इराण आणि इस्रायल दरम्यान संघर्ष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दोन्ही देशांतील भारतीय नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. दोन्ही देशांमध्ये दररोज होणाऱ्या हवाई हल्ल्यामुळे भारतीय नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत. हल्ले होत असलेल्या ठिकाणच्या भारतीय नागरिकांना, विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
इराणमध्ये सोमवार दिनांक 16 जून 2025 पासून भारतीय दुतावासाने तेहरानमधल्या स्थानिक प्रशासनाच्या मदतीने भारतीय नागरिकांना तेहरानमधून बाहेर काढून सुरक्षित स्थळावर हलविण्यास सुरुवात केली आहे. तर 100 हून जास्त विद्यार्थ्यांनी रस्तेमार्गाने अर्मेनियामध्ये स्थलांतर केलं आहे.
इस्रायलचंही हवाई क्षेत्र पूर्णपणे बंद ठेवल्यामुळे तिथल्या भारतीय नागरिकांना रस्ता मार्गाने जॉर्डन किंवा इजिप्तमध्ये जाण्याचे निर्देश तेल अवीवमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
हा संघर्ष सुरु झाल्यापासून परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आखाती देशातल्या अन्य देशांशी संपर्क साधून भारतीय नागरिकांना सहकार्य करण्यासंबंधित चर्चा केली आहे.
इस्रायलमध्ये सुमारे 25 हजार भारतीय नागरिक
इस्रायलमधल्या भारतीय दुतावासाच्या नोंदीनुसार, सध्या इस्रायलमध्ये 25 हजार भारतीय नागरिक आहेत. अनेक बांधकाम प्रकल्पांवर काम करण्यासाठी कौशल्यपूर्ण कामगार हवे असल्याची मदत इस्रायलने मागितली होती. इस्रायलच्या या मागणीनंतर भारताकडून इस्रायलला कामगार पाठवण्यात आले. त्यामुळे इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक आढळतात. या सर्व भारतीय नागरिकांशी भारतीय दुतावासाने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना शक्यतो घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दुतावासातील अधिकाऱ्यांकडून जॉर्डन आणि इजिप्तच्या सीमा ओलांडून भारतात येऊ इच्छिणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केलं जात आहे.
इराणमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी विशेष बसची सुविधा
इराणमधल्या तेहरान इथून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. तेहरानमधल्या तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, इस्लामिक आझाद युनिव्हर्सिटी-तेहरान मेडिकल सायन्सेस आणि तेहरानमधील इराण युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस या विद्यापीठामध्ये भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. भारतीय नागरिकांना अगारक इथे सीमा ओलांडता यावी यासाठी भारताची अर्मेनियन अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरु आहे.
तेहरानमधील शाहिद बेहेश्ती युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि इराणच्या सीमेजवळील उर्मिया युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमधून लवकर विद्यार्थ्यांचं स्थलांतर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय पर्यटकांना इराणमध्ये 14 दिवसांचा व्हिसा-मुक्त कालावधी मिळण्याचा अधिकार आहे. पण हवाई सीमा बंद असल्यामुळे प्रवासी, पर्यटक आणि धार्मिक यात्रेकरुंचा हा अधिकचा अवधीही संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इराणमध्ये भारतीय नागरिकांना सातत्याने दुतावासाच्या संपर्कात राहण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय दुतावासाकडून +989010144557, +989128109115 आणि +989128109109 हे हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आले आहेत.