‘पाकिस्तान’चं नाव कुठेही वाचण्यात, ऐकण्यात आलं की, प्रत्येक भारतीयाच्या डोक्यात एक तीव्र सणक जाते. 1947 मध्ये भारतासोबतच स्वतंत्र झालेल्या या दोन्ही देशांच्या प्रगतीची तुलना केली तर हे लक्षात येतं की, भारत हा सर्वच क्षेत्रात कितीतरी पटीने पुढे निघून गेला आहे. आपल्या देशातील लोकांच्या अतिरेकी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सपशेल अयशस्वी ठरलेला हा देश त्यांच्या कर्माने जागतिक पातळीवरील व्यापार वाढवण्याच्या चर्चांमध्ये कुठेच महत्वाचा मानला जात नाही. क्रिकेट आणि भालाफेक सारखे काही खेळ असे आहेत ज्यामध्ये पाकिस्तानने आपला थोडा फार मान ठेवून घेतला आहे.
डिजिटल आणि सोशल मीडिया क्रांतीचा परिणाम
भारतात झालेल्या डिजिटल आणि सोशल मीडिया क्रांतीनंतर ‘पाकिस्तानी टीव्ही सिरियल्स’ने मात्र कडवट शत्रुत्व असलेल्या या दोन देशांना एकमेकांशी ऑनलाईन कनेक्ट केलं, असं आपण म्हणू शकतो. काही वर्षांपूर्वी पर्यंत पाकिस्तानच्या कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करणं म्हणजेच ‘देशद्रोह’ मानला जायचा. पण, आज काळ बदलला आहे. लोकांच्या डोक्यात गोष्टी बऱ्याच सॉर्टेड झाल्या आहेत. पाकिस्तान हा त्याच्या अतिरेकी कारवायांमुळे आपला शत्रू आहेच; त्याच्या कलाकारांना, खेळाडूंना भारतात काम करण्यासाठी, खेळण्यासाठी बंदी आहे आणि असलीच पाहिजे हे आपलं क्लिअर आहे. आपल्याला तिथल्या सिरीज या केवळ त्यांच्या ‘सादगी’मुळे आवडत आहेत. त्यांच्या सिरियल्समध्ये असलेला आदरयुक्त संवाद आपण आपल्यावर झालेल्या ओटीटीच्या, काही बीभत्स वेबसिरीजच्या आक्रमणामुळे आपण मिस करत आहोत; आणि म्हणूनच कदाचित आजचा भारतीय प्रेक्षक हा पाकिस्तानी कंटेंटला दाद देतोय. सीमापार तिकडे असं काय वेगळं मनोरंजन सुरू आहे ? काही उदाहरणांमधून जाणून घेऊयात.
एकही व्हिलन नसलेली सिरीज
‘कभी मै कभी तुम’ ही पाकिस्तानी सिरीज सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या सिरीजपैकी एक आहे. ही एक लव्हस्टोरी आहे. अभ्यासात हुशार असलेली एक मुलगी जीवनाकडे बघण्याचा प्रॅक्टिकल अप्रोच असलेल्या एका मुलाच्या प्रेमात पडते. मुस्तफा आणि हनिया ही या सिरीयलच्या प्रमुख पात्रांची नावं आहेत. दोन पूर्णपणे भिन्न वातावरणात वाढलेले, स्वभावात प्रचंड तफावत असलेले हे दोघं हळुवारपणे एकमेकांच्या प्रेमात पडतात. त्या ओघानेच सिरीयल मध्ये ऐकायला येणारी उर्दू शायरी ही रोमँटिक प्रेक्षकांना सिरियलची 34 भाग बघण्यास भाग पाडते.
‘मेरे हमसफर’ ही दुसरी लोकप्रिय पाकिस्तानी सिरीज आहे ज्याचं भारतातील प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं आहे. ‘हाला’ नावाच्या एका ब्रिटिश मुलीची ही कथा आहे. लहानपणीच तिचे आई वडील एकमेकांपासून विभक्त होतात. ‘हाला’ आपलं बालपण पाकिस्तानात जगते. निरागस मुलगी ते स्ट्रॉंग लेडी असा पूर्ण प्रवास या सिरीजने 40 भागांमध्ये कव्हर केला आहे. सिरीजचा नायक ‘हमझा’ हे पात्र देखील प्रेक्षकांना फार भावलं आहे. काही भारतीय प्रेक्षकांनी या जोडीचं आजवर बघितलेली सर्वोत्कृष्ट जोडी म्हणून देखील उल्लेख केला आहे. या सिरीजमध्ये कोणतंही नकारात्मक पात्र नसल्याने देखील प्रेक्षकांना ही सिरीज बघणं सुखावह वाटलं असावं.
