दिनांक 26 जानेवारी 2025 म्हणजे प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म, पद्मश्री आणि पद्म विभूषण पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यामध्ये यंदा गोवा मुक्तीसाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी लिबीया लोबो-सरदेसाईं यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलं. लिबीया यांनी वयाची शंभरी गाठली आहे.
सलग सहा वर्ष भूमिगत रेडिओ चालवत त्या गोवा मुक्ती संग्राम लढल्या होत्या. त्यांच्या या लढाईला यश मिळालं. त्यामुळे भारतीय लष्कराच्या मदतीने 19 डिसेंबर 1961 रोजी त्यांनी आकाशात भरारी घेत गोवा मुक्त झाल्याची घोषणा केली.
पोर्तुगिजांच्या सत्तेचा अंमल
इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्षे राज्य केलं. तर पोर्तुगिजांनी गोव्यावर तब्बल साडेचार शतके राज्य केलं. 25 नोव्हेंबर 1510 साली पोर्तुगिजांनी गोव्यावर ताबा मिळवला. सन 1947 साली भारत इंग्रजांच्या राजवटीतून स्वतंत्र झाला. मात्र पोर्तुगिजांनी त्यावेळी गोव्याचा ताबा सोडला नव्हता. त्यानंतरही तब्बल 14 वर्षे गोवा हा भारताचा भाग असूनही पोर्तुगिजांच्या ताब्यातला एक प्रांत होता.
लिबीया लोबो-सरदेसाईंचा स्वातंत्र्यसेनानी म्हणून प्रवेश
लिबीया यांचा जन्म 25 मे 1924 साली गोव्यामध्ये झाला होता. मात्र, त्यांचं शिक्षण हे मुंबईत झालं होतं. कॉलेजमध्ये शिकत असताना त्या गोवा मुक्ती संग्राम लढ्यामध्ये सहभागी झाल्या.
सन 1954 साली भारतीय सत्याग्रहींनी गोवा मुक्तीची मागणी केली. तेव्हापासून पोर्तुगीज सरकारने गोव्याच्या सर्व सीमा ज्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याशी जोडलेल्या होत्या त्या बंद केल्या. भारतासोबतचे सर्व आर्थिक संबंध तोडून आर्थिक नाकेबंदी केली. समुद्र, हवाई आणि रस्ते मार्गाद्वारे होणारी वाहतुकही बंद केली. अशाप्रकारे पोर्तुगिजांनी भारतातल्याच एका प्रांताला भारतापासून तोडण्यासाठी मोर्चेबांधणी केली.
ऑगस्ट 1955 साली हजारो सत्याग्रहींनी गोव्यावर चाल केली. त्यावेळी पोर्तुगीज सरकारने या सत्याग्रहींवर गोळीबार केला. अनेकांना ताब्यात घेतलं गेलं. यामध्ये अनेक सत्याग्रहींचा मृत्यू झाला.
गोव्यातलं सेन्सॉर युग
गोवा मुक्तीसाठी केलेल्या सत्याग्रहाच्या या प्रयत्नानंतर गोव्यामध्ये पोर्तुगिजांनी सर्व गोष्टींवर सेन्सॉर लावण्यास सुरुवात केली. वृत्तपत्रं, मासिकांशिवाय चक्क लग्नाची आमंत्रण पत्रिका आणि कॅलेंडरही सेन्सॉर होऊ लागलं. या गोष्टींवर सेन्सॉरचा शिक्का असल्याशिवाय ते छपाई किंवा वाटण्यासाठी परवानगी नाकारली जाऊ लागली. तसंच गोव्याच्या बाहेरून कोणतंच छापील कागद आणण्यास परवानगी नाकारली. गोव्यातील वृत्तपत्र आणि रेडिओवरही निर्बंध लादले होते.
