स्वातंत्र्य मिळून भारताला 78 वर्षे पूर्ण झाली. मात्र, अद्याप भारतातील काही गावं ही अंधारात आहेत. ग्रामीण भारतात अशी अनेक गावं आहेत जी सुर्यासोबत उगवतात आणि सुर्य मावळला की अंधारात गुडूप होऊन जातात.
पण देशाच्या 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्तीसगडमधल्या चिलकापल्ली गावामध्ये अखेर वीजेवर चालणारा बल्ब पेटला आहे. यामुळे या चिलकापल्ली गावामध्ये आनंदी आनंद असून खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिवस साजरा झाला आहे.
नक्षलींच्या सावलीत असलेलं गाव
चिलकापल्ली हे छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यातलं एक गाव आहे. जिल्ह्या कार्यालयापासून 50 किमी अंतरावर आहे. फुटकल पंचायतीच्या हद्दीत असलेलं हे दुर्गम गाव आहे. या गावापर्यंत वीज पुरवठा पोहोचविण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांचं निर्माण करणं हा प्रादेशिक विकासाचा एक टप्पा गाठल्याचं मानलं जात आहे. याला कारण आहे ते या गावचं भौगोलिक स्थान.
प्रशासकीय केंद्रापासून दूर असलेल्या या गावात नक्षलवाद्यांची दहशत होती. त्यामुळे या गावात विकासात्मक कामं सुरू करुन ते पूर्ण करण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या संयुक्त कार्यक्रमामुळे या अडचणींवर मात करता आली.
गेल्या 3 ते 4 महिन्यापासून या गावामध्ये वीज पुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या सोई-सुविधा निर्माण करण्याचं काम सुरू होतं. या कामावेळी नक्षलवाद्यांचा त्रास होऊ नये म्हणून सरकारतर्फे सीआरपीएफ पोलिसांची सुरक्षा तैनात करण्यात आली होती. पूर्ण तीन ते चार महिने सीआरपीएप पोलिसांच्या सुरक्षेत हे काम पूर्ण करून दिनांक 23 जानेवारीला या गावात वीजेवर चालणार बल्ब सुरू झाला.
नियद नेल्लानार योजना
या वर्षभरात वीज पुरवठा सुरू होणारं बीजापूर जिल्ह्यातलं हे सहावं गाव आहे. बीजापूरमधल्या इतरही गावात वीजेचा पुरवठा सुरू करावा यासाठी तेथील राज्य सरकारतर्फे ‘नियद नेल्लानार’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गतच येत्या काही महिन्यात दुर्गम भागातील अन्य गावांना सुद्धा वीज पुरवठा करण्यासाठी कामं सुरू आहेत.
आदर्श गावं
छत्तीसगडमध्ये अनेक गाव ही दुर्गम भागात आहेत. अनेक गावांमध्ये नक्षलवाद्यांचं प्रस्थ आहे. त्यामुळे ही गावं मुलभूत गरजांपासूनही वंचित आहेत. या अशा गावांमधून नक्षलवाद नष्ट करुन पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा, पक्की घरं, वीज पुरवठा, रस्ते, पूल आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन ‘आदर्श गाव’ निर्माण करण्याचा मानस मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी व्यक्त केला आहे.
गावकऱ्यांमध्ये आनंदी आनंद
गावामध्ये वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या वीजेमुळे दैनंदिन कामं करणं, मुलांना अभ्यास करणं सोपं होणार आहे. जंगलाचा भाग असल्यामुळे नक्षल्याप्रमाणे विषारी साप आणि विंचूचीसुद्धा भीती असते. यापासूनही सुटका होणार आहे. त्याशिवाय आता गावात वीज आल्यामुळे टिव्ही सुद्धा पाहता येईल, अशा भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.