श्रीलंकेतील नवीन राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी आज देशभरात मतदान होत आहे. 2022 पासून आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकन नागरिकांसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. निवडून येणाऱ्या राष्ट्राध्यक्षासमोर श्रीलंकेची अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्याचं मोठं आव्हान असणार आहे. यासोबतच महागाई, जीडीपी, देशांतर्गत गुंतवणूक अशा सगळ्याच पातळीवर कौशल्याने काम करावं लागणार आहे.
नवोदित राष्ट्राध्यक्षा समोरील आव्हानं
सन 2022 मध्ये श्रीलंकेसमोर परकीय चलनाच्या तुटवड्याचं मोठं संकट उभं राहिलं. या आर्थिक अडचणीमुळे इंधन, औषधांचा पुरवठा, स्वयंपाकासाठी लागणारा गॅस आयात करण्यासाठी ही पुरेसं परकीय चलन नसल्याने संपूर्ण देशात हाहाकार माजला होता. महागाईने उच्चांक गाठला होता. या आर्थिक संकटात होरपळून निघालेल्या श्रीलंकन नागरिकांनी कोलंबो येथे राष्ट्राध्यक्षांविरोधात बंड पुकारत राष्ट्राध्यक्ष निवासस्थानावर हल्ला केला होता. त्यावेळी तत्कालीन अध्यक्ष गोटाबाय राजपक्षे यांनी देशातून पलायन करत पदाचा राजीनामा दिला.
श्रीलंकेला या आर्थिक संकटांतून बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून 299 कोटी रुपयांचा (2.9 बिलीयन डॉलरचा) आर्थिक मदत विविध कार्यक्रमांद्वारे देण्यात आली. या आर्थिक सहाय्यामुळे श्रीलंकेला मोठी मदत झाली.
मात्र, महागाई, लोकांचे राहणीमान, जीडीपी, देशांतर्गत सुरक्षा, विकासात्मक प्रकल्प, महिला समस्या, रोजगार हे विषय मात्र तसेच राहिले आहेत. त्यामुळे नवोदित राष्ट्राध्यक्षाला या सर्व विषयांवर प्रामुख्याने लक्ष देणं गरजेचं आहे.
कशी होते राष्ट्राध्यक्ष निवडणूक?
देशभरात एकाच दिवशी राष्ट्राध्यक्ष पदासाठी थेट मतदान करण्याची पद्धत आहे. यासाठी यंदा संपूर्ण देशभरात 13 हजार मतदान केंद्रांची उभारणी केली आहे. जवळपास 220 लाख नागरिक यासाठी मतदान करणार आहेत. दुपारी 4 वाजता मतदान संपल्यावर ताबडतोब मतदान मोजणीला सुरूवात करून रविवारी म्हणजे 22 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.
या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदाराला तीन मतं देण्याचा अधिकार असतो. ज्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 50 टक्के मतं पडतात तो उमेदवार राष्ट्राध्यक्ष म्हणून जाहीर केला जातो. मात्र, जर कोणत्याच उमेदवाराला पहिल्या पसंतीची 50 टक्के मते मिळाली नाहित तर पुढच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची सर्वाधिक मतं मिळवणारा नेता विजयी ठरतो.
दरम्यान, राष्ट्राध्यक्ष पदासाठी दावेदार असलेले विद्यमान राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि विरोधी नेते साजिथ प्रेमदासा हे दोन्ही नेते उजव्या विचारसरणीचे असून मार्क्सवादी नेते अनुरा कुमार दिसानायके हे चीन समर्थक आहेत. त्यामुळे भारताचंही या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.