बुधवारी सकाळी 10 नंतर सतत 4 दिवस कोसळणाऱ्या पावसानं जरा उघडीप घेतली आहे. त्यामुळं सध्या मुंबई, ठाण्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र हवामान खात्यानं दुपारी मोठ्या पावसाची शक्यता वर्तवल्यामुळं आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं. मुंबई, ठाणे, पालघर परिसरातील शाळा आणि महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्वेकडील कमी दाबाचे क्षेत्र कमकुवत झाल्यावरच पावसाची तीव्रता कमी होईल. रेड अलर्ट बुधवारी सकाळी संपत असला तरी महाराष्ट्रात अतिवृष्टी शुक्रवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी ऑरेंज अलर्ट तर रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
गेल्या 24 तासांत मुंबईमध्ये 300 मिमि पाऊस पडला. राज्यात गेल्या चार दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे 21 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 जण जखमी आहेत. बुधवारपर्यंत सुमारे दिड हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. या अतिवृष्टीमुळं राज्यात साधारण 14 लाख एकर शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
मंगळवारच्या पावसामुळे मुंबई, ठाणे आणि परिसरात नागरिकांचे अतोनात हाल झाले. शाळांना सुट्टी जाहीर केल्यामुळं मुले घरीच होती. पण काही खाजगी कार्यालयांनी उशिरा सुट्टी जाहीर केल्याने कर्मचारी घरातून आधीच बाहेर पडले होते. हे लोक लोकलमध्ये जवळपास 8-9 तास अडकून पडले. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही लोकलसेवांना पावसाचा फटका बसला. सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती. रस्त्यांवरही पाणी असल्यानं रस्ते वाहतूकही काही ठिकाणी बंद तर काही ठिकाणी संथ गतीनं सुरू होती. समुद्राला भरती असतानाच मोठा पाऊस कोसळत असल्यानं कित्येक ठिकाणी पाणी भरलं. मिठी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहचल्यानं तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याकरता एनडिआरएफला बोलावण्यात आलं. कुर्ल्यातील क्रांतीनगर परिसरातील सुमारे 350 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
पुण्यातील ताम्हिणी घाटात 24 तासात 575 मिमि पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भालाही पावसानं चांगलंच झोडपलं असून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
दरम्यान गेल्या चार दिवसाच्या पावसामुळं राज्यातील जवळपास सर्व धरणं तुंडूब भरली आहेत. त्यामुळं पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
बंगालचा उपसागरातली कमी दाबाची प्रणाली पश्चिम दिशेला सरकत आहे. यामुळं आंध्रप्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार 20 ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे.
मुंबई, ठाणे, कोकण आणि कोल्हापूरमध्ये सोमवारपासून सुरू पावसाची मुसळधार मंगळवार 19 ऑगस्टलाही सुरूच आहे. पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड यांच्याकरता पुढील काही तास हे काळजीचे असणार आहेत. विदर्भातही अतिवृष्टीमुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेनं ज्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम पद्धतीनं काम शक्य आहे त्यांना त्या प्रकारे काम सांगितले आहे. बऱ्याचशा खाजगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमला पसंती दिली आहे. सोमवार आणि मंगळवार दोन्ही दिवशी सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईतली लोकल वाहतूक धिम्या गतीनं सुरू आहे. आवश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
मुंबईतील गोरेगाव पूर्व इथल्या ओबेरॉय मॉल समोरिल जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी तुंबलं आहे.
दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्रनगर सबवे, सरदार नगर, प्रतिक्षा नगर या भागात आजही दीड ते दोन फूट पाणी साचले आहे.
मिठी नदीची पातळी सतत वाढत असून परिसरातील नागरिकांना स्थलांतरीत करण्याची तयारी बृहन्मुंबई महापालिकेनं केली आहे. या परिसरात एनडिआरएफची टीम दाखल झाली आहे.
ठाण्यात गेल्या चोवीस तासात 223.73 मिमि पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ठाणे शहरात नौपाडा भागात झाड पडल्याची घटना घडली. तर घोडबंदर रोडवरील चितळसर भागात पाणी साचल्यानं एकाच मार्गिकेवरून वाहतूक सुरू आहे. शक्य असेल तर या घोडबंदर मार्गावरून वाहतूक करण्याचे टाळा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. सोमवारपासून घोडबंदर रोडवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.
डोंबिवली स्थानक परिसरात पाणी भरल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरमध्येही पावसामुळं नागरिकांचे हाल होत आहेत. इथल्या उल्हास आणि बारवी नद्यांची पातळी सतत वाढत आहे.
पुण्यातही सोमवारपासून पावसाची मुसळधार सुरूच आहे. पुढील तीन दिवसांकरता पुण्यालाही रेड अलर्ट देण्यात आला आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नांदेडमध्ये बचावकार्यासाठी लष्कराची मदत घेण्यात येत आहे.
महत्त्वाचे संपर्क क्रमांक –
नागरिकांच्या मदतीसाठी मंत्रालयात चोवीस तास आपत्तीनिवारण केंद्र सुरू आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे –
022-22794229
022-22023039
9321587143