भारत हा तेल आयात करणारा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा आणि नैसर्गिक वायू खरेदी करणारा चौथ्या क्रमांकाचा देश आहे. सध्याच्या इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जगावर तेल संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताकडे तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरेसा साठा असल्याची माहिती केंद्रीय तेल मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी दिली आहे.
पुरी म्हणाले की, आपण ज्या देशांतून तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करतो त्या भौगोलिक प्रदेशामध्ये सध्या अशांततेचं, संघर्षाचं वातावरण आहे. मात्र, भारताला अनेक मार्गांनी ऊर्जा पुरवठा होत आहे. त्यामुळे इंधनाच्या खरेदीमध्ये सातत्य आणि स्थिरता आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सर्वाधिक इंधन आता आयात होत नाही
केंद्रीय तेल मंत्री हरदीप सिंग पूरी यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्विटकरुन ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गेल्या दोन आठवड्यापासून मध्य पूर्वे भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत या सगळ्या घटनांवर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षापासून भारताने कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीसाठी विविध पर्याय अवलंबले आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारताचं सगळ्यात जास्त इंधन आयात केलं जात नाही.
तेल क्षेत्र आणि गुंतवणूकदार हाय अलर्ट मोडवर
13 जून पासून इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष सुरु झाला आहे. तेव्हापासूनच जगभरातलं ऊर्जा क्षेत्र आणि या क्षेत्रातले गुंतवणूकदार सतर्क आहेत.
भारत आयात करत असलेल्या एकूण 5.5 दशलक्ष बॅरल पैकी 20 दशलक्ष (bpd) तेल हे होर्मुजच्या सामुद्रधुनीतून आयात करते. उर्वरित तेल हे रशिया, अमेरिका आणि ब्राझिलकडून घेते. त्यामुळे भारताकडे तेल कमी पडू शकत नाही.
रशियातून आयात केलं जाणार तेल हे सुएझ कालवा, केप ऑफ गुड होप किंवा पॅसिफिक महासागरातून आयात केलं जातं.
अमेरिका, पश्चिम आफ्रिकन आणि लॅटिन अमेरिकन इथून जरी तेल आयातीचा खर्च वाढत असला तरी या संघर्षाच्या काळात या मार्गातून तेल आयात करणं व्यवहार्य आहे.
दरम्यान, भारतातल्या तेल विपणन कंपन्यांकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. वेगवेगळ्या मार्गाने, देशातून भारत तेल आयात करतो. त्यामुळे नागरिकांना तेलाची कमी भासणार नाही याची शाश्वती केंद्रीय मंत्री पूरी यांनी दिली आहे.
हे ही वाचा : इराण – इस्रायल युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार
जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्या
ब्रेंट कच्च्या तेलाच्या दरांमध्ये 10 टक्क्यांची वाढ झाली असून त्यांच्या किंमती प्रती बॅरल 77 डॉलर झालं आहे. तरी, तज्ज्ञांच्या मते गेल्यावर्षी जून मध्ये प्रती बॅरल किंमती पेक्षा कमी आहेत. तसच 2022 साली रशियाने युक्रेनवर आक्रमण केलेलं तेव्हा तर कच्च्या तेलाच्या किंमती प्रती बॅरल 100 डॉलर होत्या.
तेलाचे पुरवठादार आणि उपयोग
भारत सगळ्यात जास्त तेल हे रशियाकडून आयात करतो. रिफायनरीजमधून या कच्च्या तेलाचं रुपांतर पेट्रोल-डिझेलमध्ये केलं जातं.
तर कतारकडून भारत सगळ्यात जास्त नैसर्गिक वायू आयात करतो. याचा वापर खत निर्मितीसाठी, वीज निर्मितीसाठी वापरला जातो. तसच ऑटोमोबाईल साठी सीएनजीमध्ये आणि स्वयंपाकासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅसमध्ये त्याचं रुपांतर केलं जातं.