राजकीय घराणी
‘मेरे मेहेरबा’ ही पाकिस्तानी सिरीज दोन राजकीय परिवारांच्या राहणीमानावर भाष्य करते. दोन भाऊ, त्यांचं कुटुंब आणि दोघांच्या दोन मुली इतकीच या सिरीजची प्रमुख स्टारकास्ट आहे. दोन भावांपैकी एका भावाच्या मुली या अदबीने वागणाऱ्या असतात; तर दुसऱ्या भावाच्या मुली या मॉडर्न होण्याच्या प्रयत्नात उद्धट झालेल्या असतात. प्रत्येक पात्र हे रिलेटेबल असल्याने भारतीय आणि इतर देशांतील प्रेक्षकांनी देखील ही सिरीज आवडलेली आहे.
‘परिझाद’ ही पाकिस्तानी सिरीज एका संवेदनशील विषयावर भाष्य करते. दिसायला कुरूप असलेल्या एका व्यक्तीला समाज कशी वागणूक देतो ? त्याला आपलं प्रेम मिळवण्यासाठी, आवडीचं काम करण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो ? हे या सिरीज मध्ये उत्कृष्टपणे दाखवण्यात आलं आहे. ‘परीझाद’ हा या पूर्ण परिस्थितीला आत्मविश्वासाने सामोरं जातो. स्वतःच्या मर्यादा मान्य करतो, बलस्थानांचा वापर करून यशस्वी होतो अशी ही कथा आहे. या सिरीजमध्ये स्त्री पात्रांची संख्या कमी आहे. कोणताही भावनिक गुंता किंवा ड्रामा नसतानाही ही सिरीज खिळवून ठेवते. सिरीज मधील शीर्षक पात्र हे इतक्या अडथळ्यांवर मात करून शेवटी एक समाजसेवक होतो आणि इतरांना त्यांच्या प्रश्नांवर मात करण्यासाठी मदत करतो हे प्रेक्षकांना अर्थातच खूप आवडतं.
आणखी काही विशेष सिरीज
‘बख्तावर’ ही कुटुंबाच्या जुन्या विचारांच्या कैदेत अडकलेल्या एका लहान मुलीची सिरीज आहे. या सिरीजची कथा, दिगदर्शन आणि सर्वांचा अभिनय हा कौतुकास्पद आहे. 25 भाग असलेल्या या सिरीजला 3 पुरस्कार मिळाले आहेत. ते तिन्ही पुरस्कार हे शीर्षक पात्र साकारणाऱ्या युमना झैदी हिला प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीतून मिळाले आहेत.
‘ख्वाजा अँड सन’ या पाकिस्तानी सिरीजने देखील काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. ही एका वडील आणि मुलाची कथा आहे. या मुलाला 9 बहिणी असतात. घरातील हे दोनच पुरुष इतरांना देखील त्यांच्या समोर आलेल्या संकटाला सामोरं जातांना सामावून घेतात आणि घरातील मुलींना कशी समान वागणूक देतात याची ही कथा आहे. प्रेक्षकांना या सिरीज मधील भाऊ बहीण यांच्यातील बॉंडींग ही कमाल दाखवण्यात आली आहे.
‘काबुली पुलाव’ ही पाकिस्तानी सिरीज सुद्धा प्रेक्षकांनी कथेतील वेगळेपणामुळे पसंत केली होती. लाहोर मध्ये रहाणारा 51 वर्षीय हाजी मुस्ताक आणि अफगाणी मुलगी बर्बीना यांच्याभोवती या सिरीजची कथा गुंफण्यात आली आहे. हाजी हा अफगाणिस्तानमध्ये गेलेला असतांना एका मस्जिदमध्ये बार्बीना त्यांना एक आश्रित म्हणून भेटते. तिचा भाऊ हाजीला अशी गळ घालतो की त्याने विधवा असलेल्या बार्बीना सोबत निकाह करावा. वयात असलेलं अंतर, दोन देशांमधील कटू संबंध या सर्वांवर दिगदर्शकाने योग्यपणे दाखवत ही प्रेमकथा फुलवली आहे.
‘जिंदगी गुलजार है’ ही आजवर पाकिस्तान मध्ये निर्मिती झालेल्या सिरीजपैकी सर्वोत्तम मानली जाते. उमेरा अहमद यांच्या पुस्तकावर आधारित असलेली ही सिरीज पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करू दिलेली पहिली सिरीज होती. सुलताना सिद्दीकी यांचं दिगदर्शन असलेल्या सिरीजमधील सर्व पात्र हे कोणत्या न कोणत्या आर्थिक प्रश्नांपुढे हतबल आहेत. या कथेची नायिका कशफ मूर्तझा ही तिच्या मध्यमवर्गीय घरातील सर्वात सकारात्मक पात्र दाखवण्यात आलं आहे. 2012 मध्ये पाकिस्तान मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिरीजचे हक्क दोन वर्षांपूर्वी नेटफलिक्सने विकत घेतले आणि ही सिरीज अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.
जग आपल्याला नावं ठेवत असतांना “आपण केवळ आपल्या कंटेंटवर लक्ष द्यायचं आणि आपल्या देशातील केवळ चांगल्याच घटना जगासमोर ठेवायच्या” हा विचार करणाऱ्या पाकिस्तानच्या या सर्व सिरीजच्या निर्माता, कथाकार यांचं आपण प्रेक्षक म्हणून नक्कीच कौतुक केलं पाहिजे.