दत्त दत्त .. दत्ताची गाय
गायीचं दूध, दुधाची साय,
सायीचं दही, दह्याचं ताक,
ताकावरच लोणी, लोण्याचं तूप.. तुपाची धार ..
दत्त दत्त .. दत्ताची गाय..
ही छोटेखानी कविता दुधाचं महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेशी आहे. दुधाचे हे पाचही प्राचीन अवतार आणि पनीर,चीज सारखे अर्वाचीन अवतार आज आपल्या ताटातील घटक आहेत. पण दुधाची ही पांढरी भरभराट खूप खाचखळगे खाऊन आलेली आहे.
दुभत्या गायी संपन्नतेचं प्रतीक
वेदकालीन भारतीय कालखंडापासून दुधाची महती आपल्याला माहिती आहे. पशुधन हे मुख्यत्वे दूध आणि शेतीची कामे यासाठी पाळले जाई. उपलब्ध दुभत्या गायी हे त्याकाळी संपन्नतेचं प्रतीक समजलं जाई. हिमालयाच्या पायथ्याशी असणारा नदीकाठ आणि विस्तृत गवताळ कुरणे, यामुळे गायी आणि दूध उत्पादन यात त्या काळात आपण नेहमीच स्वयंपूर्ण होतो. पण गायीचे दूध आणि दुधाचे पदार्थ गावातील मूठभर लोकांनाच उपलब्ध असायचे. म्हटतात ना की द्रोणाचार्य कौरव पांडवांचे गुरु, पण अश्वत्थाम्याला नेहमीच पिठाचे दूध.
आपल्याला दूध एवढे महत्वाचे का?
माणूस हा एकमेव प्राणी आहे जो बाल्यावस्था संपल्यावर सुद्धा इतर प्राण्यांच्या दुधाचे सेवन करतो. गायीचे दूध कमी स्निग्धांश असल्याने पचायला हलके असते. प्रथिने, स्निग्धता आणि कर्बोदके हे तीनही मुख्य पोषण घटक असल्याने दुधाला पूर्णान्न सुद्धा म्हटलं जातं. पोषण हा भाग सोडून, उद्योगवृद्धी हा उपजीविकेचा भाग बनू शकत असल्यामुळे दूध आपल्यासाठी महत्वाचे ठरते. आधी फक्त दुधाचा रतीब घातला जाई. रतीब घालणे म्हणजे आजच्या काळातले subscription model ! गवळी रोज सकाळी गायी म्हशींची धार काढून घरोघरी ठरल्याप्रमाणे वाटप करीत असे. महिना अखेरीस पैसे देऊन हिशेब चुकता केला जातो, याला रतीब घालणे असं म्हणतात. जिथे गाव छोटा तिथे उत्पन्नाचं दुसरं साधन म्हणून शेतकरीच हे काम करायचा. कधी गाय गाभण राहिली आणि वासरू जन्माला आलं की पहिल्या– दुसऱ्या दिवशी येणारे घट्ट दूध म्हणजे चीक (colostrum milk) विकून जास्त पैसे मिळवायचा. या चिकाचा खरवस फार पौष्टिक असतो. यालाच आपण भारतीय चीज केक म्हणू शकतो.
अर्थार्जनाचं माध्यम कसं तयार झालं?
पण जेव्हा गाव मोठे झाले तेव्हा रतीब घालणारे गवळी पण वाढले. त्यामुळे रतीब घालून सुद्धा दूध उरू लागले. उत्पादनाचं चक्र फिरलं. आधी मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने दुधाला रास्त भाव होता पण आता मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने आणि त्यात दुधाचे शेल्फ लाईफ कमी असल्याने दुधाची किंमत खाली येऊ लागली मग उरलेल्या दुधाचे करायचे काय हा मोठा प्रश्न पडला. त्यातून दुधाचे इतर अवतार जन्माला घालून, विकून पैसे कमावला जाऊ लागला. दूध ते तूप या प्रवासातील प्रत्येक टप्प्यावर शेल्फलाईफ वाढत जाते म्हणजे दूध उघड्यावर ठेवलं तर एका दिवसात खराब होतं पण दही फार तर आंबट होईल पण खराब होणार नाही. लोणी थोडं जास्त काळ टिकतं तर तूप सगळ्यात जास्त काळ टिकतं. तसंच प्रत्येक टप्प्यावर उतारा कमी होतो म्हणून किंमत वाढत जाते. हे असं सोपं अर्थकारण दुधाबाबतीत चटकन उमगलं आणि म्हणून दूध आपल्याला पोषण आणि अर्थार्जन या दोन्ही बाबतीत महत्वाचं ठरत.
श्वेतक्रांती आणि डॉ.वर्गीस कुरियन
दुधासंबंधित, भारतीय इतिहासात डॉ कुरियन आणि श्वेतक्रांती यांचा उल्लेख अपरिहार्य आहे.