वॉइस ऑफ फ्रीडम
गोवा हा भौगोलिक दृष्ट्या छोटा प्रदेश होता. पोर्तुगिजांच्या ताब्यातून गोव्याला मुक्त करण्यासाठी चळवळ उभी करणं, लोकांमध्ये स्वातंत्र्यांची जाणीव निर्माण करुन त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं होतं. त्यासाठी पोर्तुगिजांच्या खोट्या अपप्रचाराला प्रत्युत्तर देणं अत्यावश्यक होतं. या कामात लिबीया लोबो सरदेसाई यांनी पुढाकार घेतला. सगळ्याच गोष्टींवर पोर्तुगिजांनी निर्बंध घातल्यामुळे लिबीया लोबो सरदेसाई यांना भूमिगत रेडिओ सुरू करण्याची कल्पना सुचली.
‘Q’ भूमिगत रेडिओ स्टेशन
लिबीया लोबो, निकोल मिनेझिस आणि वामन सरदेसाई अशा तिघांनी मिळून हे रेडिओ स्टेशन सुरू केलं. त्यांनी दादरा आणि नगर हवेली इथल्या दोन वायरलेस सेटचं रुपांतर रेडिओ ट्रान्समिटरमध्ये केलं. या रेडिओला सुरुवातीला ‘Q’ असं नाव दिलेलं.
ज्या दिवशी पोर्तुगीज गोवा जिंकल्याचा वर्धापन दिन साजरा करायचे, त्याच दिवशी हे रेडिओ स्टेशन सुरू करण्याचं ठरलं. त्यानुसार दिनांक 25 नोव्हेंबर 1955 रोजी या रेडिओचं पहिल प्रसारण झालं. या रेडिओवर सकाळी आणि संध्याकाळी जवळपास एक तासाचे लाईव्ह गोवा मुक्तीशी संबंधित कार्यक्रम प्रसारित केले जायचे. कोकणी भाषिकांसाठी ‘गोएंनचे सोडवानेचो आवाज’ या नावाने कार्यक्रम प्रसारित होत असे. तर पोर्तुगिज भाषिकांसाठी ‘व्होझ डी लिबरडेड’ या नावाने कार्यक्रम होत असे.
या कार्यक्रमांचं प्रसारण हे थेट महाराष्ट्रातल्या आंबोलीच्या जंगलातून केलं जायचं. या जंगलामध्ये एक ट्रक ठेवला होता. त्या ट्रकमधून कार्यक्रमाचं प्रसारण व्हायचं. काही महिन्यानंतर निकोल मिनेझिस या कामातून बाहेर पडल्या. त्यानंतर, लिबीया लोबो आणि वामन सरदेसाई यांनी कर्नाटकमधून हे रेडिओ प्रसारण सुरू ठेवलं.
लिबिया आणि वामन हे दिवसातले 18 तास काम करायचे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही भाषिकांसाठी कार्यक्रम तयार करणं, ते प्रसारित करणं याशिवायही स्वातंत्र्यासाठी उपयुक्त अशी बरीच कामं ते करायचे. यात प्रामुख्यानं वेगवेगळ्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळींची माहिती देणं, त्यांच्या अभ्यास करणं, त्यातून गोवा मुक्तीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जमवणं, भारतात आणि परदेशात काय काय घडतंय याची माहिती गोव्यातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं अशी सगळी कामं ते करत असत.
सलग सहा वर्ष भूमिगत रेडिओ चालवणं खूप आव्हानात्मक
पद्मश्री पुरस्कृत लिबीया यांनी गेल्या वर्षी इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या या अनुभवाविषयी सांगितलं आहे. त्या म्हणतात की, “आताच्या परिस्थितीत सहा वर्ष रेडिओ चालवणं ही खूप सामान्य बाब आहे. मात्र, स्वातंत्र्यासाठी सलग सहा वर्ष भूमिगत रेडिओ चालवणं खूप आव्हानात्मक होतं. तुरुंगवास सहन करण्यापेक्षाही हे भयानक होतं याची जाणीव आता होते. कारण त्यावेळी पकडले जाऊ नये म्हणून समाजापासून दूर, एकांतात राहावं लागायचं. ते ही जंगलाच्या परिसरात. जंगलात नाग, अजगरसारखे विषारी साप आणि जंगली प्राणी आजुबाजूला फिरत असायचे.
कित्येकदा रेडिओ प्रसारण करून ट्रकमधून बाहेर पडताना त्यांना जळूंनी दंश केला. या सहा वर्षात पोर्तुगिजांच्या जाचाने, गोळीबाराने आमचं रक्त सांडलं नसेल पण या जळूंच्या दंशामुळे नक्कीच आमचं रक्त सांडलं आहे.
