‘सिकंदर का मुकद्दर’ हा नीरज पांडे दिग्दर्शित ‘टिपिकल हाइस्ट’ सिनेमा. परवा ओटीटीवर पाहिला. त्यातला जिम्मी शेरगिलचा एक डायलॉग भलताच लोकप्रिय झालाय. लोकप्रिय म्हणजे त्यांनी स्वतःच प्रमोट केलाय आणि एफएम रेडिओवरच्या आरजे वगैरेंनी तो उचलून धरलाय.
मूल व्रीत्ती का मतलब समझता है ?
इन्स्टिंक्ट !
और इन्स्टिंक्ट या तो होता है… या नहीं होता है !!
और मेरा सॉलिड है…! इन्स्टिंक्ट !!
(टाळ्या आणि शिट्ट्या अध्याहृत)
‘मूल व्रीत्ती’ हे मूळ मूलवृत्ती शब्दाचं जिम्मी शेरगिलकृत पंजाबी-बिहारी व्हर्जन. पण हा डायलॉग मनाला भिडला. कारण महाराष्ट्रात सध्या एक ‘मूल व्रीत्ती’ सक्रिय आहे. जनमानसामध्ये असं एक इन्स्टिंक्ट आहे की महायुतीने विधानसभा निवडणुकीत काहीतरी ‘काण्ड’ केलेलं आहे. बहुतांश मराठी ‘मूल व्रीत्ती’ ईव्हीएम घोटाळ्याकडे इशारा करते. मराठी ‘मूल व्रीत्ती’ नुसार हा जनादेश नसून धनादेश आहे, अशीही शंका घ्यायला जागा आहे. तर काहींची ‘मूल व्रीत्ती’ लाडक्या बहिणींच्या मतदानाकडे बोट दाखवते.
मराठी मातीचं हे इन्स्टिंक्ट नजरअंदाज करून चालणार नाही. कारण ‘मूल व्रीत्ती’ अर्थात इन्स्टिंक्ट हे मराठी मनांचं स्ट्रॉन्ग असतं. या मूलव्रीत्तीमुळेच इथे कार्यकर्त्यांचं मोहळ तयार होतं. या ‘मूल व्रीत्ती’च्या आधारनेच सह्याद्रीच्या बाशिंद्यांनी दिल्लीचं तख्त राखलं. अटकेपार झेंडे रोवले आणि हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याचं धारिष्ट्यही दाखवलं.
एकतर इन्स्टिंक्ट असतं किंवा असत नाही, हे खरंय. आणि हे इन्स्टिंक्ट जबरदस्त तीव्र आहे. काही लोक त्यावर खूप बोलतायत. उदा. संजय राऊत. ते अनेक दिवसांपासून विरोधी प्रवक्त्याचे फ्लॅगशिप म्हणून कार्यरत आहेत. त्यांना सकाळचा भोंगा हे नामाभिधानही प्राप्त झाले आहे. पण अत्यंत निष्ठापूर्वक स्वतःच्या इन्स्टिंक्टने खा. संजय राऊत सकाळी आपली जागल्या प्रवक्त्याची भूमिका पार पाडतात.
सध्या त्यांची स्ट्रॅटेजी आहे ती या मराठी ‘मूल व्रीत्ती’ला म्हणजे निकालात काहीतरी गडबड झाली आहे, या मराठी मनाच्या इन्स्टिंक्टला हवा देण्याची. त्यांचे इन्स्टिंक्टिवली आणखी एक विशफुल थिन्किंग आहे. या अति भरभरून मिळालेल्या निवडणूक निकालामुळे महायुतीत अंतर्गत धुसफूस वाढून काही वेगळ्या वाटा फुटल्या जातील. अदृश्य शक्तींनी दोन मोठे पक्ष फोडले. आता अदृश्य शक्ती इतकी शक्तिमान झाली आहे की फुटलेल्या पक्षांची आणखी शकलं करायला त्यांना किती वेळ लागणार? त्यामुळे आता महायुतीतल्या अंतर्गत धुसफुशीवर आसुरी आनंद मिळवणं हेच सध्या विरोधकांचं इन्स्टिंक्ट असणार आहे.
सत्तापक्षातील या धुसफुशीच्या ‘मूल व्रीत्ती’ चाही एक समांतर सिनेमा सुरू आहे. कृष्ण-सुदाम्याच्या गोष्टीवर काही वर्षांपूर्वी एक एकांकिका पाहिली होती. सुदामा इन्स्टिंक्ट घेऊन कृष्णाच्या भेटीला जातो. मात्र नाउमेद होऊन हात हलवत घरी येतो. पाहतो तर काय? त्याची चंद्रमौळी जाऊन तिथे सोन्याचा महाल झालेला दिसतो. अचानक प्रसन्न झालेल्या लक्ष्मीला सुदामा सरावलेला नसतो. या देदीप्यमान श्रीमंतीचं काय करायचं हे सुदाम्याला कळत नाही. तो त्याची सात्विकता हरवून बसतो. असा त्या एकांकिकेचा आशय होता.
राजकारणात सुदामे नसतात. कारण ते सु’दाम’ असतात. सु’दाम’ सात्विक तर अजिबात असत नाहीत. ईडी अथवा इन्कम टॅक्सच्या संक्रांतीमुळे त्यांचे सुदामे होतात. अदृश्य शक्तींना आवडणारी पोह्याची पुरचुंडी कनवटीला घेऊन ते द्वारकेला जातात. धूतपापेश्वर श्रीकृष्णाशी दोस्तीच्या आणाभाका होतात. ही ‘मूल व्रीत्ती’ खोक्या-कंटेनरांनी जोपासली जाते. धूतपापेश्वर प्रसन्न होतो. सुदामे पुन्हा सु’दाम’ होतात. अचानक आलेल्या शुभ्रतेचं काय करायचं हा प्रश्न त्यांना पडत नाही. ही नव्याने आलेली शुभ्रता दिठीपासूनच आपलीच होती असा साक्षात्कार त्यांना झालेला असतो. हे मेक बीलिव्ह लोकविलक्षण आहे. गोबेल्स तंत्राबद्दल लोक बोलतात. पण आधीच खरं मानून स्वतःशीच सातत्याने रेटून खोटं बोलणं ही सु’दामां’ची ‘मूलव्रीत्ती’. ‘जनाची लाज’ हा विषय आपण ऑप्शनला टाकलाय. मनाची असण्याचं काही कारण नाही. त्यामुळे कृष्ण-सु’दाम्यां’ची ही आधुनिक गोष्ट हीच ‘नवी मूलव्रीत्ती’ झाली आहे.