गुजरात मधील आणंद या गावी, त्रिभुवनदास किशाभाई पटेल यांनी, एक डेअरी 14 डिसेम्बर 1946 साली स्थापन केली. नाव होतं, अमूल (Amul – Anand Milk Udyog Ltd). होय. हेच आजचं अमूल! आधी सांगितल्याप्रमाणे दुधाचे दर अनिश्चित असत. त्यातच पेस्तनजी एदलजी यांनी आणंद गावी 1930 साली स्थापन झालेली Polson डेअरी मुंबई आणि गुजरात प्रांतात त्यांची एकाधिकारशाही (monopoly) गाजवत होती. एकाधिकारशाही असल्याने गावातील लोकांकडून दूध हे अत्यंत कमी दरात विकत घेतले जाई. यावर तोडगा म्हणून त्रिभुवनदास पटेल यांनी वल्लभभाई पटेल यांना परिस्थिती समजावून सांगितली. वल्लभभाई पटेलांनी त्यांना सहकारी तत्वावर दूध संघ स्थापन करण्याची कल्पना राबवायला सांगितली आणि मोरारजी देसाईंना गावकरी, शेतकरी यांना समजावण्यासाठी आणंद गावी धाडले. आणि या सर्वांनी ठरवले की कोणीही Polson कंपनीला दूध घालणार नाही. त्यामुळे साहजिकच Polson ची एकाधिकारशाही संपुष्टात आली.
स्कीम मिल्क पावडरचा शोध
मुख्य प्रश्न होता दुधाचे संकलन. प्रत्येक गावी, प्रत्येक शेतकरी त्याच्या कुवतीनुसार कधी 5 लिटर तर कधी 1–2 लिटर दूध जमा करायचा. त्यामुळे कुरियन यांनी गावोगावी दूध संकलन केंद्रे उभी केली आणि मोक्याच्या ठिकाणी दूध पाश्चराइझ करण्याचे छोटे छोटे कारखाने उभे केले गेले. इथे डॉ. कुरियन यांनी अफाट मेहनत घेतली आणि त्यांना साथ दिली हरिश्चंद्र दलाय यांनी! दलाय यांनी म्हशीच्या दुधापासून स्कीम मिल्क पावडर तयार करण्याचं तंत्र शोधून काढलं आणि श्वेत क्रांतीची घोडदौड सुरु झाली कारण उरलेल्या दुधाचे करायचे काय हा प्रश्नच निकाली काढला गेला होता.
क्राऊड फंडिंगमधून तयार झालेला पहिला सिनेमा
श्वेतक्रांतीची ही यशस्वी घोडदौड दाखवणारा ‘मंथन‘ हा चित्रपट 1976 साली प्रदर्शित झाला. श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला होता. विजय तेंडुलकर लिखित या चित्रपटात स्मिता पाटील, मोहन आगाशे, नासिरुद्दीन शाह, गिरीश कर्नाड यासारख्या मातब्बर लोकांनी अभिनय केला आहे. सगळयात लक्षणीय बाब म्हणजे हा चित्रपट crowdfunding म्हणजे लोकांकडून अत्यंत माफक पैसे गोळा करून तयार केला गेला. जवळपास 5 लाख लोकांनी 1–2 रुपये देणगी या सिनेमाला दिली होती. crowdfunding निर्मित हा पहिला भारतीय सिनेमा होता.
महाराष्ट्राचे दुग्धोत्पादनातील सध्याचे स्थान
आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ही सहकारी दूध संघाची कल्पना 1967 साली सुरु झाली. MRSDMM (Maharashtra Rajya Sahakari Dudh Mahasangh Maryadit) ही सहकारी संस्था सुरु झाली आणि त्यांचाच डेअरी प्लान्ट “महानंद” या नावाने ओळखला जातो. सध्या अंतर्गत राजकारणामुळे हा दूधसंघ वादात अडकलेला आहे.
महाराष्ट्र सहाव्या क्रमांकावर
असं जरी असलं तरी महाराष्ट्रात अनेक खाजगी संस्था कार्यरत असून जगात नावारूपाला येत आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्र राज्य दुग्धोत्पादनात, भारत देशातील सहाव्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे आणि अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्याने राज्यात दुग्धोत्पादनात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
A1, A2 दुधाविषयी थोडेसे
A1 आणि A2 ही दुधात आढळणाऱ्या बीटा केसीन प्रथिनांची नावे आहेत. ही प्रथिने गायी म्हशींच्या जनुकीय प्रभावामुळे दुधात येतात. उदाहरणार्थ परदेशी वाण असलेल्या जर्सी गायीच्या दुधात A 1 हे प्रथिन आढळते तर दुसरीकडे देशी खिलार किंवा गीर गायीच्या दुधात A 2 हे प्रथिन आढळतं. FSSAI ने सर्व दुग्धउत्पादने (जसं मिठाई, पनीर, बटर) तयार करणाऱ्या कंपन्यांना, A1 A2 लिहून उत्पादने विकण्यास सक्त ताकीद दिलेली आहे. कारण दुधाचे फायदे तोटे हे misleading अर्थात दिशाभूल करणारे आहेत, असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे.
सद्यस्थिती
भारत देश जगातील पहिल्या पाचातील दुग्धोत्पादक देश जरी असला तरी आजही आपण जवळपास 74000 मेट्रिक टन दूध आणि दूध उत्पादनांची आयात करतो. फ्रांस,आयर्लंड, न्यूझीलंड आणि यूएई कडून आपण आयात करतो. याचं मुख्य कारण आहे आपल्या जनावरांची होणारी हेळसांड, स्वच्छता आणि जनावरांना होणारे आजार! लोकसंख्या वाढीच्या तुलनेत दुधाचे उत्पन्न होत नाही.
म्हणून लाल बहादूर शास्त्री आणि डॉ. कुरियन यांचं भारत देशाला, दुधाचा मुख्य निर्यातदार देश होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला अजूनही खूप मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.
5 Comments
मलईदार लेख
अप्रतिम. खूपच अभ्यासातून आलेला माहितीपूर्वक लेख
खुपच अभ्यासपूर्ण लेख. लिखते रहो.
खूप छान माहिती मिळाली.
खुप अभ्यासपूर्ण लेख