दक्षिणेकडील मराठ्यांच्या स्थलांतराचे दोन प्रकार आपण गेल्या महिन्यात पाहिले. तामिळनाडू मधील तंजावरच्या मराठी बोली आणि तेलंगणात बोलली जाणारी आरे मराठी बोली या दोन्ही बोलींना जवळपास चारशे वर्षांचा इतिहास असल्याचे आपल्या लक्षात असेलच. पण त्या नंतरही वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या कारणांनी दक्षिणेकडील राज्यांमध्ये मराठी भाषिक स्थलांतरित होत राहिले. आज केरळमधल्या कोचीन येथे गेली तीन शतके स्थायिक झालेल्या मराठी भाषकांची आपण ओळख करून घेणार आहोत.
सार्वजनिक गणपती
1893 साली टिळकांनी सर्वप्रथम पुण्यात सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर दोनच वर्षांत भारतात आणखी एका ठिकाणी मराठी लोकांनी एकत्र येऊन सार्वजनिक गणपती बसवला. ही घटना घडली महाराष्टापासून सुदूर राहूनही मराठीचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या कोचीनच्या मराठी समूहामध्ये!
स्थलांतराची सुरुवात
गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली आल्यानंतर तिथल्या कोकणी लोकांसोबतच या मराठी भाषिकांनी पहिल्यांदा केरळच्या किनारपट्टी जवळच्या भागामध्ये स्थलांतर केले असे मानले जाते. मात्र याशिवाय मोठे स्थलांतर हे व्यापाराकरता झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला या गावाचा कोचीनशी जवळचा संबंध असल्याची माहिती मिळते. अठराव्या शतकाच्या अखेरीस फडके, शिर्के, बोरवणकर अशी अनेक कुटुंब वेंगुर्ल्याहून कोचीनला स्थलांतरित झाली.
1865 ते 67 च्या दरम्यान बाबू गोविंद पंडित नावाचे एक धनाढ्य व्यापारी वायपीन येथे आपल्या भावांसोबत आले आणि त्यांनी मोठ्ठा जमीन जुमला विकत घेतला. त्यांनी 1879 साली माटांचेरी येथे गोपालकृष्णाचे मंदिर बांधले. आणि तेव्हापासून हे ठिकाण मराठी समूहाचे मुख्य ठिकाण बनले. या भागात जवळपास 20 कुटुंब स्थलांतरित झाल्याने त्याला पंडित मंदिर रोड असे नाव पडले.
सर्वांगीण प्रगती
पंडित कुटुंबासोबतच गावस्कर कुटुंबही बोटीने कोचीनला आले. त्यांचा मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार होता. आणखी एक कुटुंब बोट बांधणीच्या क्षेत्रात नावाजलेले होते.
अशाप्रकारे एक एक कुटुंब वेगवेगळ्या व्यापाराच्या निमित्ताने आपल्या आप्तेष्टांना सोबत घेऊन स्थलांतरित होत गेले.
बाळकृष्ण अनंत गोरे नावाच्या गृहस्थाने 1881 साली केरळ कोकीळ नावाचे मासिक सुरू केले. देवनागरी लिपीत असलेले हे मासिक देवजी भीमजी छापखाना येथे छापले जात असे. Canarese आणि मराठी बोलणाऱ्या मुलांसाठी मराठी शाळेची स्थापना केली गेली.
1965 साली स्थापन झालेल्या मराठा मंडळातर्फे 11 दिवसाचा गणपती बसवून मोठ्या उत्साहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले जात असत.
सद्यस्थिती
अशाप्रकारे भरभराटीला आलेल्या या मराठी कुटुंबांच्या पुढच्या पिढीचा कल मात्र मुंबईकडे परतण्याकडे आहे. त्याचप्रमाणे स्थानिक मल्याळी कुटुंबांसोबत विवाहसंबंध जुळत असल्याने आता हा समूह हळूहळू विखुरला गेला आहे. मात्र जितके लोक आहेत ते आपापल्या परीने संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. हरतालिका, हादगा, भोंडला, कोजागिरी पौर्णिमा इ. प्रसंगी लोक एकत्र येऊन सण साजरे करताना दिसतात.
(द हिंदू, 2016, प्रियदर्शिनी एस. यांनी लिहिलेल्या लेखाचा स्रोत म्हणून उपयोग केला गेला आहे. )
समारोप
पुढच्या भागात कोचीनच्या या मराठी बांधवांची बोली कशी आहे हे पाहूया.