कला आणि सावंतवाडी

Sawantwadi Art : सावंतवाडी विशेषतः सुबक नक्षीकाम व आकर्षक रंगसंगतीने बनविलेल्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या खेळण्यांमध्ये प्राणी, फळे, बाहुल्यांचा समावेश आहे. येथे लाकडी खेळण्यांशिवाय, विविध प्रकारच्या लाकडी उपयुक्त वस्तूही बनविल्या जातात.
[gspeech type=button]

लाकडी हस्तकला जपणारे केंद्र

तळ कोकणातील निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणांपैकीच एक म्हणजे सावंतवाडी. शहराला लाभलेले नैसर्गिक सौंदर्य तिथे जोपासलेल्या कलेमधून जाणवते. सावंतवाडीतील लाकडी हस्तकला या प्रदेशाची खासियत आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर लाकडावर कलाकुसर करणारे अनेक कारागीर आहेत. याची साक्ष महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आणि केरळमधील अनेक लाकडी मंदिरं देतात. तळकोकणातही अशी अनेक सुंदर लाकडी मंदिरे आहेत. ह्या कलाकारांनी मंदिरांच्या कामासोबतच इतर लाकडी वस्तू बनविण्यास सुरुवात केली. यातूनच सावंतवाडी लाकडी हस्तकला जोपासणारे एक केंद्र म्हणून उदयास आले. 

फणस आणि आंब्याच्या झाडाचा वापर

सावंतवाडी विशेषतः सुबक नक्षीकाम व आकर्षक रंगसंगतीने बनविलेल्या लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या खेळण्यांमध्ये प्राणी, फळे, बाहुल्यांचा समावेश आहे. येथे लाकडी खेळण्यांशिवाय, विविध प्रकारच्या लाकडी उपयुक्त वस्तूही बनविल्या जातात. वस्तू बनविण्यासाठी फणसाच्या किंवा आंब्याच्या लाकडाचा वापर केला जातो.  मऊ पण टिकाऊ  अशा दोनही गुणांनी युक्त असलेल्या या लाकडावर कोरीव काम करणं सोपे जाते. पुढे नैसर्गिक रंगांचा वापर करून खेळणी व सजावटीच्या वस्तूंना आकर्षक रूप दिले जाते. 

सिसोदिया राजपूत ते खेम सावंत-भोसले

मोती तलावाच्या काठावर असलेला सावंतवाडीचा लाकडी हस्तकला बाजार कोकणाला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण आहे. मोती तलावाच्या दुसऱ्या काठावर खेम सावंत भोसले घराण्याचा राजवाडा आहे. सावंतवाडीतील लाकडी हस्तकलेच्या भरभराटीस विशेष प्रोत्साहन दिले ते म्हणजे तेथिल खेम सावंत भोसले राजघराण्याने. सावंत भोसले घराण्याचे मूळपुरुष उदयपूरच्या सिसोदिया राजपूत घराण्यातील होते. सावंत भोसले घराण्याची गादी 1627 मध्ये खेम सावंत प्रथम यांनी स्थापन केली. लखम सावंत हे अत्यंत शूर आणि कर्तव्यदक्ष शासक होते. त्यांनी आपल्या पुतण्यासह, खेम सावंत द्वितीय, आणि 12,000 सैन्याच्या मदतीने कुडाळ देशस्थांना पराभूत केले व त्यांच्या प्रदेशावर कब्जा केला. त्यानंतर त्यांनी नरेंद्र डोंगरावर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. या डोंगरावरच पहिला राजवाडा (जुना कोट) त्यांनी बांधला. लखम सावंत यांच्या निधनानंतर, खेम सावंत द्वितीय गादीवर आले. खेम सावंत द्वितीय यांनी आपली राजधानी सुंदरवाडी (सध्याचे सावंतवाडी) येथे स्थापन केली. सध्याचा राजवाडा खेम सावंत भोसल्यानी 1755 ते 1803 या काळात बांधला. पुढे हेच स्थळ राजघराण्याच्या नावाने, सावंतवाडी म्हणून ओळखले जाऊ लागले. 

जांभ्या दगडातला राजवाडा

सावंतवाडीचा राजवाडा एक स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इंग्रजांच्या स्थापत्यशास्त्रानुसार बांधलेल्या कमानी आणि त्याचबरोबर स्थानिक हस्तकला या दोन्हींचा समन्वय राजवाड्याच्या बांधकामात दिसून येतो. जांभ्या दगडाचा वापर या बांधकामाला एक विशिष्ट उठाव देतो. राजवाड्याच्या मध्यभागी एक सुंदर चौक आहे, आणि त्याच्या चारी बाजूंनी खोल्या आहेत. राजघराण्याच्या नोंदीनुसार या खोल्यांमध्ये पूर्वी मंत्री आणि दरबारी अधिकारी राहत असत.

कलाकारांना प्रोत्साहन

राजघराण्यांनी स्थानिक कलेला दिलेल्या प्रोत्साहनाची अनेक उदाहरणे इतिहासात आढळतात. सावंतवाडीचे भोसले घराणे याला अपवाद नव्हते. भोसल्यांनी सावंतवाडीच्या कलाकारांना प्रोत्साहन आणि आर्थिक पाठबळ दिले. 

