दिल्ली मद्य घोटाळा (Delhi Liquor Policy) प्रकरणाशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावरून अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज जामीन मंजूर करण्यात आला आहे. केजरीवाल यांच्या दोन वेगवेगळ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज निर्णय दिला. या निर्णयामुळं केजरीवाल यांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
यातील एका याचिकेत केजरीवाल यांनी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) द्वारे यांनी केलेल्या अटकेला आव्हान दिलं होतं. तर दुसरी याचिका त्यांचा जामिन नाकारण्याच्या निर्णयाविरोधातली होती. सुप्रीम कोर्टानं 5 सप्टेंबर रोजी या दोन्ही याचिकांवरचा निकाल राखून ठेवला होता. आज जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस उज्जल भुईयां यांच्या पीठानं या याचिकांवरील निकाल देत केजरीवाल यांचा जामीन मंजूर केला.
ईडीकडून आम आदमी पार्टी (AAP) चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना 21 मे रोजी अटक करण्यात आली होती. ईडीकडून अटकेच्या कारवाईआधी केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना ईडीनं अटक केली. ईडीच्या अटकेत असताना न्यायालयानं केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. मात्र याच प्रकरणात सीबीआयने अरविंद केजरीवाल यांना 26 जून रोजी अटक केली. या विरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दिल्ली उच्च न्यायालयानं भ्रष्टाचार प्रकरणी त्यांची अटक कायम ठेवली होती. केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या 5 ऑगस्टच्या आदेशाला आव्हान देत सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आज सुप्रीम कोर्टान या याचिकेवरील निकाल देत केजरीवाल यांचा जामीन मंजूर केला.
Congratulations to AAP family!🎉😊Kudos for staying strong 👏🏻Wishing also the soonest release of our other leaders.
— Sunita Kejriwal (@KejriwalSunita) September 13, 2024
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यावर त्यांच्या पत्नी सुनिता यांनी समाज माध्यम ‘X’ वर आम आदमी पार्टीचे अभिनंदन केले आणि तिहार जेलमध्ये अटकेत असणाऱ्या इतर नेत्यांच्याही सुटका व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली.