रंग, पिचकारी, पाणी आणि भांग म्हणजे होळी हे एक समिकरणच. भांग पिल्यावर होणाऱ्या गंमती जंमती या दुसऱ्या दिवशीच्या चर्चेचा मुख्य विषय असतो. पण ही भांग नेमकी काय असते, होळीच्या दिवशीच भांग का प्यायली जाते असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. तर जाणून घेऊयात होळी सणाचं आणि भांगचं काय विशेष नातं आहे?
भांग ही नेमकी काय असतं?
भांग (कॅनाबीज) वनस्पतीच्या मादी जातीतल्या झाडाच्या बिया आणि पाल्यापासून तयार केलेल्या पावडरलाच भांग असं म्हटलं जातं. या झाडाची पानं आणि बिया या पाण्यामध्ये भिजवून ठेवले जातात. नंतर त्याची पावडर करुन त्यांच्या छोट्या गोळ्या तयार केल्या जातात. याला भांग गोळी म्हणतात. या गोळ्या किंवा थेट पावडर ही द्रव्य पदार्थामध्ये, भजी किंवा अन्य कोणत्याही गोष्टीत मिसळून खाण्यासाठी दिली जाते.
वेदामध्ये या भांगेचा उल्लेख आढळतो. तर आयुर्वेदामध्ये शारीरिक व्याधीसह मानसिक अस्वस्थतेवर उपचार करण्यासाठी याचा उपयोग केला जातो.
ज्यावेळी इंग्रजांनी भारतावर सत्ता करण्यास सुरुवात केली त्यावेळी सणावाराच्या दिवशी किंवा औषधीय गुण म्हणून भांगाचा सर्रास केला जाणार वापर पाहून चकित झाले. त्यांनी या भांगेचा शास्त्रीय उपयोग आणि सांस्कृतिक संदर्भाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली. तेव्हा, भांग सारख्या औषधी गुण असलेल्या आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या वनस्पतीच्या सेवनावर निर्बंध घालणे योग्य ठरणार नाही. कारण ही वनस्पती अस्वस्थता असलेल्यासाठी औषध आहे. आणि या वनस्पतीमुळे वाईट गोष्टींपासून आपलं रक्षण होतं अशी या लोकांची श्रध्दा, धारणा आहे, असं या समितीच्या अहवालामध्ये नमूद केलं होतं.
हे ही वाचा : आदिवासी बांधवांचा भोंगऱ्या होळी उत्सव
होळी आणि भांगचं नातं कसं निर्माण झालं?
गेल्या अनेक वर्षापासून होळी सणाचं आणि भागं यांची समिकरण तयार झालं आहे. या सणाच्या दिवशी सगळेच स्त्री – पुरुष दूध, केसर साखर, सुकामेवा, बडीशेप, गुलाबाच्या पाकळ्या यापासून बनवलेल्या थंडाईमध्ये भांग मिसळून पित असतात. या थंडाईमध्ये कलिंगडाच्या फोडी, काळी मिरी, खसखस, वेलची पूड सुद्धा असते.
तर अशा या थंडाईत मिक्स केलेल्या भांगचं सेवन करणं हे भगवान शिवशी जोडलेलं आहे. यामागे आख्यायिका अशी आहे की, भगवान शिव यांची पत्नी सती हिच निधन झालं तेव्हा भगवान शिव यांना अतीव दु:ख झालं. या दु:खातून बाहेर येण्यासाठी त्यांनी ध्यानसाधना सुरू केली. माता पार्वती हिने भगवान शिव यांना या अवस्थेतून बाहेर येऊन तिच्यासोबत लग्न करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी तिने प्रेमाचा देव कामदेवाकडे मदतीसाठी विनंती केली.
मात्र, भगवान शिव यांना त्यांच्या कोणत्या कृत्यामध्ये हस्तक्षेप केल्याचं आवडत नाही. तसं काही केलं तर त्याचे गंभीर परिणाम होतील याची कामदेवाला कल्पना होती. पण दुसरीकडे, त्यालाही भगवान शिव यांची ही अवस्था पाहवत नव्हती. भगवान शिव यांना यातून बाहेर काढणं गरजेचं आहे हे ही त्यांना माहित होतं. त्यामुळे कामदेवाने भगवान शिव यांची ध्यान तोडण्यासाठी, होळीच्या दिवशी आपल्या धनुष्यबाणाला भांगेचा बाण लावत तो भगवान शिव यांच्यावर ओढला.
अगदी संतप्त झालेल्या भगवान शिव यांनी कामदेवाला जाळून राख केलं. पण त्यावेळी त्यांना वास्तवतेचं भान आलं आणि त्यांनी माता पार्वतीशी लग्न केलं. भांगेच्या नकळत सेवनाने भगवान शिव हे वास्तव जगात परत आले याचं स्मरण म्हणून भक्तगण होळीच्या दिवशी भांगेचं सेवन करतात.
हे ही वाचा : वाराणसीतली होळी
भांगेचं सेवन करणं भारतात अधिकृत आहे का?
भारतामध्ये ‘अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 (NDPS Act, 1985)’ अंतर्गत भांगेचं सेवन करण्यावर बंदी आहे. या कायद्यानुसार, भांग ही अंमली पदार्थ म्हणून ग्राह्य धरली जाते. त्यामुळे त्याची लागवड करणे, ते जवळ ठेवणे आणि त्यांची वाहतूक करण्यावर निर्बंध आहेत. दरम्यान, या कायद्यामध्ये संपूर्ण भांग वनस्पतीचा समावेश केलेला नाहीये. तर, या वनस्पतीच्या रेझिंन्स, फुलं आणि फळांवर बंदी आहे. पण बिया आणि झाडांची पानं दैनंदिन जीवनात वापरु शकतो. आणि याच दोन गोष्टींचा समावेश भांग तयार करण्यासाठी होतो.
एकाच वनस्पतीच्या वापरासंबंधित कायद्यात केलेल्या या फरकामुळे आतापर्यंत अनेकदा कोर्टात प्रश्नचिन्ह केलं आहे. यासंबंधित अर्जून सिंग विरुद्ध हरियाणा सरकारचा खटला उदाहरणादाखल दिला जातो. या खटल्याच्या निर्णयात पंजाब हरियाणा कोर्टाने म्हटलं आहे की, भांग वनस्पतीच्या बिया आणि पानाचं सेवन करणं बेकायदेशीर नाही आहे. मात्र, भांग वनस्पतीची लागवड करणं हे बेकायदेशीर आहे असं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे.
2022 साली कर्नाटक कोर्टाने सुद्धा एका खटल्यामध्ये, अंमली पदार्थ कायद्या अंतर्गत भांग ही अंमली पदार्थ म्हणून घोषित केलेली नाही आहे, असं स्पष्ट करुन अटक केलेल्या व्यक्तिला जामीन दिला.
महत्त्वाचं म्हणजे राजस्थानमधल्या जैसलमेर आणि पुष्कर येथे वर्षभर सुरू राहणारी सरकार मान्य भांगची दुकाने आहेत.