गंजिफा खेळ आणि लाखकामाला राजाश्रय

16व्या शतकात मुगलांनी गंजिफा खेळ भारतात आणला. गंजिफा म्हणजे एक विशेष प्रकारचा पत्त्यांचा खेळ. भारताच्या पूर्व किना-यावर तो विशेष प्रसिद्ध होता. ओडिशामधील पुरी येथील जगन्नाथाच्या मंदिरात तो आजही खेळला जातो. शिवाय आंध्र तेलंगणातही हा खेळ प्रसिद्ध आहे. आंध्र आणि तेलंगण प्रांतातील ब्रह्मवृंद धर्मशास्त्रातील चर्चेत भाग घेण्यासाठी सतराव्या आणि अठराव्या शतकामध्ये सावंतवाडीत येत असत. त्यावेळी राजेबहाद्दर खेम सावंत तिसरे गादीवर होते. ब्रह्मवृंदामुळे लाखकामाची कला सावंतवाडीत पोचली, तिथे रुजली आणि नंतर विकसित झाली. सावंतवाडीच्या राजघराण्याने सतराव्या शतकात या लाखकामाच्या कलेला राजाश्रय दिला; तसेच ‘गंजिफा’ खेळालाही. पंचम खेमराज तथा बापुसाहेब महाराज यांनी जाणीवपूर्वकतेने व गांभीर्याने 1930च्या दरम्यान त्या कलेला चालना देऊन तिचा विकास केला. त्यांच्या कालखंडात गोव्यातील ‘चितारी (चित्रकार)’ कुटुंबातील लोकांना सावंतवाडीच्या चित्रशाळांमध्ये आणून, त्यांना प्रशिक्षण देऊन त्या कलेचा विकास करण्यात आला. 

80 वर्षाच्या कलाकाराकडून गंजिफाचे पुनर्जीवन

कालौघात पुन्हा ही कला दुर्लक्षित झाली. तिचे बाजारीकरण झाले. शिवरामराजे भोसले व राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांचे त्या कलेच्या दुरावस्थेकडे लक्ष गेले व त्यांनी त्या कलेला पुनश्च उर्जितावस्था देण्याचा निर्णय 1959 मध्ये केला. राजेसाहेब शिवरामराजे भोसल्यांनी लंडनमधील विक्टोरिया आणि आल्बर्ट संग्रहालय दिलेल्या भेटीतही गंजिफा पत्ते पाहिले. त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने त्या काळात 80 वर्षांच्या कलाकार पंडित चितारीकडून गंजिफा बनवून घेतला. पंडित चितारी त्यावेळी एका वर्षात 2 गंजिफा सेट बनवित असे. पुढे राजेसाहेब शिवरामराजे आणि राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी ही कला जोपासली. त्यांनी गंजिफा आणि लॅकरवेअर कलेचे पुनरुज्जीवित करण्यासाठी सावंतवाडी लॅकरवेअर सुरू केले. यामागचा उद्देश म्हणजे तरुण पिढीला ही कला शिकवणे, जेणेकरून ती पुढील पीढीतही जोपासली जाईल. 

चित्रकार राजमाता सत्त्वशीलादेवी 

राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले माहेरच्या बडोद्याच्या आहेत. बडोदा संस्थानाचे कला जोपासण्यातील योगदान सर्वश्रुत आहे. साहजिकच राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले ह्याच परंपरेत वाढल्या असल्याने त्यांच्यातही कलेबद्दल निष्ठा आपसूकच होती. राजमाता सत्त्वशीलादेवी भोसल्यांनी त्यांच्या माहेरी बडोद्याला प्रसिद्ध चित्रकार राव यांच्याकडे लहान वयात चित्रकलेचे धडे गिरवले होते व त्यांनी अनेक चित्रेही काढली होती. त्यामुळे त्यांनी गंजिफा पुनरुत्जीवीत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्या स्वतःही उत्तम गंजिफा बनवित असत. राजमाता सत्त्वशीलादेवी भोसल्यांनी सावंतवाडी लॅकरवेअरद्वारे प्रशिक्षित कलाकारांच्या कलाकृतींना आणि विशेष करून तेथील गंजिफा कलेला 1973 मध्ये जगाच्या बाजारपेठेत मोलाचे स्थान प्राप्त करून दिले. 

राजवाड्यातील कलादालन

सध्या राजवाड्यात राजेसाहेब खेम सावंत सहावा, राणीसाहेब शुभदादेवी खेम सावंत भोसले, युवराज लखम खेम सावंत भोसले आणि युवराणी श्रद्धा लखम सावंत भोसले राहतात. मागील पिढीचा वारसा जोपासत आजही राजघराण्याने सांवतवाडी कला जतन करून ठेवली आहे. राजवाड्यातील काही भाग आता संग्रहालयामध्ये रूपांतरित केला आहे. राजघराण्यातील पिढीजात कलाकुसरीच्या वस्तू, तलवारी, चांदीचे काम केलेले सिंहासन, देवांच्या मूर्ती, कलाकुसर केलेले लाकडी देवघर, इतर लाकडी वस्तू, सतीशीळा, राजवस्त्रे, गंजिफा अशा अनेक गोष्टी तेथे पाहायला मिळतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम
iron calcium deficiency : भारतात बहुतांश स्त्रियांमध्ये लोह (Iron) आणि कॅल्शियम (Calcium) ची कमतरता आढळते. यामुळे त्यांना थकवा, अशक्तपणा आणि

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