PM Narendra Modi in Wardha : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, राज्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकोपयोगी कार्यक्रमांचा धडाका सुरू आहे. केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेला 18 सप्टेंबर रोजी 1 वर्ष पूर्ण झालं. या निमित्ताने वर्धा येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (20 सप्टेंबर) या योजनेच्या वर्षपूर्ती सोहळ्यात सहभागी झाले. या कार्यक्रमाबरोबरच,मोदींच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटनेही करण्यात आली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण विदर्भ दौरा
पंतप्रधानांचा हा विदर्भ दौरा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानला जात आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विदर्भात आघाडी घेतली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात महाविकास आघाडी वरचढ राहिल्यामुळे, या दौऱ्याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
मोदींचा काँग्रेसवर घणाघात
वर्ध्यातील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. विदर्भात कापूस उत्पादनाची परंपरा असूनही, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारने कापूस उत्पादकांना डबघाईला आणल्याचा आरोप त्यांनी केला. “काँग्रेसने शेतकऱ्यांच्या नावावर फक्त राजकारण केले, त्यांच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष केलं,” असं मोदी त्यांच्या भाषणात म्हणाले.
राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका
पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षाने विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहचू दिला नाही आणि त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू एक व्यक्ती आणि एका घराण्यापुरता राहिला आहे, असा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधींनी अमेरिकेत आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी राहुल गांधींवरही टीकास्र सोडलं. काँग्रेस आता आपला देशविरोधी अजेंडा विदेशातून राबवत असल्याचं मोदी म्हणाले.
निवडणूक प्रचाराचा प्रारंभ?
वर्ध्यातील या दौऱ्यानंतर भाजपच्या निवडणूक प्रचाराला अधिक वेग येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विदर्भातील काँग्रेस आणि महाविकास आघाडीशी थेट टक्कर देण्यासाठी भाजपने कंबर कसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.