राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जन्मलेली, साध्या कुटुंबातील मुलगी. वयाच्या 12 व्या वर्षी लग्न आणि 17 व्या वर्षी तीन मुलींची आई सोनू कंवर यांची ही कहाणी आहे. आज सोनू आपल्या दुचाकीवर स्वार होऊन रणरागिणी बनल्या आहेत.
राजस्थानमधील बालविवाहाच्या जुन्या सामाजिक परंपरेला आव्हान देण्यासाठी 28 वर्षीय सोनू कंवर यांनी आतापर्यंत तब्बल 12 बालविवाह यशस्वीरित्या थांबवले आहेत. केवळ इतकेच नव्हे, तर जनजागृती आणि पोलिसांच्या मदतीने त्यांनी भविष्यात होणारे शेकडो बालविवाह रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
‘द हिंदू’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनू कंवर यांनी सांगितलं की “मी बारा वर्षांची होते, तेव्हा माझे लग्न झाले. त्यावेळेस मला काहीच समजत नव्हते. माझे लग्न माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नाच्या दिवशी ठरवलं गेलं.” बालपणीच्या या कटू अनुभवाने सोनू कंवर यांनी बालविवाहाच्या विळख्यात अडकलेल्या इतर मुला-मुलींची वेदना दूर करायचं ठरवलं.
आज सोनू कंवर आपल्या दुचाकीवरून गावोगावी फिरतात. शाळा आणि पंचायत कार्यालयांच्या बैठकांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी जाऊन त्या बालविवाहाच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करतात. त्यांचे धाडसी प्रयत्न पाहून लोक त्यांचा आदर करतात. अनेक तरुण स्त्रिया परिणामांच्या भीतीने बालविवाहाच्या प्रथेवर उघडपणे बोलण्याचे धाडस करत नाहीत. पण सोनू कंवर निर्भीडपणे कायद्याची माहिती देतात आणि अन्याय सहन न करण्याचे आवाहन करतात. स्वतःच्या आयुष्यात भोगलेल्या वेदनांमुळे सोनू कंवर यांचा निर्धार अधिक पक्का झाला आहे. आणि ‘बालविवाहमुक्त समाजा’च्या निर्मितीसाठी त्या अथक प्रयत्न करत आहेत.
कायद्याची मदत, समाजाची साथ
सोनू कंवर गावातील लोकांना बालविवाह विरोधी कायद्यांविषयी माहिती देतात. जेव्हा त्यांना बालविवाहाबद्दल काही कळतं, तेव्हा त्या पोलिसांची मदत घेतात आणि दोषी पालकांना कायद्याचा धाक दाखवतात. इतकेच नाही, तर लग्नात सहभागी होणाऱ्यांनाही त्या स्पष्टपणे बोलून फटकारतात. त्यांच्या या हिंमतीमुळे अनेक मुली आणि मुलंही सुरक्षित झाली आहेत. अनेक पालकांनी आता बालविवाह न करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: केरळच्या 59 वर्षीय महिलेनं कुठलेही प्रशिक्षण न घेता केला एव्हरेस्ट बेस कॅम्प सर
संघर्षातून खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सोनू कंवर
लग्नाच्या वेळी सोनू कंवर यांचे पती लक्ष्मण सिंह यांचेही वय कमी होते. आज तेच सोनू यांच्या संघर्षात त्यांना सर्वात जास्त साथ देत आहेत. त्या दोघांनाही भूतकाळात त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणीव आहे आणि म्हणूनच भविष्यात कोणत्याही मुला-मुलीला असा त्रास होऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
लग्नानंतर काही वर्षं सोनू कंवर त्यांच्या आई-वडिलांबरोबर राहिल्या आणि शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत होत्या. पण लवकरच त्यांना त्यांच्या नवऱ्याबरोबर राहावे लागले. त्यानंतर फक्त 17 व्या वर्षी त्यांना तीन मुली झाल्या आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं. शारीरिक आणि मानसिक त्रासामुळे त्या थोड्या कमजोर झाल्या होत्या, पण याच परिस्थितीतून त्यांना बालविवाहाविरुद्ध लढण्याची ताकद मिळाली.
सोनू कंवर सांगतात, “माझ्या तीन मुलींना मोठं करताना मला खूप संघर्ष करावा लागला. त्या प्रत्येक दुःखातून माझी बालविवाहाविरुद्धची लढाई अधिक तीव्र होत गेली. आता मी ठरवलं आहे की कोणत्याही मुलीचं बालपण वाया जाऊ द्यायचं नाही.”
सोनू कंवर यांच्या मते, समाजात आजही बालविवाह ही गोष्ट सामान्य मानली जाते. पण आता परिस्थिती बदलत आहे “लोक आता मला ओळखतात, माझ्या कामाचा आदर करतात. गावातील मुली आणि त्यांचे पालक आता बालविवाह करायच्या आधी दोनदा विचार करतात,” असे त्या सांगतात.
हेही वाचा: भावना इस्वीची संगीत आणि आर्किटेक्चर क्षेत्रातील यशस्वी वाटचाल
आज सोनू कंवर आणि त्यांचे पती दोघांचेही एकच स्वप्न आहे, असा समाज निर्माण करणे, जिथे कोणत्याही मुला- मुलींना बालविवाहाच्या बंधनात अडकण्याची गरज भासणार नाही.
सोनू कंवर आत्मविश्वासाने म्हणतात, “ज्या दिवशी प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना शाळेत पाठवतील आणि एकाही लहान मुला-मुलीचं लग्न जबरदस्तीने होणार नाही, तो दिवस खऱ्या अर्थाने आपल्या समाजासाठी आदर्श असेल.”