ऑपरेशन विजय
अखेर गोव्याच्या मुक्तीसाठी भारतीय लष्कराकडून ‘ऑपरेशन विजय’ सुरू करण्यात येणार होतं. या मिशनच्या काही दिवस आधी भारतीय लष्कर लिबीया आणि वामन यांना सुरक्षेसाठी बेळगावच्या सरकारी विश्रामगृहात घेऊन गेले.
दिनांक 17 डिसेंबर 1961 रोजी, केंद्रीय गृहमंत्री वी.के.कृष्णा मेनन यांनी पोर्तुगीज गव्हर्नर जनरल यांना कोणतीही जीवीतहानी न करता शरण येण्याचं आवाहन केलं. पोर्तुगीज जर सकारात्मक उत्तर देत शरण आले नाहीत तर, गोव्यात भारतीय लष्कर घुसवलं जाईल, असा इशारा दिला.
मात्र, याला पोर्तुगीज गव्हर्नर जनरलने कोणतंच प्रत्युत्तर दिलं नाही. त्यामुळे मग भारतीय लष्कराने ऑपरेशन विजयला सुरुवात केली. लेफ्टनंट जनरल जे.एन.चौधरी आणि साऊथ कमांडचे चीफ यांनी लिबीया यांना या ऑपरेशनचे तपशील देत, पोर्तुगीज लष्कराला सर्व बाजूंनी घेरल्याची माहिती दिली.
त्यानंतर, लेफ्टनंट जनरल चौधरी यांनी लिबीया यांना सांगितलं की, “मिस लोबो! माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. पोर्तुगीज लष्कर शरण आलं आहे.” अशाप्रकारे लष्करांनेच लिबीया यांना सर्वात आधी गोवा मुक्त झाल्याची बातमी दिली होती.
शेवटच्या प्रसारणातून गोवा मुक्तीची अनोखी घोषणा
गोवा मुक्त झाल्याची बातमी लेफ्टनंट जनरल यांनी लिबीया लोबो यांना दिल्यावर त्यांनी तिला विचारलं की, आता तुम्ही काय करणार? तेव्हा लिबीया म्हणाल्या होत्या की, “मला आता गोवा मुक्त झाल्याची घोषणा आकाशातून करायची आहे”. जनरल यांनी लिबीया यांची इच्छा गांभीर्याने घेत ती पूर्ण केली. त्यावेळेला पोर्तुगिजाचं वास्तव्य गोव्यात होतं. त्याचं लष्कर गोव्यात उपस्थित होतं. त्यामुळे या लष्करांकडून भारतीय लष्करांच्या विमानावर गोळीबार होण्याची शक्यता होती. याची माहिती भारतीय लष्कराने लिबीया लोबा यांना दिली. त्यावेळी त्यांनी उत्तर दिलेलं की, “मला आता पोर्तुगिजांच्या बंदुकीतल्या गोळींची भिती वाटत नाही. कारण आता जरी माझा त्यांच्या बंदुकीतल्या गोळीने मृत्यू झाला तरी मी स्वतंत्र गोव्यात मरण पावेन.”
दिनांक 19 डिसेंबर 1961 साली, सकाळी लिबीया लोबो आणि वामन सरदेसाई यांना भारतीय लष्कराच्या विमानातून पणजी इथं आणण्यात आलं. या विमानाला खालच्या बाजूने लाऊडस्पीकर जोडलेला होता. पणजीच्या वर विमान पोहोचल्यावर त्यांनी विमानातून खाली गोवा मुक्तीची पत्रकं टाकली. त्यानंतर कोकणी आणि पोर्तुगीज भाषेत पोर्तुगीज सैन्य शरण आल्याची घोषणा करत गोवा मुक्त झाल्याचं जाहीर केलं.
ही घोषणा करताना त्या म्हणाल्या की, “बधुंनो आणि बहिणींनो आनंद साजरा करा! आज 451 वर्षाच्या परकीय राजवटीतून गोवा मुक्त झाला आहे आणि आपल्या मातृभूमीशी जोडला गेला आहे.”