुन्हेगार मुंबईच्या रस्त्यांनर गल्यागल्यांध्ये अखेरचा श्वास घेऊ लागले. 

तर ही होती मुंबईच्या पहिल्या हिंदू गँगस्टरची कहाणी. असं म्हणतात, की मन्या सुर्वेचं एन्काऊंटर झालं नसतं, तर 1993 चे बॉम्बस्फोट झाले नसते, कारण त्याआधीच मन्या सुर्वेनं दाऊदला संपवलं असतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