बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे राज्यभरात मूक आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात पुण्यामध्ये आंदोलन पार पडलं. यावेळी खा. सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले. तर मुंबईमध्ये शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनाजवळ काळ्या फिती बांधुन या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला. तर काँग्रेस पक्षाकडून ही खा. वर्षा गायकवाड यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.
याला राजकारण म्हणतात का? शरद पवारांचा सरकारला सवाल
‘राज्यभरात दर दिवशी कुठे ना कुठे महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मात्र, महायुती सरकारकडून या घटनांना गांभीर्यांने घेतलं जात नाहीये. या घटनांविरोधात आवाज जरी उठवला तरी विरोधक राजकारण करतंय असं म्हटलं जातं. अशा निषेध आंदोलनांना पॉलिटिकल शो असं संबोधलं जातं हे किती असंवेदशील आहे,’ असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी मांडलं.

हे निर्ढावलेलं सरकार आपल्यावर राज्यावर सत्ता करतंय – उद्धव ठाकरे
महायुती सरकार हे गुन्हेगारांना पाठिशी घालत आहे. त्यामुळे राज्यपालांना आम्ही विनंती करतो की, त्यांनी शक्ति कायदा अंमलात आणावा, कारण हे सरकार निर्ढावलेलं असून ते आपल्या राज्यावर राज्य करतायेत. आजच्या या आंदोलनाला घाबरूनच त्यांनी त्यांची माणसं न्यायालयात पाठवून त्यांच्या मार्फेत याचिका दाखल करून घेतली. पण जरी सरकारने आजच्या बंदला बंदी केली तरी ही निषेधाची मशाल प्रत्येकांच्या मनात धगधतेय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
आम्हाला सुरक्षित महिला योजनेची गरज – खा. वर्षा गायकवाड
महायुती सरकारकडून लाडली बहिण योजना राबवली जात आहे. पण आज आम्हाला लाडकी बहिण नको तर सुरक्षित बहिण योजना हवी आहे. आज राज्यात महिला अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज हा सरकार दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. पण आम्ही घाबरणारे नाही तर लढणारे आहोत आणि आम्ही आमचा लढा सुरूच ठेवणार.
दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली. मात्र,गुणरत्न सदावर्ते यांनी या बंद विरोधात याचिका दाखल केली. त्यावर हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगत उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला बंद मागे घेण्याचं आवाहन केलं. त्यामुळे आज महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी काळ्या फिती बांधुन बदलापूरच्या घटनेचा निषेध नोंदवला.