महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला थोडा विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा जोर धरला आहे. विशेषतः कोकण आणि मुंबई परिसरात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने विविध प्रकारचे अलर्ट जारी केले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा देशात आणि महाराष्ट्रात मान्सून नेहमीपेक्षा लवकर दाखल झाला. मे महिन्यात अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र पुन्हा जूनच्या सुरुवातीपासून पावसाने ब्रेक घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.पण आता मात्र 13 जूनपासून पुन्हा मान्सून सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता, तो खरा ठरला आहे. पुढे 17 जूनपर्यंत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणात विशेषतः तळकोकणात पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईकरांसाठी ‘यलो अलर्ट’
मुंबई आणि उपनगरांमध्ये येत्या 24 तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला असून, 64.5 मि.मी. ते 115.5 मि.मी. इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडताना छत्री, रेनकोटची सोबत घ्यावे आणि गरज असल्याशिवाय घराबाहेर न पडण्यास सांगितलं आहे.
ठाणे, पालघर जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’
मुंबई लगतचे ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये 115.6 मि.मी. ते 204.3 मि.मी. पावसाची शक्यता आहे. जास्त पावसामुळे शहरांमध्ये पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे, तर डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे प्रशासनाने लोकांना शक्यतो घरातच राहण्याची सूचना दिली आहे.
रायगडसह काही राज्यांसाठी ‘रेड अलर्ट’
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात येत्या 24 तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देत हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. म्हणजेच 204.5 मि.मी. पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. या भागात मुसळधार पावसामुळे पूर, दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रशासनाकडून आपत्कालीन उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. याचप्रमाणे गोवा, केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर देखील ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
तसचं मराठवाडा आणि विदर्भातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या भागांमध्ये देखील येत्या दोन दिवसांत पावसाचा अंदाज सांगितला आहे. दिल्लीला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.