पावसाळ्यात गरमागरम लिंबू आणि मसाला लावलेलं मक्याचं कणीस आपण खातोच खातो.. तो टाळण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. हा भाजलेला मका जितका स्वादिष्ट लागतो तितक्याच सुंदर बाहुल्या या कणसाच्या सालीपासून करता येतात. होय, कणसाच्या जैविक कचऱ्यापासून आकर्षक बाहुल्या तयार केल्या जातात.
मणिपूरमधल्या हरहुन्नरी कलाकार
मणिपूरच्या डोंगराळ भागातल्या सेनापती जिल्ह्यामध्ये हा बाहुल्या पाहायला मिळतात. इथल्या नेली चाचेया या मक्याच्या कचऱ्यापासून (बाह्य आवरणांपासून) बाहुल्या तयार करतात. नेली या व्यवसायाने फ्लोरिस्ट आहेत. सेनापती जिल्ह्यातच त्यांचं फुलाचं दुकान आहेत. या दुकानातच ते मक्याच्या कचऱ्याचा पूर्नवापर करुन छान बाहुल्या तयार करतात. मक्याच्या बाह्य आवरणापासून ते बाहुल्यांचं शरीर तयार करतात तर बाहुलीचे केस म्हणून मक्यातील मऊ धाग्याचा वापर करतात. या बाहुल्यांच्या हातात फुलांचे पुष्पगुच्छ ठेवून त्यांना सुंदर रंग देऊन ते फुलांच्या दुकानामध्येच विक्रीसाठी ठेवतात.
मणिपूरमध्ये या बाहुल्यांची ख्याती
नेली यांचं फुलांचं मोठं दुकान आहे. वेगवेगळ्या प्रकारची फुलं विक्रीसाठी उपलब्ध असतात. यातच या बाहुल्यासुद्धा खूप रेखिव पद्धतीने दुकानात मांडलेल्या असतात. तरुणाना ही अशा पद्धतीने तयार केलेल्या बाहुल्या खूप आवडत आहेत. त्यामुळे संपूर्ण मणिपूरमधून लोकं इथे बाहुल्या खरेदी करण्यासाठी येतात.
रचोया या ग्राहकांनी सांगितलं की, मी या दुकानात फुलं घेण्यासाठी आली होती. पण इथे इतकी सुंदर, साधी आणि आकर्षक बाहुल्या पाहुन मला खूप प्रसन्न वाटलं. म्हणून फुलांसोबतच मी वेगवेगळ्या बाहुल्यासुद्धा खरेदी केल्या. नेली यांची कला खुप सुंदर आहे. लोकं जे कचरा म्हणून फेकुन देतात त्यातून इतकी सुंदर कलाकृती त्या घडवतात. त्यामुळे नेली या स्थानिक भागात एक प्रेरणादायी व्यक्ति म्हणून गणल्या जातात.
अशांततेत प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न
नेली यांच्या प्रत्येक बाहुलीतून प्रेम, शांती आणि संयम हा संदेश अनुभवायला मिळतो. नेली या एक छंद म्हणून अशा बाहुल्या बनवत असत. पण जेव्हा आर्थिक चणचण भासू लागली तेव्हा याच छंदाचं रुपांतर छोट्या व्यवसायामध्ये झालं. त्या ग्राहकांच्या सांगण्यानुसार कस्टम बाहुल्यासुद्धा बनवून देतात. आज सेनापती जिल्ह्यामध्ये तिचं दुकान हे एक विशेष स्थळ म्हणून ओळखलं जातं.
नेली सांगतात की. गेल्या काही वर्षापासून मणिपूरमध्ये अशांततेचं वातावरण आहे. अशा परिस्थितीत आजुबाजुला प्रसन्नता, आनंद आणि प्रेमाचा संदेश त्या या बाहुल्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतात.